विठ्ठल कोण होता Vithal

2,157 views
Skip to first unread message

Rakesh...@bharti-axalife.com

unread,
Mar 15, 2011, 9:29:31 AM3/15/11
to sho...@googlegroups.com, traini...@bharti-axalife.com

विठ्ठल कोण होता?

अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेला, ज्याच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे, असा विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचे दैवत. संतांनी तो विष्णुकृष्णरूप मानलेला आहे. पण गंमत म्हणजे श्रुती-स्मृती-पुराणांनी कोठेही विठ्ठलाचा निर्देश केलेला नाही की विष्णुच्या अवतारगणनेत आणि नामगणनेत त्याचा समावेश नाही. मग इसवीसनाच्या अकराव्या-बाराव्या शतकापासून वैष्णवप्रतिष्ठा प्राप्त झालेला हा विठ्ठल आला कोठून?

विठ्ठल आणि पंढरपूर याविषयीचे पौराणिक प्रकृतीचे तीन संस्कृत ग्रंथ उपलब्ध झालेले आहेत. त्यातील सर्वात आधीचा ग्रंथ आहे स्कंदपुराणांतर्गतचा "पांडुरंगमाहात्म्य'. दुसरा आहे पद्मपुराणांतर्गतचा "पांडुरंगमाहात्म्य' आणि तिसरा आहे विष्णुपुराणांतर्गतचा "पांडुरंगमाहात्म्य'. स्कांद पांडुरंगमाहात्म्य निवृत्ती-ज्ञानदेव आदी संतांच्या उदयापूर्वी, हेमाद्री पंडिताच्या काळापूर्वी रचले गेलेले आहे. त्या ग्रंथामुळे पंढरपूरचा विठ्ठलप्रधान पावित्र्यसांभार दृढ पायावर स्थिर झालेला आहे.

विठ्ठल या नावाची समाधानकारक व्युत्पत्ती अद्याप सांगता आलेली नाही. त्याचे पांडुरंग हे नाव मात्र पंढरपूरपासून तयार झालेले आहे. पंढरपूरचे मूळ कन्नड नाव आहे पंडरगे. विठ्ठल मंदिरातील सोळखांबी मंडपातल्या तुळईवर होयसळ नृपती सोमेश्वराचा लेख (शके 1159) आहे. त्यात या ग्रामनामाचा उल्लेख आहे. या पंडरगेपासूनच पांडुरंग हे देवनाम आणि पांडुरंग-पंढरपूर-पंढरी हे क्षेत्रनाम आणि पुंडरीक हे भक्तनाम कृत्रिम संस्कृतीकरणातून साधले गेले आहे. पुन्हा विठ्ठल या नावाची स्पष्टिकरणकथा सादर करण्याच्या हेतूने तो विटेवर उभा राहिल्याची कथा ठोकून देण्यात आलेली आहे.

विठ्ठलाचे पांडुरंग हे संतप्रिय नाव आहे; पण या नावामुळे एक विसंवाद निर्माण झालेला आहे. कारण पांडुरंग हे नाव दृश्‍यतः शिववाचक आणि अर्थदृष्ट्या कर्पूरगौर शिवाच्या शुभ्र वर्णाचे द्योतक आहे. असे हे नाव सावळ्या विठ्ठलाला देण्यात आले आहे, ही मोठीच गंमत आहे.

संतांनी विठ्ठलाला "कानडा विठ्ठलु कर्नाटकू' असे म्हटलेले आहे. म्हणजे महाराष्ट्राचे हे दैवत कानडी आहे. भौगोलिकदृष्ट्याही यात तथ्य असल्याचे दिसून येते. कारण पंढरपूर हे स्थान आजही महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरच आहे. पंढरपूर जवळचे मंगळवेढे तर बसवेश्‍वराचे आद्य कार्यक्षेत्र होते. वर सांगितल्याप्रमाणे पंढरपूरचे पुरातन पंडरगे हे नाव पूर्णपणे कन्नड आहे. विठ्ठलाचे बहुतेक हक्कदार सेवेकरी कर्नाटकीय आहेत आणि त्यांचे मूळचे कुळदेव कर्नाटकातलेच आहेत. या व अशा अन्य काही लहान-सहान बाबींवरून विठ्ठलाचे कानडेपण निःसंदिग्धपणे स्पष्ट होते.

पंढरपूरच्या या कानडी विठ्ठलाचा आद्य भक्त आहे पुंडलिक. जर विठ्ठलाचे मूळ रूप काही वेगळेच होते; तर मग हा पुंडलिक आला कोठून? तर पुंडलिक म्हणजे पुंडरिक. पंडरगे या क्षेत्रनामाच्या कृत्रिम संस्कृतीकरणातून पुंडरिक हे नाव सिद्ध झाले आहे. पंढरपूर हे पुंडरिकपूरही आहे. पुंडरिक हा मूळचा पुंडरिकेश्‍वर आहे आणि पंडरगे या गावाचा तोच मूळचा अधिष्ठाता देव आहे. पंढरपुरात विठ्ठलाची विष्णु-कृष्ण म्हणून नव्याने प्रतिष्ठा वाढविण्याऱ्या वैष्णवांनी, वैष्णव क्षेत्रोपाध्यांनी पंढरपुरातील मूळच्या लोकप्रिय दैवताचे वैष्णवीकरण करून त्यांना विठ्ठल परिवारात समाविष्ट केले. त्यातीलच पुंडरिकेश्‍वर हा देव. त्याला त्यांनी भक्तराज पुंडरिकाचे नवे वैष्णवचरित्र देऊन विष्णुदास बनविले. आज सांगितली जाणारी पुंडलिक कथा ज्ञानेश्‍वरांच्या काळापासून जनमानसाने स्वीकारलेली आहे; पण त्यात काडीमात्र ऐतिहासिकता नाही. ती विठ्ठलाची शुद्ध पौराणिक अवतरण कथा आहे.

तर विठ्ठल हा मूळचा लोकदेव आहे. तो गोपजनांचा, गवळी-धनगरांचा देव आहे. विठ्ठल हे दैवत गोपजनांच्या, गवळी-धनगरांच्या परंपरेत आजही आले आदिम रूप सांभाळून आहे. कर्नाटक-महाराष्ट्रातले गोपजन त्याला विठ्ठल-बीरप्पा या जोडनावाने संबोधतात. त्यांच्या मंदिरात दोन पिंडी ठेऊन ते या जोडदेवाची पूजा-अर्चा करतात. बीरप्पा किंवा बिरोबा हा धनगरांचा मुख्य देव आहे. बहुसंख्य कथांमध्ये विठ्ठल हा बीरप्पाचा निकटतम सहयोगी देव किंवा भाऊ म्हणून येतो. विठ्ठल आणि तिरूमलैचा वेंकटेश या दोघांच्याही उन्नत रूपाचं आदिबीज गोपजनांच्या, गवळी-धनगर-कुरूबांच्या विठ्ठल-बीरप्पा नामक जोडदेवात आहे.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट. बिरोबा अथवा बीरप्पाचे अनेक ठिकाणी वीरभद्रात रूपांतर झालेले आहे. वीरभद्र हा शैव आहे; तर विठ्ठल विष्णु. नरहरी सोनाराच्या कथेत त्याला विठ्ठल मंदिरात शिवलिंगाचे दर्शन होते असे दाखविण्यात आले आहे. त्या कथेचा सांधा येथे नीट जुळतो.


विठ्ठल आणि वेंकटेश हे दोन्ही समधर्मी देव आहेत. दोघेही विष्णुच्या पुरामप्रसिद्ध रूपांशी, अवतारांशी संबंध नसलेले आहेत आणि तरीही ते विष्उरूप पावलेले आहेत. एवढेच नव्हे; तर संपूर्ण दक्षिण भारतात पुरातन विष्णुरूपांहून अधिक लोकप्रियता लाबलेले आहेत. विठ्ठल हा बाळकृष्ण नावाने ओळखला जातो; तर वेंकटेशाला बालाजी म्हणतात. विठ्ठल-बिरोबा आणि विठ्ठल-वेंकटेश यांच्यातील साम्यही पाहण्यासारखे आहे. विठ्ठलाची पत्नी राधेचे निमित्त सागून दिंडिरवनात रूसून बसलेली आहे; तर वेंकटेशाची पत्नी भृगूने केलेला अपमान पतीने सहन केल्यामुळे तिरूमलैपा,ून पूर्वेस तीन मैलावर वेगळी राहिलेली आहे. वेंकटेशाच्या पत्नाचे नाव पद्मावती; तर विठ्ठलाच्या प्रेयसीचे पद्मा. विठ्ठल-बीरप्पाच्या पत्नीचे नाव पदूबाई आहे आणि तीही पतीवर रूसलेली आहे. किंबहुना तीच पंढरपुरात रुक्‍मिणी होऊन प्रकटली आहे, अशी धनगरांची धारणा आहे.

विठ्ठलाला प्रिय असलेला गोपाळकाला; तसेच विठ्ठलभक्त संतांनी रचलेली भारूडे यांचा संबंधही गोपजन-धनगर संस्कृतीशी येतो. काही अभ्यासकांनी गोपाळकाल्याचा संबंध वैदिक "करंभा'शी जोडलेला आहे. करंभ हे खाद्य गोपाळकाल्याचेच पूर्वरूप असावे, कारण "करंभः दधिसक्तवः' असे त्याचे स्पष्टिकरम वेदज्ञांनी दिलेले आहे. हा पदार्थ सातूचे पीठ आणि दही एकत्र कालवून बनवितात. वैदिक पूषन्‌ देवाला तो खास आवडतो. हा देव वृषभमुखाची काठी हाती धारण करणारा, कांबळे पांघरणारा, गायागुरांची खिल्लारे राखणारा आणि गोपजनांना वाटा दाखविणारा आहे. तो गोपजनांचा देव आहे. तो अहिंसकही आहे. त्याला दही आणि पीठ आवडते. तर पंढरपूरचा विठ्ठल ताक आणि पीठाने संतुष्ट होतो. त्याच्या या प्रेमाची स्मृती "ताकपिठ्या विठोबा'च्या रूपाने पाहावयास मिळते.
दुसरी गोष्ट भारूडाची. या शब्दाचा मूळ अर्थ धनगर असा आहे. गुजरातमध्ये आजही भरवाड या नावाची पशुपालक जमात आहे. तिचे नाव भारूड या धनगरवाचक नावाशी जवळचे आहे.

पुन्हा पंढरपूर हे स्थानही प्राचीन काळी धनगरांचा जो स्थलांतराचा मार्ग होता, त्या मार्गावरच येते, हे प्रा. कोसंबी यांनी दाखवून दिले आहे. पंढरपूर हे या फिरत्या जमातीचे एकत्र येण्याचे ठिकाण होते. आषाढी आणि कार्तिकीची पंढरपूरची यात्रा धनगरांच्या वेळापत्रकाशी निगडित आहे. तिचा वैष्णव विठ्ठलाशी मूळात संबंध नाही.

(संदर्भ ः
विठ्ठल ः एक महासमन्वय - रा. चिं. ढेरे, श्रीविद्या, प्रथमावृत्ती 1984
An Introduction to the study of Indian History - Prof. D. D. Kosambi)


Rakesh Jadhav
MIS Team - Channel Development (Agency Sales)
Bharti AXA Life Insurance Co.Ltd
Unit 601 & 602, 6th Floor, Raheja Titanium,
Off Western Express Highway, Goregaon (E), Mumbai – 400 063, INDIA
‘(91) 22 4030 6300 Extn: - 6322 |
* Rakesh...@bharti-axalife.com
This e-mail is intended for the exclusive use of the addressee and
others authorised to receive it. It may contain confidential or legally
privileged information. If you are not the intended recipient, you are
hereby notified that the use, disclosure, dissemination, distribution or
copying of this email and/or any of the attached files is strictly
prohibited.

If you have received this communication in error, please destroy
the e-mail and notify the sender immediately by a return email. 

Bharti AXA Life Insurance Company Limited is not liable for any 
improper and/or incomplete transmission of the information contained in
this communication or for any delay in its receipt or for any damage 
caused by malicious alteration by any third party.

Bharti AXA Life Insurance Company Limited does not control the content
of the emails and as such does not verify the correctness, accuracy or
validity of the message. Any views or opinions presented are solely
those of the author and do not represent those of Bharti AXA Life
Insurance Company Limited, unless otherwise specifically stated. While
reasonable effort has been made to ensure this message is free of
viruses, opening and using this message is at the risk of the recipient.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages