पिण्याच्या पाण्याच्या मुलभूत हक्कापासून जनतेला वंचित करून मुंबई महानगरपालिका संविधानाचा व कोर्टाचा अवमान करीत आहे.
“ पाणी हक्क समिती “ तर्फे २०११ मध्ये सर्वांना पाणी मिळावे म्हणून मुंबई हायकोर्टात जनहित याचिका सादर केली होती. सदर जनहित याचिकेवर निकाल देतांना मुंबई हायकोर्टाने मुंबईतील गरीब वस्त्यातून राहणाऱ्या नागरीकांना त्यांची घरे जरी अनधिकृत असली तरिही पाण्याची जोडणी मिळणे अत्यावश्यक आहे असे नमूद केले. भारतीय संविधानाचे कलम २१ अधिक स्पष्ट करून असा निर्णय देण्यात आला की पाण्याचा हक्क हा जगण्याच्या मुलभूत हक्कात अंतर्भूत आहे. सर्वांना पाणी उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला १५ फेब्रुवारी २०१५ च्या आत पाणी पुरवठा धोरणाचा प्रस्ताव देण्याचे आदेश दिले.
पालिका आयुक्तांनी पाणी पुरवठा धोरणाचा मसुदा स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर केला. स्थायी समितीने हा मसुदा फेटाळला आणि आयुक्तांकडे फेरविचारासाठी पाठविला. पालिकेच्या या निर्णयामुळे कोर्टाचा व घटनेचा अवमान करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या (नागरी) शासन निर्णयानुसार या योजनेमधील लाभार्थी अधिकृत/ अनधिकृत वसाहतीमध्ये राहत असतील अथवा अधिसूचित केलेल्या वा अधिसूचित न केलेल्या झोपडपट्टीमध्ये राहत असतील तरी त्यांना वैयक्तिक घरगुती शौचालयाची व समुदायीक शैचालायाची सुविधा पाणी पुरवठ्याच्या सुविधेसह उपलब्ध करुन देण्यात यावी असे निर्देश देण्यात आले.
वरील दोन्ही निर्णय केंद्र शासनाच्या जमिनीवर असणाऱ्या, रेल्वे आणि पोर्ट ट्रस्ट जमिनीवरील लोक वसाहतींना , पदपथावरील वसाहतींना, बेघर नागरिकांनाही लागू असतांना त्यांना तर अनेक वर्षांपासून या सुविधा साफ नाकारण्यात आल्या आहेत.
मुंबई हायकोर्टाचा निर्णय व महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचा निर्णय यांची अमलबजावणी करण्याची महापालिकेने केलेली अक्षम्य टाळाटाळ ह्यामुळे तब्बल १५ ते २० लाख मुंबईकरांना कायदेशीर पाणी पुरवठा न मिळाल्यामुळे पाणी माफियांवर अवलंबून राहावे लागत आहे व शौचालयांच्या मूलभूत सुविधांपासून वंचित केले जात आहे.
पालिकेच्या या मनमानी कारभाराविरूद्ध आवाज उठवण्यासाठी व आपले मूलभूत हक्क मिळवण्यासाठी येत्या जागतिक जलदिनी २२ मार्च २०१६ रोजी सकाळी ११ वाजता सर्व नागरिकांचा आझाद मैदानावर धरणे मोर्चा नेण्यात येणार आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या सर्व साथींनी या बिकट समस्येचे आणि संघर्षाचे वृत्तांकन शासन आणि जनतेपर्यंत पोहचविण्याचे योगदान करावे अशी विनम्र अपेक्षा आहे.
पाणी आहे जीवनासाठी ! द्यावाच लागेल सर्वांसाठी !!
पाणी हक्क समिती, मुंबई.