नाते भावा बहिणीचे

1 view
Skip to first unread message

http://marathiasmita.info

unread,
Aug 20, 2013, 7:34:29 AM8/20/13
to marathi-...@googlegroups.com

नाते भावा बहिणीचे

 

rakhi

WD

बहीण-भावास दरवर्षी प्रतीक्षा असते ती श्रावणमासात येणार्‍या राखी पौर्णिमेची. भावासाठी खास त्याची आवड लक्षात घेऊन बहिणी राखी निवडतात. बहिणीचे लग्न होऊन ती दूर रहात असेल किंवा भाऊ शिक्षण किंवा नोकरी निमित्ताने घरापासून दूर असेल तर राखी वेळेवर पोहचायला हवी यासाठी तिची धडपड सुरू असते. भावाचेही तसेच. आपल्या लाडक्या बहिणीसाठी यावर्षी काय भेट घ्यायची याच्या विचारात तो सतत असतो. त्यासाठी दुकाने पालथी घालातो.

सर्व आटापिटा झाल्यावर मग तो भाग्याचा दिवस उजाडतो. सकाळीच उठून झरझर सर्व कामे आटोपली जातात. बहिण सडा, रांगोळी घालते. आई गोड-धोड करते. संपूर्ण वातावरण प्रसन्नता व उत्साहाने भारलेले असते.

श्रावणातल्या निर्सगाच्या किमयेने नटलेल्या, सृष्टीचे चैतन्य ओसंडून वाहणार्‍या महिन्यात बहीण-भावांचा हा पवित्र सण येतो. या दोघांच्या नात्यातील गहिवर या दिवशी खऱ्या अर्थाने व्यक्त होतो. वास्तविक लहानाचे मोठे होईपर्यंत भांडण, खोड्या, खेळणं, बागडणं, शाळा, अभ्यास सर्व एकत्रच होत होते. हे सगळे शब्दातीत असते.

या दिवशी मात्र हे व्यक्त केले जाते. मात्र तेही आगळ्या पद्धतीने. सकाळी सकाळी चंदनाच्या साबणाने आंघोळ करून भावाला रांगोळी घातलेल्या पाटावर बसवले जाते. बहिण त्याला ओवाळते. आपल्या हाताने रेशमी सुताचा धागा असलेली राखी त्याला बांधते. या मांगल्याच्या क्षणी मनात उत्पन्न होणारे भाव फक्त बहिण- भाऊच जाणू शकतात. भाऊ आपण आणलेली भेट बहिणीस देतो.

बहिण-भावाचे नातेच तसे आहे विश्वास, आदर, त्यागाच्या पायावर उभे असलेले. बहिण ओवाळते त्यावेळी दोघांमध्येही मूक संवाद सुरू असतो. बहिण म्हणत असते, माझ्या भावा मी तुझ्यावर किती माया करते. बहीण भावास यश़, कीर्ती चिंतित असते. माझा भाऊ कर्तृत्ववान व सामर्थ्यवान व्हावा अशीच तिची मनोमन इच्छा असते. तर भाऊ म्हणत असतो, तू काळजी करू नको. अडचण व संकटसमयी धावून येणार तोच खरा भाऊ! तुझा भाऊसुद्धा अशा प्रसंगी नक्की धावून येईल.

बहीण- भाऊ दूर असले तर बहिण फोन करून राखी मिळाली का? म्हणून विचारायला कधीच विसरणार नाही. तोपर्यंत तिला चैन पडत नाही. भाऊही बहिणीच्या राखीची चातकाप्रमाणे वाट बघत असतो. राखी घेऊन येणार्‍या पोस्टमनला तो शतशः: धन्यवाद देत असतो. राखीचा लिफाफा हातात पडल्यावरचा आनंद जग जिंकल्यासारखाच असतो. आणि बहिणीने पाठविलेली राखी रक्षाबंधनाच्या दिवशी मनगटावर मिरवण्यातली ऐट काही औरच असते.

दूर असल्यामुळे प्रत्यक्ष भेट होत नसली तरी बहिणीची राखी व भावाने पाठवलेला राखी मिळाल्याचा संदेश यातूनच त्यांचा संवाद घडत असतो. प्रिय ताई… किंवा छोटी छकुली… तुझी राखी मिळाली.. खूप आनंद झाला… एवढ्या ओळी त्यांच्यासाठी पुरेशा असतात.

Reply all
Reply to author
Forward
0 new messages