प्रिय सर्व,
आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल.
कुमार निर्माणचे पाचवे सत्र सुरु होत आहे. त्यानिमित्ताने हा मेल...
“आम्ही रस्त्यात जखमी होऊन पडलेली चिमणी घरी नेऊन तिची काळजी घेतली.”
“आम्ही दिवाळीत फटाके फोडले नाहीत आणि त्या पैशांनी घरच्यांना भेट व स्वतःसाठी पुस्तके घेतली.”
“आमच्या परिसरातील कचरा कमी होण्यासाठी व घंटागाडी सुरळीत होण्यासाठी नगरपरिषदेत अर्ज केला.”
“गावाचा कारभार कसा चालतो हे समजून घेण्यासाठी आम्ही गावातील ग्रामपंचायतीला भेट दिली.”
“आम्ही आमच्या गावात पोलिओ लसीकरण मोहिमेत मदत केली आणि गावातील सर्व बाळांना पोलिओची लस मिळेल यासाठी प्रयत्न केले.”
“आम्ही दिवाळीनिमित्त स्वतः भेटकार्ड बनवून आमच्या घरच्या पत्त्यावर मुद्दाम आईच्या नावे पाठवले. तिला तिच्या नावे आलेलं पत्र पाहून खुप-खुप आनंद झाला.”
“आम्ही पाणी न वापरता तसेच नैसर्गिक रंग वापरून होळी खेळलो. ते रंग आम्ही स्वतः बनवले.”
“आम्ही आमच्या शहरातील मलजल प्रक्रिया केंद्राला (Sewage water treatment plant) भेट देऊन ती प्रक्रिया समजून घेतली.”
“कुमार निर्माणमध्ये आम्ही वर्षभर खुप खेळलो आणि धम्माल केली!”
हे आणि असे विविध प्रकारचे कृतिकार्यक्रम ‘कुमार निर्माण’ कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रभरातील शालेय वयोगटाच्या मुला-मुलींनी केले आहेत. ‘कुमार निर्माण’ हा ‘एम. के. सी. एल. नॉलेज फौंडेशन’, पुणे व ‘निर्माण, सर्च, गडचिरोली’ यांच्या संयुक्त विद्यमाने मा. डॉ. अभय बंग आणि मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून सुरु झालेला शैक्षणिक कार्यक्रम आहे. शालेय वयोगटातील मुला-मुलींमधील सामाजिक बुद्धिमत्ता विकसित करणे व त्यांच्यामध्ये वैश्विक मानवी मुल्यांची रुजवणूक करणे हे याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
या उद्दिष्टाबरोबरच अशा कृती कुमार निर्माणच्या विशिष्ट पद्धतीने केल्यामुळे त्यांच्यात परोपकार, सहकार्य, मित्रत्त्व, आत्मविश्वास, स्वावलंबन हे गुणही वाढीस लागण्यास मदत होते. मुले माणसांप्रती, प्राण्यांप्रती, स्वतःच्या परिसराप्रती आणि सोबतच समाजाप्रती अधिक संवेदनशील होतात. त्यांच्या संवेदनशीलतेच्या कक्षा रुंदावतात. मुले परिसरातील विविध प्रश्नांकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने बघायला, त्यांना धैर्याने सामोरे जायला व ते प्रश्न कौशल्याने सोडवायला देखील शिकतात. हे करत असताना त्यांची निरीक्षण क्षमता, जिज्ञासू व संशोधक वृत्ती देखील वृद्धिंगत होते. मुलांचे शाळेतील अभ्यासासोबत परिसरातून देखील शिक्षण व्हायला सुरुवात होते आणि तेही आनंददायी पद्धतीने! अखेरीस, या सर्वांतून मुलांची स्वतःची अशी ‘मूल्य व्यवस्था’ बनण्यास व सोबतच उत्तम चारित्र्य घडण्यास सुरुवात होते असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.
डॉ. अभय बंग म्हणतात, “कुमार निर्माणची शिक्षण प्रक्रिया प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण अशी आहे. आम्हाला अशी आशा वाटते की, या सहभागी मुला-मुलींतूनच कदाचित कुणीतरी पक्षीतज्ज्ञ सलीम अली, वैज्ञानिक कल्पना चावला, लोकांचे दुःख दूर करणारे अब्दुल सत्तार इधी, पर्यावरणतज्ञ सुंदरलाल बहुगुणा, मुलींच्या शिक्षणासाठी झगडणारी मलाला उसुफझाई, पाणी तज्ञ राजेंद्र सिंग निर्माण होईल.”
तुम्हालाही तुमच्या परिसरातील मुलांसोबत अशा पद्धतीने जोडून घेऊन काहीतरी करण्याची इच्छा असेल तर कुमार निर्माण मध्ये नक्की सहभागी व्हा.
कुमार निर्माणच्या पाचव्या सत्राची सुरुवात जानेवारी २०१८ मध्ये होत आहे. या उपक्रमाचे पुणे, जळगाव व बीड या जिल्ह्यांत आणि कोकण विभागात विशेष लक्ष केंद्रित असणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी लवकरच प्रवेश अर्ज भरून आम्हाला पाठवा.
प्रवेश अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०१७ आहे.
प्रवेश अर्ज आमच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे. www.mkclkf.org/kumarnirman
अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा.
सस्नेह,
कुमार निर्माण कार्यकारी गट
शैलेश: ९५०३०६०६९८
प्रणाली: ९७६७४८८३३७