जगताना मी, कधीच कुठला, नियम मानला नाही
लिहिली ऐशी, गझल ज्यात मी, रदिफ घेतला ''नाही''
माणसात मज, देव भेटला, पशुही त्याचे ठायी
देवळात मज, दगड भेटला, देव भेटला नाही
अनेक आले, गाउन गेले, मैफलीत या माझ्या
भूपाळीचा, तरी खरा मी, सूर लावला नाही
जो आला तो, यार मानला, मित्र भोवती जमले
कोण? कुणाचा?, संशय ऐसा, उगा घेतला नाही
हसलो, चिडलो, तरी कधी ना, भाव दडवले कुठले
तोंडावर मी, उगा मुखवटा, कधी ओढला नाही
अनवट वाटा, धुंडत फिरलो, असा मत्त मी राही
हात पसरुनी, कधीच पुढचा, वेध घेतला नाही
ऐकले जरी, कधी जनाचे, तरी मनाचे केले
मनात माझ्या, दडलेला ‘’मी’’, कधी मारला नाही
दडपून दिला, काफीया''ला'', भीड कशाला ठेवू
मतला लिहिला असा जो कधी कुणाच रुचला नाही
केदार ....