फार फार वर्षापूर्वीची गोष्ट.
दोन संन्यासी मित्र तीर्थाटन करीत फिरत असतात. दोघे अगदी विरागी आणि निर्मोही असतात.
पावसाळ्याचे दिवस असतात. ते
एका गावाहून दुसऱ्या गावी जात
असतात. मध्ये एक ओढा लागतो.
त्याचे पाणी फारच वाढलेले
असते. तेथेच त्यांना, ओढा
ओलांडण्याच्या विवंचनेत
बसलेली, एक युवती दिसते. ती
या दोन तरुण संन्याशांच्या
जवळ येते आणि ओढ्या पलीकडे
तिला नेऊन सोडण्याची विनंती
करते. त्यावर एक संन्याशी तिला
म्हणतो," आम्ही ब्रह्मचारी
आहोत. आम्ही स्त्रीस स्पर्श
कसे बरे करणार." पण दुसरा
संन्यासी मात्र तिला आश्वासन
देतो आणि पाणी थोडे ओसरू
लागताच तिला खांद्यावर बसवून
पलीकडे सोडतो. ती त्याचे अनेक
आभार मानते आणि निघून
जाते.
या दोघांचा प्रवास
सुरू होतो आणि सायंकाळी ते
पुढच्या गावात
पोहोचतात. धर्मशाळेत
पोहोचल्यावर थोड्याच वेळात
दोघे पथाऱ्या पसरून गप्पा
मारत पडतात. थोड्यावेळाने
पहिला संन्यासी म्हणतो,"
मित्रा! आज तुझे ब्रह्मचर्य
मोडले." दुसरा आश्चर्याने
विचारतो, "ते कसे?" त्यावर
पाहिला म्हणतो की तू त्या
तरुणीला आज खांद्यावर बसवून
नेलेस म्हणून. त्यावर दुसरा
संन्यासी हसून म्हणतो," अरे!
ओढा ओलांडताच ती माझ्या
खांद्यावरून उतरली. पण इतका
वेळ झाला तरी ती तुझ्या
खांद्यावरून उतरलेली दिसत
नाहीये !'
(ओशोंच्या
पुस्तकात वाचलेली झेन
कथा.)
--लिखाळ.
दोन गोष्टी
मी ही गोष्ट आधी वाचली होती. बरेचदा बोलताना याचा उदाहरण म्हणून वापर करते. मला ही गोष्ट फार आवडते. तिच्यात २ तात्पर्ये दिसतात --
१. एखादी गोष्ट चांगली की वाईट या बद्दल आपण उगीच judgemental होत असतो. काही वेळेस ती गोष्ट तिथेच सोडून देणे उत्तम असते. त्यावर नाहक विचार करून आपण आपल मन खट्टू करतो व शक्ती वाया घालवतो.
२. एखादी गोष्ट आपल्यालाही करायला मिळाली असती पण योग्य वेळी योग्य निर्णय घेणे जमले नाही व दुसरा कुणितरी ती करून गेला, अशा परिस्थितीत त्या दुसऱ्या माणसावर खार खाणे व पुन्हा आपलेच मन दूषित करणे. (दुसऱ्या भिख्खू बाबत असे म्हणता येईल)
लिखाळ, ही गोष्ट इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
आभार / मला वाटते ...
प्रियालीताई,
वा! आपण
नमूद केलेली
तात्पर्ये विचार करण्या
सारखीच आहेत. प्रतिसादासाठी
आभार.
मला या गोष्टीमध्ये काय
जाणवले ते सांगतो.
येथे
दुसरा संन्यासी पूर्णतः
ब्रह्मचर्यात उत्तीर्ण झाला
आहे. त्याने त्या युवतीला
वैषयीक सुखासाठी स्पर्श
केलेला नसून पलीकडे नेणे या
हेतूने केला होता. युवतीकडे
पाहून त्याच्या मानात 'विषय'
आलाच नाही. त्यामुळे ती युवती
गेल्यावर तो हा प्रसंग विसरून
गेला. पण पहिल्या
संन्याशाच्या मनात मात्र
'विषय' होता, त्याने तसे
प्रतिक्रियेतून सांगितले आणि
दिवसभर तो त्यावर चिंतन करीत
राहिला.
आपल्या कर्माचे फळ
हे हेतूवर आणि त्यामागे
आपले मन कशा प्रकारे गुंतले
आहे त्यावर असते (असे वाचले
आहे). त्यावर ही गोष्ट
आधारलेली आहे असे मला वाटते.
--लिखाळ.
सुंदर कथा,
झेन कथा खरोखरच फ़ार सुंदर आणि बोधप्रद असतात. ( अर्थात कळल्या तरच.. काही कथा अजिबात कळत नाहीत.) अशाच अजुन वाचायला मिळाल्या तर झेन कथांचा चांगला संग्रह होऊ शकेल.१००% सहमत
१००% सहमतशुक आणि व्यास
लिखाळ आणि इतर मनोगती,
माझ्यामते ही (अशीच) गोष्ट शुक आणि व्यास यांच्याबद्दल आहे. बौद्ध काल हा महाभारतकालानंतरचा मानला तर महाभारतावरूनहि झेन तत्वज्ञानात आली असण्याची शक्यता आहे.
शुक हे महर्षि वेदव्यासांचे चिरंजीव. त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यास केला होता आणि त्यांना अध्यात्माची गोडी लागली. तेव्हा ते घर सोडून अरण्यात तपश्चर्येला निघाले. आपला मुलगा तरूणपणामध्ये घराचा त्याग करून जातो हे पाहून पितृहृदय कळवळून श्री वेदव्यास त्याची विनवणी करीत शुकाच्या मागोमाग जाऊ लागले.
शुक निर्धाराने आणि निरीच्छेने पुढे पुढे जात होते आणि मागे मागे व्यास आपल्या मुलाला तू जाऊ नकोरे असे काकुळतीने म्हणत जात होते. जाताना वाटेमध्ये एकेठिकाणी काही स्त्रिया नदीमध्ये स्नान करीत होत्या. शुक त्यांच्यासमोरून गेला तरी त्यांचे स्नान पहिल्यासारखेच चालू होते. नंतर जेव्हा श्री व्यासमुनि तिथे आले तेव्हा लगेच त्या स्त्रिया आपाआपली वस्त्रे गोळा करून आडोशाला गेल्या. व्यासांना याचे खूप आश्चर्य वाटले.
पुढे त्यांनी शुकाला गाठल्यावर व्यासांनी ते आश्चर्य व्यक्त केले. मी इतका वयस्क आणि ज्ञानी मुनी असून त्या स्त्रियांना माझ्यासमोर येण्यास संकोच कसा? तू तर तरूण वयाचा असून स्त्रियांनी तुझ्या येण्याची दखल सुद्धा घेतली नाही असे कसे?
तेव्हा शुक त्यांना म्हणाले की "तात, तुम्ही पुत्रवियोगाने व्याकूळ झाला आहात. याचाच अर्थ तुमच्या मनात अजून आसक्ति आहे. आणि माझ्या अस्तित्वाची जाणीव त्या स्त्रियांनी घेतली नाही म्हणजे मी माझ्या अध्यात्माची परीक्षा उत्तिर्ण झालो. तेव्हा आता आपण आपला शोक बाजूला ठेऊन मला अध्यात्माचा मार्ग अनुसरण्यामध्ये मदत करा"
कलोअ,
सुभाष
बरोबर/ थोड अजून
येथे दुसरा संन्यासी पूर्णतः ब्रह्मचर्यात उत्तीर्ण झाला आहे.
होय. हे ही खरेच. गोष्टीच खर तात्पर्य हेच असावे. मी फक्त ही गोष्ट इतर कुठल्या प्रकारे घेता येईल ते सांगितले.
जरी पार करून नेणाऱ्याच्या मनात 'विषय' आला तरी तो तेव्हाच निघून गेला. संन्याशी असल्याने "विषय" आलाच नाही असे म्हणणे योग्य.
परंतु सामान्य माणसाबाबतही असेच म्हणता यावे फक्त थोड्या फरकाने-
त्याने (एका सामान्य माणसाने) त्या युवतीला स्पर्श केला त्यातून वैषयिक भावना उत्पन्न झालीही असावी. परंतु ती युवती गेल्यावर तो हा प्रसंग विसरून गेला. पण पहिल्या माणसाच्या मनात मात्र 'विषय' होता, आणि दिवसभर तो त्यावर चिंतन करीत राहिला.
* वैषयिक भावना मनात येणे
स्वाभाविक आहे पण त्या
भावनेखेरीज दुसरा विचार न
सुचणे अस्वाभाविक आहे.
छान कथा
मी पण ही गोष्ट वाचली आहे. परवाच एका समारंभात ह्या गोष्टीची आठवण झाली. एका सहकर्मीच्या मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ होता. जोरदार पाऊस असूनही बऱ्यापैकी गर्दी होती. विवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आणि जेवायचे बोलवणे येईपर्यंत वेळकाढू गप्पा झाल्या.
सौ खन्डुरी- कहा जायेन्गी व्हेज/नान व्हेज?
मी- मेरा तो सवालही नही. शुद्ध शाकाहारी
सौ गुप्ता- नान व्हेज
सौ खन्डुरी- सावन है ना
सौ गुप्ता- तो क्या हुआ.ये कटेरर नान व्हेज बहोत अच्छा बनाता है.
सौ सिंग- इस बार १५० रु दिए है तो नान व्हेजही
सौ खन्डुरी (अत्यंत दुःखी स्वरात) ये लोग सावनमे नान व्हेज क्यो रखते है .पिछले साल बनर्जीके शादीमेभी मछली नही खा पायी और इस साल भी नही.
म्हणूनच
आपल्या कर्माचे फळ हे हेतूवर आणि त्यामागे आपले मन कशा प्रकारे गुंतले आहे त्यावर असते (असे वाचले आहे).
म्हणूनच भारतीय (आणि बहुदा कोणत्याही लोकशाही राष्ट्राच्या) दंडविधानानुसार स्वसंरक्षण करताना झालेल्या हत्येला आणि कट रचून केलेल्या हत्येला वेगवेगळी शिक्षा आहे. म्हणूनच स्वसंरक्षणार्थ केलेली हिंसा ही केवळ हिंसा म्हणता येणार नाही असे वाटते.
===
छान गोष्ट.
आभार
भाष महोदय,प्रतिसादाबद्दल मनापासून आभार
प्रियाली, तात्या, भोमेकाका, टग्या, भाग्यश्री, भाष, मन्जुशा, संवादिनी, आपल्या सर्वांचे, प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.छान
वरील कथा आणि हा किस्सा दोन्ही आवडले.
-संवादिनी
हे कसं काय?
येथे दुसरा संन्यासी पूर्णतः ब्रह्मचर्यात उत्तीर्ण झाला आहे. ... युवतीकडे पाहून त्याच्या मानात 'विषय' आलाच नाही.
विषय न येताही उत्तीर्ण झाला म्हणजे काहीतरी गडबड निश्चितच आहे. पेपर अगोदर फुटले होते काय?
- टग्या.
(विषयांतराबद्दल क्षमस्व. नावास अनुसरून राहवले नाही. - टग्या.)
धन्यवाद
शुक हे व्यासांचे पुत्र होते हे माहीत होत पण ही कथा माहीत नव्हती. शुकासारखे वैराग्य ज्याचे ह्याचा अर्थ ह्या कथेमुळे कळला. धन्यवाद सुभाष