|
!!!गणपती बाप्पा मोरया!!!
Posted: 10 Sep 2010 11:47 PM PDT

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
"दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला
"उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला"
मी म्हटले "सोडून दे, आराम करू दे त्याला"
"तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस?
मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस?"
"मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक"
"इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश करेपर्यंत खूप खूप दमतो"
"काय करू आता माझ्याने manage होत नाही
पूर्वीसारखी थोडक्यात माणसे खुशही होत नाहीत"
"immigration च्या requests ने system झालीये hang
तरीदेखील संपत नाही भक्तांची रांग"
"चार-आठ आणे देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या files नुसत्या वाढतच राहतात"
"माझं ऐक तू कर थोडं थोडं delegation
management च्या theory मध्ये मिळेल तुला solution"
"M.B.A. चे फंडे कधी शिकला नाहीस का रे?
Delegation of Authority कधी ऐकलंच नाहीस का रे?"
"असं कर बाप्पा एक Call Center टाक
तुझ्या साऱ्या दूतांना एक-एक region देऊन टाक"
"बसल्याजागी कामं होतील, तुझी धावपळ नको
परत जाऊन कुणाला, दमलो म्हणायला नको"
माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा खुश झाला
"एक वर देतो बक्षीस, माग हवं ते म्हणाला"
"CEO ची position, Townhouse ची ownership
immigration देखील होईल झटपट, मग duel citizenship"
मी हसलो उगाच, "म्हटलं खरंच देशील का सांग?"
अरे मागून तर बघ, थोडी देणार आहे टांग?
"पारिजातकाच्या सड्यामध्ये हरवलेलं अंगण हवं
सोडून जाता येणार नाही, असं एक तरी बंधन हवं"
"हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव
प्रत्येकाच्या मनात थोडा मायेचा शिडकाव"
"देशील आणून मला माझी हरवलेली नाती?
नेशील मला परत जिथे आहे माझी माती?"
"इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं
आई-बापाचं कधीही न फिटणारं देणं?"
"कर्कश्श वाटला तरी हवा ढोल-ताशांचा गर्जार
भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे शेजार"
"यंत्रवत होत चाललेल्या माणसाला थोडं आयुष्याचं भान
देशील का रे देवा, यातलं एक तरी दान?"
"तथास्तु" म्हणाला नाही, बाप्पा नुसता सोंडेमागून हसला
सारं हाताबाहेर गेलंय पोरा, "सुखी रहा" म्हणाला......
- पुनर्शब्दांकन : वैभव गायकवाड
सौजन्य : अर्चना बोबडे, विवेक पाखरे आणि करण मढवी
नोट : वरील कविता माझी
नाही, कुणाची आहे मला माहित नाही. माझ्याकडे आलेल्या एका e-mail मध्ये
होती. पुनर्शब्दांकन इतक्यासाठीच कि मूळ कवितेतला भाव उत्तम असला, तरी यमक,
नाद्ताल याच्याशी काही संबंध नव्हता. आणि बहुतेक ९० च्या दशकात लिहिली
असावी, कारण बरेचसे references आता outdated वाटत होते. मूळ कवितेला इतकं
बदलावं लागलं कि आता त्याखाली माझं नाव लिहायचा माझा हक्क बनतो.



|