स्वत:साठी एक शांततेचे झाड शोधा!

0 views
Skip to first unread message

Machhindra Bhalerao

unread,
Apr 1, 2014, 11:55:08 AM4/1/14
to pvp-c...@googlegroups.com

गावातील देवळात एक म्हातारे आजोबा बसलेले असत. आल्या गेलेल्यांना आशीर्वाद देत म्हणून त्यांना सर्व ‘महाराज’ म्हणत. संपूर्ण गावाची त्यांच्यावर श्रद्धा होती.

एक गृहस्थ होते त्यांचे नाव भाऊ, काही दिवस भाऊंचे कामात लक्षच नव्हते लागत. घरात वाद, कामात घोळ, सगळेच अगदी विचित्र चाललेले.

सकाळ झाली की कामाला धावत. रात्री उशिरा काम संपवून घरी जात. घरी पोहोचल्यावर घरातल्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे. अख्खा दिवस काम, फोन, पत्रव्यवहार, ईमेल, मेसेज, हिशेब, फायदा, तोटा, अपेक्षा आणि सगळ्यांना सगळे पुरवणे यातच जात.

असेच एक दिवस थकून भाऊ कार्यालयातून बाहेर पडले. ते देवळाच्या दिशेने निघाले. महाराजांना पाहून त्यांच्यासमोर जाऊन बसले व म्हणाले, ‘‘महाराज मी कंटाळलो. दिवसभर राब-राब राबून काम करतो तरीही दु:खीच. सगळे आनंद, छंद मी सोडले. आवडी-निवडीचा विचार न करता मी स्वत:ला खेचतो. धंद्यातही आनंद नाही, नात्यातही आनंद नाही. ते सोडा. अहो, आयुष्यात शांतता नाहीच. मला काही क्षण शांततेचे हवे, पण काही केल्या ते मिळत नाही. काल एकटाच बागेत बसलो तरी विचार पाठलाग करतात.

मला सांगा तरी काय करू?’’

महाराजांना काय ते लक्षात आले. त्यांनी भाऊंना सांगितले, ‘‘हे बघ, मला एक झाड माहीत आहे. त्या झाडाखाली पाच मिनिटं बसलास तर तुझे मन शांत होईल. ते शांततेचेच झाड आहे.’’ समोरच्या टेकडीवर एक झाड होते त्याकडे बोट दाखवून महाराजाने भाऊंना दाखवले.

त्यावर महाराज म्हणाले, ‘‘पण तिथे त्या झाडाजवळ फोन, पैशाचे पाकीट, पेन, कागद असे काही नेले की ते झाड आपल्याला फांद्या मारून पळवून लावते. टेकडी तशी छोटीच आहे. चढणे काही कठीण नाही, पण फोनशिवाय जाऊ शकशील का?’’

भाऊ शांततेसाठी काही करू म्हणून खिशात असलेल्या सर्व गोष्टी महाराजांच्या स्वाधीन करून निघाले.

अनेक दिवसांनी ते फोनशिवाय निघाले होते. पंधरा मिनिटे चालत ते शेवटी टेकडी चढले. तिथे एक मोठ्ठे हृदयाच्या आकारात फांद्या असलेले झाड होते. मस्त थंड वातावरण होते. झाडाचा फोटो काढू म्हटले तर भाऊंच्या लक्षात आले फोन नाही आपल्याकडे. किती वेळ झाला पाहावे म्हटले तर घड्याळ नाही. काही काम लक्षात आले ते लिहावे म्हटले तर पेन नाही, कागद नाही. भाऊ झाडाखाली बसले.

आजूबाजूला निसर्गात रमले, काही जुनी गाणी गुणगुणली, टेकडीवरून दिसणारे सुंदर दृश्य आणि आयुष्यात घडलेल्या सुंदर अनुभवांचा मेल घडवला. कसा वेळ गेला कळलेच नाही.

सूर्य मावळतोय हे लक्षात येताच भाऊ निघाले. दहा मिनिटात टेकडी उतरले.

भाऊ महाराजांना भेटून पाया पडले व म्हणाले, ‘‘ते झाड खरंच शांततेचे झाड ठरले.’’ असे म्हणून भाऊ निघाले. तेवढ्यात महाराज म्हणाले, ‘तुमचे सामान घेऊन जा भाऊ. सतत आनंदी असण्याचीही गरज नाही.’ भाऊंना महाराजांचा संदेश कळला.

तुम्हालाही कळला असेल.

स्वत:ला थोडा वेळ द्या, निसर्गाकडेही पाहा जरासे, चांगल्या आठवणींना जागे करा, थोडे स्वत:साठी जगा. सतत व्हॉट्स ऍप, बी.बी.एम., फोन, इमेल, हिशेब, फायदा आणि ‘मी महान’ या जगात वावरू नका.

स्वत:शी थोड्या गप्पा मारा. आवडती गाणी ऐका, चित्र काढा, थोडे चाला, समुद्राचा आवाज ऐका (समुद्रावर जाऊन!!), जगण्याचा आनंद घ्या..कधीतरी इलेक्ट्रिसिटी नाहीच असे समजून बॅट्री, चार्जर स्वीच यांना दूर ठेवा. शांतता मिळेल. स्वत:साठी एक शांततेचे झाड शोधा!

-
with best regards,
Machhindra S.Bhalerao
PhD Research scholar,
Dept.of Chemical Engineering,
Institute Of Chemical Technology,
Matunga (E),Mumbai,400 019

Reply all
Reply to author
Forward
0 new messages