त्यानं गुलाबाचं फूल तिला दिलं आणि त्याच्याकडे क्षणभर बघत तिनं ते घेतलं. गोड, लाजरं हसली ती हातातल्या फूलाकडे बघत. परत एकदा तिची नजर क्षणभरासाठी वर झाली, त्याच्या नजरेत गुंतली आणि लगेच खाली, हातातल्या फूलाकडे वळली.त्याचं हृदय धाडधाड उडू लागलं. हाच! अगदी हाच होता तो क्षण. तो क्षण ज्याची त्यानं नजाणे किती जन्मांपासून वाट पाहिली होती. ’नेहा!’ किंचित घोगऱ्या आवाजात त्यानं तिला साद घातली. ’माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझी होशील का?’
तिची नजर फूलाकडेच वळलेली राहिली, पण तिची मान अगदी हलकेच हलली. त्याच्या मनात आनंदी मोर नाचू लागले. थोडंसं पुढे झुकत त्यानं तिचा गोरागुलाबी हात हाती घेतला आणि त्यावर आपले ओठ टेकले.
त्याचवेळेस काहीतरी प्रचंड घडत गेल्याचं त्याला जाणवलं आणि त्याचे डोळे खाडकन उघडले. स्वप्न तुटलं. त्याचं सर्वांग घामाघूम झालं होतं. हृदय खरंच कुठूनतरी लांबवरून पळत आल्यासारखं धडधडत होतं. आणि त्याची चड्डी चिकट ओली झाली होती.
स्वप्न भंगल्याच्या दुःखाबरोबर अद्वैतला भयंकर आश्यर्य वाटत राहिलं. ’धिस इज इनक्रेडिबल! म्हणजे, लग्न होउन सहा महिने झालेले असताना, तिचे श्वास जाणवावेत इतक्या जवळ बायको झोपलेली असताना, उण्यापुऱ्या तासापुर्वी तिच्यासोबत रत झालेलो असताना, जिला गेली सहा वर्षे पाहिलंही नाहीये तिचं स्वप्न आपल्याला पडतं आणि तिच्या हातावर ओठ टेकलेले जाणवून आपला वीर्यपात होतो...काय आहे हे?’
*
आयुष्य हा काही चित्रपट नाही, पण योगायोगांचा मक्ता फक्त चित्रपटांनी घेतला आहे असंही नाही. अद्वैतला दुसऱ्याच दिवशी याचा प्रत्यय आला.
तो
ऑफिसमध्ये (काम करत) बसलेला
असताना त्याचा लीड अचानक
त्याच्या जागेपाशी आला आणि
त्याला म्हणाला, ’अद्वैत, एक
विनंती आहे.’
’आलं काहीतरी
नवीन.’ अद्वैतच्या मनात आलं.
पण तो नेहमीसारखाच हसून
म्हणाला, ’शुअर. काय म्हणशील
ते करीन, राम.’
राम, त्याचा
लीड सुद्धा हसला आणि म्हणाला,
’तर मग जा आणि रूम-३ मध्ये
असलेल्या उमेदवाराची मुलाखत
घे.’
’पण, रोहित घेणार होता
नं आज?’ त्यानं विचारलं.
’त्यानं डुम्मा मारलाय. न
सांगता. आता जा लवकर.’
अद्वैत
निघाला, पण त्याला थांबवत राम
म्हणाला, ’हे बघ, तुला माहितच
आहे की झेड.व्ही.क्यू. मधले
एक्सपर्ट लोक मिळणं किती अवघड
आहे ते. ह्या उमेदवारानं दीड
वर्षे काम केलंय त्यावर.
त्यामुळे उगीच खूप खोलात जाउ
नकोस. ठीक-ठीक प्रश्न
विचार...आणि तू आटोपलंस की लगेच
भेटुया आपण. निर्णय
घेण्यासाठी.’
मान डोलवत
अद्वैत तिथून निघाला.
आपल्याला नेमकं किती आठवतंय
याचा विचार करत तो रूम-३ मध्ये
येउन पोचला. दार लावून तो
वळला आणि एकदम
कोलमडलाच!
मधली सारी वर्षे
कोण्या अदृष्य हाताने पुसून
टाकल्यासारखी ती तिथे बसली
होती. नेहा. त्याच्या
चेहऱ्यावरचे विलक्षण
आश्चर्याचे भाव बघून ती छानसं
हसली. स्वप्नात चालल्यासारखी
पावलं टाकत त्यानं तिच्या
समोरची खुर्ची गाठली आणि
कसाबसा बसला. आणि लगेच त्याचे
प्रश्न आले - ’नेहा? तू?? आणि इथे?
तू दिल्लीला होतीस ना?’
’नोयडा.’
’अं?’
’नोयडाला
होते. आता बेंगलोरला यायचं
बघतेय.’
’अच्छा. अं...का?’
एक
वेदना नेहाच्या चेहऱ्यावर
उमटून गेली. तिची नजर क्षणभर
खाली वळली. मग वर पाहत,
हसण्याचा प्रयत्न करत ती
म्हणाली, ’आहेत काही कारणं.’
अद्वैतला तिचं मणिंदरशी
झालेलं लग्न आठवलं. आणि नंतर
कधीतरी कानावर उडत उडत पडलेली
बातमीही, ’त्यांचं काही फार
पटत नाहीये’ अशी. पण तो गप्प
राहिला. अवघडलेली शांतता
पसरली दोघांमध्ये.
थोड्या
वेळाने नेहाच बोलली, ’मुलाखत
घेतोयेस नं?’
अद्वैत हसला
आणि त्यानं तिला प्रश्न
विचारायला सुरूवात
केली.
बाकी मुलाखतकारांप्रमाणेच त्याचंही तिच्याबद्दल चांगलं मत झालं. त्यांच्या बैठकीत तिला रूजु होण्याची विनंती केली जावी, असं ठरलं. मग पुढच्या गोष्टी पटापट घडल्या. पैशांच्या वगैरे चर्चा आटपून काही तासात नेहा येत्या सोमवारपासून नोकरीत रूजु होईल हे देखील निश्चित झालं.
तिचं अभिनंदन करून
झाल्यावर अद्वैतनं तिला हळूच
विचारलं, ’नेहा, घरी येतेस
माझ्या? आज संध्याकाळी?’
अद्वैतच्या हृदयाचे काही
ठोके चुकण्याइतका वेळ
घेतलाच नेहानं, उत्तर द्यायला.
मग ती हलकेच ’हो’
म्हणाली.
संध्याकाळी तिच्या सोबत घरी जाताना अद्वैतच्या मनात आलं, ’ऑलवेज सो अनप्रेडिक्टेबल!’ तो स्वतःशीच हसला.
*
’माय गॉड! ही हॅज आईज
ओन्ली फॉर हर!’ सायली मनातल्या
मनात म्हणाली. घरी आल्यापासून
तिचा नवरा त्याच्या
बालपणीच्या मैत्रिणीबरोबर
बोलत बसला होता. त्यांच्या सहा
महिन्यांच्या संसारात त्याला
इतकं उल्हसित तिनं अगदी
हाताच्या बोटांवर
मोजण्याइतक्या वेळेस पाहिलं
होतं. त्यांच्या सोबत
बसण्याचा प्रयत्न तिनं करून
पाहिला होता, पण त्यांचे विषय
तिच्या ओळखीचे नव्हते, आणि ती
तिथं बसली काय किंवा न बसली
काय, त्यांना काहीच फरक पडत
नव्हता. मुकाट्यानं आत येउन
सायलीनं जेवणाची तयारी
करायला घेतली होती. अद्वैत आणि
नेहाकडे बघत बघत तिनं जेवण
उरकलं होतं. जेवण
झाल्याझाल्या अद्वैत आणि
नेहा बाहेर झोपाळ्यावर जाउन
बसले होते. बोलत.
आणि एकटीनेच
सगळी आवराआवर करताना सायली
अद्वैतला समजून घेण्याचा
प्रयत्न करत होती. ’ठीके.
चालायचंच... तो कोणता शब्द
वापरतात सासूबाई? हं...calf love!
अगदी खरं आहे. नकळत्या वयातले
हसीन गुंते...काही गाठी कायमच
राहून जात असतात सोडवायच्या.
ठीके. खरंच. काहीतरी कायमचं
हरवलेलं आणि परत कधीही
गवसण्याची शक्यता नसलेलं,
अचानक दिसलंय आपल्या
नवऱ्याला. त्या निरागस,
निष्पाप दिवसांत परत
गेल्यासारखं वाटत असेल
त्याला.’
ती स्वतःशीच हसली.
समजूतदार. ’ह्यात मी काळजी
करण्यासारखं काही नाही. आणि,
नवऱ्याचा मैत्रिणीबद्दल
जेलसी वगैरे बाष्कळपणा
माझ्याकडून तरी व्हायला नको.’
तिनं स्वतःला बजावलं.
सगळी आवराआवर झाल्यावर तिनं दिवा मालवला आणि आत, बेडरूममध्ये येउन एक पुस्तक वाचत पडली. वाचतावाचता कधीतरी तिला झोप लागली. अर्धवट. तुटक तुटक.
रात्री कधीतरी तिला जाग आली. घड्याळ अडीच वाजल्याचं दाखवत होतं. बाहेरचा दिवा चालू होता आणि तिकडून बोलण्याचे आवाज येतच होते. ती बेडरूमचा दिवा बंद करायला उठली तेव्हा तिला नेहाचा हुंदकाही कानी पडल्यासारखं वाटलं. तिकडे लक्ष न देता तिनं परत पलंग गाठला आणि डोळे मिटून घेतले. ’अद्वैत शेजारी नाही, अशी ही पहिलीच रात्र.’ तिच्या मनात आलं. तिनं परत समजूतदार हसण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते ह्या वेळेस जमलं नाही. डोळे अगदी घट्ट घट्ट बंद करत, आणि बाहेरच्या आवाजांच्या दिशेने टवकारलेल्या कानांकडे दुर्लक्ष करत तिनं झोपी जाण्याचे प्रयत्न चालू ठेवले.
*
’अरे!’
घडयाळाकडे पाहून नेहा
उद्गारली. ’साडेपाच वाजलेत?
कसा गेला वेळ कळलंच नाही.’
अद्वैत हसला, आणि म्हणाला,
’उठ, फ्रेश वगैरे हो. मी चहा
टाकतो आणि सायलीला
उठवतो.’
चहा उतू जाऊ नये म्हणून पातेलं हलवत असताना अद्वैतला नुकतीच उलटलेली रात्र आठवली आणि एका अनिवर्चनिय समाधानानं त्याचं मन भरून गेलं. नेहानं त्याला सगळं सांगितलं होतं. तिच्याबद्दल. मणिंदरसोबतच्या संसाराबद्दल. त्यांच्या न पटण्याबद्दल, त्यांच्या भांडणांबद्दल. रडली होती ती त्याच्याजवळ. विश्वासानं. जे त्यांच्यात त्या दिवसांमध्ये नव्हतं ते मैत्र त्याला आता तिच्याबद्दल जाणवत होतं. ’स्वतःच्या जीवावर खेळलेला जुगार हरलीये बिचारी. मोडलीये. आणि प्रयत्न करतीये उभं राहण्याचा.’ त्याच्या मनात आलं. ’तिला लागेल ती सारी मदत करायची आपण. तिचा आधार व्हायचं. नेहाचा आधार.’ त्यानं ठरवलं. पण अर्थातच, ह्या विचारांखाली खोल खोल, त्याच्या मनात अव्यक्त असं काय काय दडलेलं होतं, ते त्यालाही माहित नव्हतं.
त्याला, आणि नेहालाही कल्पना नव्हती; पण एका अटळ मुक्कामाच्या दिशेने त्यांच्या प्रवासाची सुरूवात केव्हाच झाली होती. सुरूवाती साध्या असतात बऱ्याचदा. निरूपद्रवी भासतात. तशीच ही सुरूवातही होती. मुलाखतीच्या निमित्यानं झालेली भेट, त्यानं तिला घरी घेउन येणं, तिनं त्याच्याजवळ मन मोकळं करणं, अशी.
आणि ह्या प्रवासात त्यांना नंतर लागत गेलेले थांबेही नेहमीचेच होते. त्यांचं एकाच टीममध्ये असणं, रामनं त्याला तिचा मार्गदर्शक म्हणून नेमणं, तिला त्यानं चांगलासा मोबाईल आणि इंटरनेट प्लॅन शोधून देणं, तिच्याकरता घर शोधण्यासाठी पूर्ण शनिवार-रविवार त्यानं तिच्यासोबत वणवण फिरणं, कामाच्या बाबतीत तिनं त्याला साऱ्या शंका विचारणं, त्यानं आणि तिनं दुपारी सोबत जेवणं, सोबत कॉफी पिणं आणि रिकामे कप्स दोघांसमोर तसेच राहून त्यांनी तासतास बोलत बसणं...सारं काही तेच. नेहमीचंच. दुसऱ्या कोणाही दोघांमध्ये घडू शकणारं, घडणारं.
आणि, परिणामकतेत कुठंही उणं नसणारं.
*
आपल्याच विचारांत हरवून सायली सुन्नशी बसली होती. ऑफिसमधून आल्यावर तिनं कपडेसुद्धा बदलले नव्हते. टीव्हीवर काहीतरी कार्यक्रम गळत होते, तिकडे तिचं लक्षही नव्हतं. तिच्या डोक्यात ती ऑफिसहून निघताना आलेला अद्वैतचा एस.एम.एस. घुमत होता. ’उशीर होईल. जेवून घे.’ बस्स. अजून काही नाही. फोन नाही, उशीराचं कारण नाही, यायची अंदाजे वेळ नाही, काहीच नाही. आजकाल असं फार होऊ लागलं होतं. आणि कोण ती नेहा यायच्या आधी असं कधीही झाल्याचं तिला आठवत नव्हतं.
ती भानावर आली, ती
तिच्या मोबाईलच्या
वाजण्यानं. ’बापरे!
सासूबाईंचा फोन.’ तिच्या
मनात आलं. तिनं फोन उचलला आणि
प्रयत्नपूर्वक आवाजात उत्साह
आणत ती म्हणाली, ’बोला,
सासूबाई!’
’काय, कशी आहे
माझी सून?’ अद्वैतच्या आईनं,
मेधानं विचारलं.
’मजेत
आहे...एकदम मजेत.’ सायली
उत्तरली.
काही क्षण मेधा
काहीच बोलली नाही, आणि मग, ’काय
झालंय सायू? काहीतरी नक्कीच
झालंय. तूझ्या आवाजावरून
तितकं कळतं मला. काय झालंय? मला
नाही का सांगणार?’ तिनं
काळजीच्या सुरात विचारलं.
सायली स्वतःला रोखू शकली
नाही. ती बोलू लागली. बोलत
राहिली. मनात गेल्या
महिन्याभरापासून साचत
राहिलेलं सारं बाहेर ओतत
राहिली. ’मी काय करू ते मला
समजत नाहीये सासूबाई.
काहीतरी दुखतंय, काहीतरी
खुपतंय पण ते नेमकं कुठे ते
कळत नाहीये. नीट, व्यवस्थित
मुद्देसूद विचार केल्यावर
सगळ्या शंका निराधार
वाटताहेत पण त्या मनात ठाण
मांडून बसणं थांबवतही
नाहीयेत.’ हुंदका दाबत, हताश
सुरात सायली म्हणाली.
’अं...मला आठवतंय हे ’नेहा’
नाव त्याच्याकडून ऐकल्याचं.
काही वर्षांपूर्वी. त्याच्या
कॉलेजमध्ये होती. सुंदर आणि
हुशार मुली असतात तशी
’लोकप्रिय.’ बाकी आख्ख्या
कॉलेजप्रमाणे अद्वैतसुद्धा
तिच्या मागे होता तेव्हा.’
’मला तर कधीच काही बोलला नाही
तो तिच्याबद्दल.’
’कारण
सांगण्यासारखं कधी काही
झालंच नाही. नुसती तोंडओळख
होती त्यांची. आणि ती सुद्धा
चौथ्या वर्षाच्या शेवटच्या
सत्रात झालेली...सायली, केवळ ती
नेहा आहे, म्हणून हा इतका
वाहवत चाललाय. ठेवते मी फोन.
बोलते त्याच्याशी. काळजी करू
नकोस.’ मेधा म्हणाली आणि तिनं
फोन ठेवला. एक उसासा सोडत तिनं
अद्वैतचा नंबर लावला.
*
’अद्वैत बाळा, कुठे
आहेस? किती दिवस झाले, नीट
बोललोच नाही आपण.’
’ऑफिसमध्येच आहे आई...’
’का
काम आहे का खूप?’
’अं... हो आहे
थोडं.’
’की नेहासुद्धा आहे
तिकडे म्हणून थांबला आहेस?’
अद्वैत शांत राहिला काही वेळ.
मेधा सुद्धा गप्प राहिली,
अद्वैतनं बोलायची वाट बघत.
शेवटी एक खोलवर श्वास घेऊन तो
म्हणाला, ’हो आई. नेहा आहे
येथे. माझ्यासोबत.’ त्याचा
आनंद त्याच्या आवाजातून
मेधाला जाणवला.
’काय चालू
आहे बेटा? काय चालू आहे तूझं?’
’काय की. जे काही चालू आहे, ते
खूप छान आहे पण.’
’अरे...’
’आई, प्लीज. आज काही सांगू
नकोस. मी खूप आनंदात आहे गं.
सगळं असणं झंकारून उठलंय.
आयुष्य अचानक उत्फुल नाचरं
झालंय.’
’पाय जमिनीवरून
सुटू देऊ नकोस फक्त.’
’टेकतच नाहीयेत जमिनीवर पाय
आई!’ आणि तो हसला, आनंदानं.
’आणि सायली?’
’तिचं काय?’
’काही नाही. तू आता असं
विचारतो आहेस म्हणजे...’
’आई, काय हे? साधी मैत्री असू
नाही शकत का माझी कोणासोबत?’
’साधी मैत्री? साधी? मी बोलले
असते, साधी मैत्री असती तर?
सायली रडली असती माझ्याजवळ,
साधी मैत्री असती तर?’ मेधानं
किंचित चढ्या स्वरात
विचारलं.
’अच्छा...’ सारं
समजून अद्वैत म्हणाला.
’म्हणजे तिनं सांगितलं आहे
तर.’
’हो रे. खूप सैरभैर
झालीये ती. का?’
’मला काय
माहित का ते. विचार तिलाच.’
तुसड्यासारखा तो म्हणाला.
’धिस इज नॉट व्हॉट आय
इक्स्पेक्ट टू हीअर फ्रॉम
यू.’
’बट, धिस इज व्हॉट आय से.’
तो ठासून म्हणाला. ’हे माझं
आयुष्य आहे आई. आणि ते मला हवं
तसं जगू द्या तुम्ही. माझ्या
आत फुलून आलेल्या ह्या
आनंदाच्या झाडावर माझा काहीच
हक्क नाही असं मला सांगू नका.
तुम्ही दिलेले नियम पाळतच
आलोय आजवर. आता जरा मी
केलेल्या नियमांनी खेळून बघू
द्या मला.’
’विसरू नकोस की
लग्न झालेलं आहे तुझं.’
’आई,
काहीच लक्षात रहात नाहीये आता.
काहीच नाही. मी अजून कसं सांगू
तुला? प्रत्येक खपलीखाली
नवीकोरी कातडी नसते आई. काही
जखमा अशाही असतात की
ज्यांवरची खपली जऽरा निघाली
की रक्त वाहू लागतं भळाभळा.
तिची आठवण माझ्याकरता तशी जखम
होती. आणि आता...जिनं जखम दिली
तीच माझ्या आयुष्यात त्या
जखमेचा इलाज बनून आली आहे. आई
जे चालू आहे ते, मला. हवं. आहे.
बस्स. मला अजून काही बोलायचं
नाही, मला अजून काही बघायचं
नाही.’
’अक्कल विकून
आल्यासारखं बोलू नकोस. तू एकटा
नाहीयेस आता. मोकळा नाहीयेस मन
म्हणेल तसं उधळत जायला. अरे,
तुझ्या प्रत्येक कृतीसोबत,
तिच्या अर्थांसोबत आणि
परिणामांसोबत सायलीसुद्धा
जोडल्या गेली आहे. तुला काहीच
कळत नाहीये का? जे काही तुझं
चालू आहे ना, त्यात तुझा छान
खेळ होतोय आणि तिचा जीव जातोय.
आणि खेळाखेळात कोणाचा जीव
घेण्याहून क्रूर दुसरं काहीच
नाही.’
’क्रूर?’ अद्वैत हसला.
’आई, मी प्रेमात पडलोय.
म्हणतात नं, ’इन द मिडल ऑफ ऍन
ऑर्डिनरी लाईफ, लव्ह गिव्हज्
यू अ फेअरीटेल.’ माझ्या
सामान्य आयुष्यात नेहा
परीकथा होऊन आली आहे. पण...
जाऊ दे आई. मी कितीही
प्रयत्न केला, तरी हे सारं
तुला नाही कळणार. मला काय
मिळतंय आणि मला काय वाटतंय आणि
कसे माझ्याकरता बाकी काही
अर्थ उरले नाहीयेत...मला खरंच
वाटलं होतं की तुला तरी हे
समजेल. पण...’ क्षणभर तो शांत
राहिला आणि मग म्हणाला, ’मला
आता ह्या विषयावर काहीही
बोलायचं नाही. दुसरं काही
बोलायचं असेल तर सांग आई.
नाहीतर मी निघतो आता. जेवायला
जायचं आहे, आणि नेहा वाट पाहत
आहे.’
मेधानं थरथरत्या
हातानं फोन ठेवला. आलेल्या
रागावर ताबा मिळवण्याचा
प्रयत्न करत ती काही क्षण बसून
राहिली. मग तिनं सायलीचा नंबर
लावला.
’काय गं, जेवलीस ना? की
आहेस अजून तशीच बसून?’ तिनं
विचारलं.
’जेवले.’ सायली
हसून म्हणाली. ’भूक लागलीच
होती. आणि तुमच्याशी
बोलल्यानं आधीपेक्षा थोडं
बरं सुद्धा वाटतंय. बोललात ना
तुम्ही त्याच्याशी?’
’हो.
बोलले. पोरी, तो वाहवत चाललाय.
लोक चुकतात आयुष्यात, नाही असं
नाही. पण आपल्या डोळ्यातलं
मुसळ आपल्याला दिसलं नाही तरी
जेव्हा ते दुसरं कोणी दाखवतं
त्यावेळॆस तरी मान्य करायला
पाहिजे की नाही ते तिथं आहे
म्हणून? त्याची याला तयारीच
नाहीये.’मेधा म्हणाली. ’आता
निर्णय तुला घ्यायचा आहे पोरी.
वाट पहायची, त्याच्याशी
बोलायचं, पाठ फिरवायची की आपला
रस्ता आता वेगळा झाला आहे हे
स्वत:लाच सांगायचं...तुलाच
ठरवायचं आहे तुला काय हवं आहे
ते.’
सायलीनं एक उसासा
सोडला.
मेधा पुढे म्हणाली,
’माझा मुलगा चुकतोय. आणि
जाणूनबुजून, आपलं चुकतंय हे
माहित असताना चुकतोय. हे मी
त्याच्याकडून कधीच अपेक्षिलं
नव्हतं. इतकं लक्षात ठेव, की
तुझा निर्णय काही का असेना,
त्यात माझी, आमची सोबत असेल
तुला.’
सायलीनं मान डोलावली.
आणि काहीतरी जुजबी बोलून फोन
ठेवला. राक्षसी आकार धारण करून
समोर अचानक उभ्या ठाकलेल्या
प्रश्नांकडे बघत ती बसून
राहिली.
लग्न झाल्यापासून आत्तापर्यंतचे सहा महिने अगदी छान गेले होते. तिच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा काळ होता तो. पण आता, मजेत खळखळत वाहत असलेल्या प्रवाहात एकदमच हे तिची नौका सहज बुडवून टाकू शकणारे भोवरे आले होते तिच्या समोर. आणि तिला एकटीलाच आता त्यांचा सामना करावा लागणार होता. ’निर्णय’ घ्यावा लागणार होता.
*
काही तासांचा एकांत, त्याच्या स्पर्शातली पृच्छा, आणि तिच्या नजरेतला लाजरा प्रतिसाद...अद्वैत आणि नेहाच्या प्रवासाचा अटळ असलेला मुक्काम गाठल्या गेला.
संघसहलीला गेले होते
ते. बेंगलोरजवळच्या एका
पंचतारांकित रिझोर्टला.
दुपारच्या जेवणाची वेळ
होईपर्यंत नेहमीचेच
’संघबांधणी’चे खेळ आणि
जेवणानंतर संध्याकाळ
होईपर्यंतचा वेळ सगळ्यांना
हवे ते करण्यासाठी मोकळा अशी
एकंदर योजना होती.
जेवण
झाल्यावर राम आणि काहींनी पूल
टेबलचा ताबा घेतला, काहींनी
क्रिकेटच्या मैदानाची वाट
धरली, काहींनी कॅरमभोवतीच्या
खुर्च्या पकडल्या, आणि
काहींनी रिझोर्टमागच्या
जंगलात फिरून येणं पसंद
केलं.
वातावरण सुरेखच होतं. आकाश ढगाळलेलं होतं आणि गार वारा सुटला होता. जंगलात फेरफटका मारून यावा असं अद्वैत आणि नेहा दोघांनाही वाटलं आणि ते निघाले.
पायवाटेवरून चालत चालत जंगलात आत आत जाताना त्यांचं एकमेकांशी चालू असलेलं बोलणं आपसूकच थांबलं. आसमंतातली बोलकी शांतता त्यांच्यामध्येही पसरली. वाटेतली एक चढण चढताना त्यानं पुढे केलेला हात तिनं पकडला. नंतर चालताना दोघांनी हात सोडवून घ्यायचा प्रयत्नही केला नाही.
अजून काही अंतर
चालल्यावर नेहानं
पायवाटेपासून थोडं आत
असलेल्या एका सळसळणाऱ्या
पिंपळाच्या झाडाकडे बोट
दाखवलं. अद्वैतनं मान डोलावली.
त्या झाडाखाली बसले दोघं.
एकमेकांकडे पाहत. नजरा न
हलवता.
आपल्या थरथरत्या
हातांत अद्वैतनं नेहाचा
चेहरा धरला. नेहाचे हात
अद्वैतच्या हातांवर विसावले.
तिच्या डोळ्यांमध्ये त्याला
संमती दिसली, इच्छा दिसली.
आणि तिथे, उघड्या आभाळाखाली, सळसळत्या पिंपळाच्या साक्षीनं नेहानं अद्वैतमध्ये तिचा आधार, तिचा पुरूष शोधला, आणि त्यानं तिच्यामध्ये शोधले त्याचे जगायचे राहून गेलेले क्षण.
*
त्याच्या साऱ्या अस्तित्वातून ओसंडणाऱ्या आनंदानं काय घडलंय ते सायलीला सांगितलं. पण तरीही, शंकेला जागा नको म्हणून तिनं अद्वैतला सरळच विचारलं. अद्वैतनं लगेच काही उत्तर दिलं नाही. त्याच्या मनात चालू झालेले हिशोब तिला त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसले.
झोपेत चालल्यासारखी पावलं टाकत तिनं कशीबशी बेडरूम गाठली आणि आतून दरवाजा लावून घेऊन ती पलंगावर कोसळली. कसंतरी भयंकर अपमानित, लज्जित वाटत होतं तिला. आपलं सारं अस्तित्व कःपदार्थ असल्यासारखं. आणि संताप संताप होत होता तिच्या जिवाचा. सगळ्याचाच राग, तिटकारा आला होता तिला. स्वतःचा आणि अद्वैतचाही. आत्ताच्या आत्ता इथून निघावं आणि परत आयुष्यात कधी अद्वैतचा चेहरासुद्धा पाहू नाही असं वाटत होतं. पण त्याच वेळेस, हॄदयाचं हे सांगणं तिची बुद्धी ऐकायला तयार नव्हती. आत असं सारं ढवळून निघत असताना कोणीतरी तिला बजावतही होतं, की डोक्यात राख घालू नकोस, आततातीपणे कसलाही निर्णय घेऊ नकोस.
भगिरथ प्रयत्नांनी ती उठली. डोळ्यांतून वाहू पाहणाऱ्या हतबलतेच्या अश्रूंना तिनं निग्रहानं थोपवलं. कपाटावरून तिनं एक बॅग काढली आणि कपाट उघडून काय हाताला येतील ते कपडे त्या बॅगमध्ये टाकले. कपाटाचं दार लावलं आणि दारावरच्या आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबाकडे पाहत तिनं स्वतःला विचारलं, ’तुला काय हवं आहे सायली? केवळ अद्वैतला अद्दल घडावी म्हणून तू निघून जाणार आहेस का? मुळात तुझं जाणं अद्वैतला शिक्षा वाटेलच याचीतरी तुला खात्री आहे का? तुला काय हवं आहे? तुझ्या आणि त्याच्यातले सारे बंध जाळून टाकायची तयारी आहे तुझी? तुझ्या अभिमानासाठी तू ह्या नात्याची किंमत देऊ शकतेस?’
आणि मग तिचं मन म्हणालं, ’आता खरा प्रश्न अद्वैतला काय हवं आहे हा आहे. लग्न नावाचं नातं अस्तित्वाला काचणारं काटेरी कुंपण व्हायला नको. माझ्याकरताही आणि त्याच्याकरताही. केवळ आम्ही नवरा बायको असणं पुरेसं नाही, एका छपराखाली जगायला. मी त्याला माझ्यासोबत त्याच्या इच्छेविरूद्ध जखडून ठेवू शकणार नाही, ठेवणारही नाही.’
तिनं एक निःश्वास सोडला. ’माझ्यासाठी स्वाभिमानापेक्षा मला त्याच्याबद्दल जे वाटतं ते जास्त मोलाचं आहे. मला त्याच्याशी बोललं पाहिजे. आत्ता.’
*
तिनं
दरवाजा उघडला. खोलीच्या बाहेर
पडत असताना तिच्या आवडत्या
लेखिकेचे शब्द तिच्या मनात
उमटले -
’घटना घडतात.
पुरातल्या ओंडक्यांसारखी
माणसं त्यात वाहून जातात.
पण
तरीही पर्याय असतातच समोर उभे
ठाकलेले...
त्यांच्यातला एकच
निवडता येणार असतो, आणि
निवडावा तर लागणारच असतो’
नकळतच तिच्या चेहऱ्यावर हसू
उमललं.
अद्वैत बाहेर बसला होता, त्याच्या लॅपटॉपवर काही करण्याचं सोंग करत. तिनं जाऊन लॅपटॉपचं झाकण बंद केलं, आणि ती , त्याच्याकडे एकटक पाहत त्याच्या समोर बसली. तिच्या नजरेस नजर मिळवणं त्याला शक्य झालं नाही. त्याची नजर खाली वळली.
काही क्षण शांततेत
गेले. मग अद्वैत गुरगुरला, ’मी
काहीही चुकीचं केलं नाहीये.’
’मै वही करूंगा जो मेरा करना
बनता है... हे म्हणणारा अद्वैत
तो हाच का?’ सायलीनं विचारलं.
’मला हवं ते करण्यातला मझा
मला पहिल्यांदाच जाणवतोय. मी
आईला जे सांगितलं होतं तेच
तुलाही सांगतो सायली, मला आजवर
दिल्या गेलेल्या नियमांनी
मला आता खेळायचं नाही. आता मी,
मी स्वतः माझ्यासाठी
केलेल्या नियमांनी खेळणार
आहे.’
सायलीनं डोळे मिटून
घेतले आणि आलेल्या रागावर
ताबा मिळवण्याचा प्रयत्न
केला. आपण अद्वैतशी का बोलायला
आलो आहोत त्याचं स्वत:ला स्मरण
करून दिलं. मग डोळे उघडून,
हसण्याचा प्रयत्न करत ती
म्हणाली, ’छान! इतका सगळा
विचार केलाच आहेस, तर हे ही
सांग की तू खेळ नेमका कोणासोबत
खेळतो आहेस? ’
त्यानं
तिच्याकडे प्रश्नार्थक
मुद्रेनं पाहिलं.
’एकटाच
खेळत असतास तर काही प्रश्नच
नव्हता, पण तसं नाहीये. आपण
खेळतोय हा खेळ, तू आणि मी.
एकमेकांशी. आणि तू किंवा मी
मोकळे नाही आहोत स्वतःला
हव्या त्या नियमांनी
खेळण्यासाठी. तुला हे समजावून
सांगण्याची वेळ यावी
माझ्यावर? की आपल्या कृतींची
समर्थनं शोधण्याच्या नादात
तू वस्तुस्थितीकडे पूर्ण
दुर्लक्ष करायचं ठरवलं आहेस?
राजा, कोणता खेळ असा खेळला
जातो? तुझं ते आवडतं क्रिकेट
खेळताना धाव कशाला म्हणायचं,
खेळाडू बाद कसा होणार, चौकार,
षटकार, जिंकणं, हरणं ह्या
शब्दांचे अर्थ काय हे सारं
दोन्ही संघांकरता सारखंच
असावं लागतं. दोन्ही संघांनी
फक्त स्वत: केलेले नियम पाळले
तर त्या खेळाचं काय होईल
सांग. आणि हे तर लग्न आहे!
जोपर्यंत आपली आयुष्यं
एकमेकांशी बांधली गेली आहेत,
तोपर्यंत तुला आणि मला हा खेळ
वेगवेगळे नियम घेऊन
एकमेकांशी नाही खेळता येणार.
’लग्न’ तुला इतकी कॅज्युअली
घ्यायची बाब वाटते का? गाजराची
पुंगी; वाजवली, मोडून खाल्ली
आणि लुसलुशीत गवत दिसताच
टाकूनही दिली. आणि इतकंच नाही,
तर जेव्हा लहर आली तेव्हा परत
येऊन उचलली, अजून
वाजवण्यासाठी, मोडून
खाण्यासाठी... असं असेल तर
ह्यात पडलासच कशाला? घरातल्या
घरात कायमची एक हक्काची बाई
मिळते म्हणून?
राजा, जे तू
स्वतः, कसल्याही
जोरजबरदस्तीविना, स्वतःच्या
मर्जीनं, स्वत:च्या आयुष्यात
स्वत:करता सुरू केलं आहेस, ते
टिकवायची जबाबदारी तुझी
बिल्कुल नाही का? ’श्रेयस’ आणि
’प्रेयस’ मध्ये प्रेयस
नेहमीच निवडता येत नाही हे
तुला मानायचंच नाही का? आणि
म्हणे, माझे नियम!’
’तुला
काहीच माहीत नाही सायली. काहीच
नाही. मी विचार न करता म्हणलो
नव्हतो, मी काहीही चुकीचं केलं
नाहीये असं. ती माझ्याकरता काय
आहे, आणि मला ह्या नात्यातून
काय मिळतंय...’
’बस्स.
सांगितलंय मला सासूबाईंनी,
तुझ्या आत फुललेल्या
आनंदाच्या झाडाबद्दल.’ एकेका
शब्दावर जोर देत सायली
म्हणाली. ’जर ती तुझ्याकरता
इतकं सगळं काही आहे, तर मला का
मोकळं नाही केलंस, जे
माझ्याकरता अजूनही नातं आहे
आणि तुझ्याकरता जे एव्हाना
बंधन झालं असेल त्यातून? तिनं
विचारलं. ’जर तुझ्या मनात तीच
होती, तर तिच्यासोबत जे काही
नातं आहे तुझं, त्यात तू पूर्ण
१००% का राहिला नाहीस? जर
तुझ्या मनात तीच होती, तर
माझ्यासोबत जगलेल्या
रात्रींचं काय? दिवसांचं काय,
आयुष्याचं काय? की तुझ्या
इंटिग्रिटीपेक्षा तुझी ’सोय’
महत्वाची वाटली तुला? सांग ना,
फक्त स्वत:ची सोय पाहिलीस ना
तू? दिवसा ऑफिसमध्ये नेहा, आणि
रात्री सायली... असा विचार
केलास ना तू? दोन्ही डगरींवर
हात ठेवून जगण्याचा प्रयत्न
केलास ना? आणि ते तुला करता
येईल असं वाटलं तुला? राजा,
सर्कसमधला झुल्यांचा खेळ
पाहिला आहेस ना? दुसरा झुला
पकडण्यासाठी पहिला झुला
सोडावाच लागतो. दोन्ही झुले
पकडायचे ठरवलेस, तर अधांतरी
लटकत राहशील. कुठेच जाऊ शकणार
नाहीस.
निवड कर नवऱ्या. निवड करण्याची मुभा तुला नक्कीच आहे. नेहा ’किंवा’ सायली. पण इतकं लक्षात ठेव, नेहा ’आणि’ सायली हा पर्याय तिला मान्य असला तरी मी हा पर्याय प्रत्यक्षात येऊ देणार नाही. तुला काहीतरी एकच निवडता येईल, आणि तुला निवड करावीच लागेल.
अद्वैत काहीच बोलला नाही. सायली पुढे म्हणाली, ’आणि मी हे सगळं तुझ्याशी का बोलतीये? कारण मी काही तुझ्यासोबत डोळे मिटून लग्न केलं नव्हतं. तू माझी निवड होतास... आणि आहेस. आपल्या तारा जुळतील असं वाटलं होतं. आणि दोघांमधलं काही कोण्या तिसरीमुळे बिघडत नसतं हे जरी खरं असलं, तरी ही नेहा येईपर्यंत आपलं छानच चालू होतं की. काही सुखद धक्के, काही अपेक्षाभंग, काही शोधणं, काही गवसणं...मी खुष होते तुझ्यासोबत. तू मला आवडला होतास, आवडतोस अजूनही.
राजा, मी तुला आपलं मानलं आहे. त्यामुळे जीवघेणे परिणाम होताहेत तुझ्या वागण्याचे माझ्यावर. आणि म्हणूनच मी तुझ्याशी हे सगळं बोलतीये. तुला जागं करायला. परिस्थितीची पूर्ण कल्पना देऊन मग तुला निवड करण्याला सोडण्याला.तुला तुझ्यासमोरचे सारे रस्ते दिसू देत. मग त्यातल्या कुठल्या रस्त्यावरून चालायचं ते तू ठरव.
तू मला हवं ते निवडलं नाहीस तर माझीच निवड चुकली असं समजून मी आयुष्याचं हे पान उलटीन. ते करताना कितीही त्रास झाला तरी... पण नवऱ्या, मी स्वत:ला तुझी सुरक्षितता, तुझी लहर, तुझं कुंकू लावणारी आणि तुझं घर सांभाळणारी होऊ देणार नाही. हा माझा निर्णय आहे.’
सायली उठली. आत जाऊन तिनं बॅग आणली. बाहेर येऊन पायात चपला घालताना ती म्हणाली, ’सासूबाईंकडे असेन मी. मला शक्य आहे तोवर वाट पाहीन...तुझी.’ मघाशी रोखलेलं पाणी डोळ्यांतून आता बाहेर येतंय की काय असं तिला वाटलं. आपले अश्रू अद्वैतला दिसू नयेत म्हणून ती गर्रकन वळली. तिचं पाऊल दाराबाहेर पडत असताना त्याचे शब्द आले,’थांब राणी, थांब.’
सायली थबकली. उठून तो तिच्यापर्यंत चालत आला. तिच्या खांद्यांवर हात ठेऊन हळूवार आवाजात म्हणाला, ’मला वेळ दे राणी. विचार करायला.’
कडवट हसत सायलीनं रोखलेलं पाऊल पुढे टाकलं. मागे वळून न पाहता ती फाटकाच्या बाहेर पडली. न थांबता चालत राहिली...अद्वैतपासून दूर दूर जात राहिली.
अद्वैत तिच्या हळूहळू लहान होत जाणाऱ्या आकृतीकडे पाहत, किंकर्तव्यविमूढ होतासा तिथेच उंबरठ्यावर उभा राहिला.
***
उत्तम लेखनशैली
लेखनशैली उत्तम पण कथाबीज नेहमीचेच ! नव्या कथाबीजांवर चांगल्या कथा लिहू शकाल शुभेच्छा !जबरदस्त
कथा रंगवण्याची हातोटी उत्तम आहे. काही सुरुवातीचे तपशील विशेष आवडले नाहीत, पण कथा चांगली रंगली आहे. विशेषतः सायलीचे पात्र.सुंदर मांडणी
कथेची मांडणी फ़ार छान केली आहे.पऱंतु शेवट अपूर्ण वाटला ...
मांडणी आवडली.
कथा चांगली उतरली आहे. शेवट अपूर्णही वाटला नाही, व्यवस्थित आहे, जेथे संपायला हवी तिथेच कथा संपते. प्रत्येक गोष्ट स्पष्ट करून सांगण्यापेक्षा वाचकांना शेवट निवडण्याची मुभा देणेच बरे वाटते.
अर्थात, एखाद्याला अपूर्ण वाटणेही शक्य आहे त्याकरता असे एक दोन अद्वैत मी समाजात खूप जवळून पाहिले आहेत. सायलीच्या बोलण्यावर थोडेसे शरमिंदे होऊन नंतर तिला कायमाचा डच्चू देऊन आपल्या नेहा समवेत "सुखी" आहेत. फक्त फरक एवढाच की यातील एका अद्वैताला नेहा भेटली तेव्हा सात वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा होता (म्हणजे बरा आठ नऊ वर्षांचा संसार झालेला होता.) दुसरा बराच प्रसिद्ध व्यक्ती असल्याने न बोलणे सोयिस्कर -- पहिल्याची गोष्ट अगदी आमच्या जवळपास घडलेली म्हणूनच वास्तविक वाटली.
उत्तम
उत्तम कथा.
सुवर्ण पदक
छान, मला खूपच आवडली कथा.... सुरुवात आणि शेवट झकास, वास्तवा कडे झुकणारा.... मला मनोगत वर आवडलेल्या कथा मध्ये टॉप १० नक्कीच..
राज
सुरेख
सुरेख लेखन केले आहे, सर्व बाजू मांडून त्या मध्ये खरी कुठली ते नेमके समजावले आहे. "लग्न" काय आहे हे समजले आणि उमजले पण.छान
कथा चांगली जमली आहे. घटनांची साहजिकता, सायलीचे विचार करणे उत्तम व्यक्त झाले आहे.
शेवटच्या संवादात सायलीचे 'नवऱ्या' म्हणणे प्रवाही वाटत नाही.
धन्यवाद!
प्रतिसादांबद्दल
मनापासून आभार!
खरोखर, हुरूप
वाढवणारे प्रतिसाद
आहेत.
कथाबीज नेहमीचेच आहे,
एवढंच नाही, तर अद्वैत-नेहा
मधल्या घटनासुद्धा
नेहमीच्याच आहेत हे मला अगदी
पूर्णपणे मान्य आहे. कथेचा
उद्देश 'एका पात्राच्या
तोंडून माझे लग्नविषयक फंडे
देणे' हा होता, आणि डोक्यात
काही दुसरे आलेच नाही.
अनुताई, सुरूवातीचे तपशील अद्वैतच्या नेहाबद्दलच्या भावनांची तीव्रता दर्शवण्यासाठी गरजेचे आहेत असं मला वाटलं.
कथेचा शेवट अपूर्ण वाटू शकतो. कथा सुचली तेव्हा अद्वैत 'सुधरतो' असाच शेवट होता. पण लिहिताना दिसलं की फक्त कथेचा शेवट आलाय म्हणून अद्वैत एकदम बदलतो असं मी दाखवू शकत नाही. ते अद्वैतच्या व्यक्तिमत्वाशी सुसंगत होणार नाही. म्हणून 'किंकर्तव्यविमूढ' शब्दासोबत कथा संपवली.
परत एकदा, सर्वांचे मनापासून आभार!
पहिलीच पूर्ण कथा लिहिल्यावर त्या कथेवरचे प्रतिसाद माझ्यासाठी खरंच अनमोल आहेत. हौसला-अफजाही के लिये शुक्रिया!!!
छान...
उत्तम लिहिले आहे...
न पटणारी.....
कथा चांगली झाली आहे.
पण, समस्येच्या भावनिक विवेचनात अपयश आले आहे असे वाटते.
सहाच महिन्यांच्या समाधानी संसारातून एकाएकी 'मन' उडून जुन्या पण नव्याने भेटलेल्या मैत्रिणीकडे धावावे हे अनाकलनीय वाटते. म्हणजे मुळात 'सायली'शी विवाह हा मनापासून होता की नाही ही शंका येते. अतिशय नगण्य टक्केवारीत पुरूष असे वागत असावेत. इतक्या पराकोटीचा बेजबाबदारपणा 'अद्वैतच्या' व्यक्तिमत्त्वाला फारच उथळपणा आणतो आहे. 'अद्वैत' नांव धारण करणाऱ्या व्यक्तीच्या मनात स्वतःच्या पत्नीबाबत इतके 'द्वैत' असावे हा दैवदुर्विलास आहे असे म्हणून सोडून द्यावे काय?
'नेहा'
स्वतः दु:खी आहे. तिला
विस्कटलेल्या संसाराचे 'दु:ख'
हे किती व कसे जाळते ह्याचा
अनुभव आहे (असे वाटते). तरीपण ती
'सायली'च्या आयुष्यात दु:खाची
जाळपोळ करण्यास आणि त्यांचा
संसार उध्वस्त करण्यास
उद्युक्त होते, ह्यावरून
तिच्या व्यक्तिमत्त्वातही
उथळपणा कसा भरभरून वाहतो आहे,
हेच जाणवते. भावनिक
कोरडेपणाच्या ह्या कथेत
शरीरसंबंधालाच 'प्रेम'
मानलेले दिसून येते आहे हे
पुढील वाक्यांमधूनही जाणवते.
जर तुझ्या मनात तीच
होती, तर माझ्यासोबत जगलेल्या
रात्रींचं काय? ....दिवसा
ऑफिसमध्ये नेहा, आणि रात्री
सायली...
सुरूवातीचे तपशील अद्वैतच्या नेहाबद्दलच्या भावनांची तीव्रता दर्शवण्यासाठी गरजेचे आहेत असं मला वाटलं.
चुकीचे आहे ते. 'त्या' तपशिलातील वर्णन, 'शारीरिक आणि अनैसर्गिक' आहे. त्यात, भावनांची तीव्रता दिसून न येता शारीरिक अतृप्त तहान प्रकर्षाने जाणवते आहे.
कथेचा शेवट कसा करावा ह्याचे स्वातंत्र्य लेखकाला जरूर आहे. पण लेखकाने अद्वैतची बाजू कमकुवत आणि सायलीची बाजू मजबूत बांधली आहे. अद्वैतचे विचार उथळ वाटावेत आणि सायलीला वाचकाची सहानुभूती मिळावी अशी कथेची मांडणी लेखकाने जाणूनबुजून केली आहे. त्यातून त्याने स्वतःचे मत मांडले आहेच पण वाचकांचा कल ही हेतुपुरस्सरपणे 'त्या' शेवटाप्रत वळविला आहे. असे असताना 'तसा' शेवट न देता अर्धवट अवस्थेत (शेवट) सोडून देऊन लेखकाने काय साधले आहे कळत नाही.
पण तरीही, कथा चांगली आहे. त्यातील मुद्द्यांचा, कथावस्तूचा, भावनांचा विस्ताराने विचार व्हायला हवा होता. तसे झाले असते तर कथेच्या सौंदर्यात भर पडली असती.
अभिनंदन.
गोंधळ उडाला का?
प्र. पेठकर यांस,
जेव्हा कथा ही लेखकाचे विचार व्यक्त करण्याचे माध्यम असते... तेव्हा तुम्ही उभ्या केलेल्या शंका फ़ारश्या गंभीर वाटत नाहीत.
आणि मानसशास्त्राचा (माजी) विद्यार्थी म्हणून मी हे सांगू इच्छितो की इथे शरीर-मन ह्यांच्या परस्पर संबंधांबाबत इथे जे काही आले आहे, तसेच प्रियालीताईंनी जे नेहाबद्दल लिहिले आहे ते संपूर्ण सत्य आहे. आणि, हे माहिती असायला मानसशास्त्राचा विद्यार्थी असणे गरजेचे नाही! आज सर्व सामान्य जनांनाही एवढे मानसशास्त्र माहिती असते!
अमेझिन्ग म्हणतात ते हेच
अमेझिन्ग म्हणतात ते हेचमाझे मत
सहाच महिन्यांच्या समाधानी संसारातून एकाएकी 'मन' उडून जुन्या पण नव्याने भेटलेल्या मैत्रिणीकडे धावावे हे अनाकलनीय वाटते. म्हणजे मुळात 'सायली'शी विवाह हा मनापासून होता की नाही ही शंका येते. अतिशय नगण्य टक्केवारीत पुरूष असे वागत असावेत. इतक्या पराकोटीचा बेजबाबदारपणा 'अद्वैतच्या' व्यक्तिमत्त्वाला फारच उथळपणा आणतो आहे. 'अद्वैत' नांव धारण करणाऱ्या व्यक्तीच्या मनात स्वतःच्या पत्नीबाबत इतके 'द्वैत' असावे हा दैवदुर्विलास आहे असे म्हणून सोडून द्यावे काय?
मान्य. अद्वैतबद्दल हेच आक्षेप कथेच्या अजून काही वाचकांनी सुद्धा नोंदवले आहेत. माझ्या मनात अद्वैत आणि त्याच्या कृतींमागची 'त्याची' कारणं कायमच स्पष्ट होती. जर हे वाचकांना स्पष्ट होत नसेल, तर ते माझं अपयश म्हणायला हवं.
तिला विस्कटलेल्या संसाराचे 'दु:ख' हे किती व कसे जाळते ह्याचा अनुभव आहे.
तिच्या आणि सायलीच्या दुःखाची कारणं, जातकुळी वेगळी आहे. तिला हवा आहे तो आधार, पोळून आल्यानंतर. ती 'उथळ' आहे का? की तिनं (थोडंफार अद्वैतसारखंच) स्वतःला काय मिळतंय हे पाहताना बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आहे? अर्थात, नेहाचे 'मोटिव्ह' जर तुम्हाला दिसत नसतील, तर ते ही माझं अपयशच आहे.
भावनिक कोरडेपणाच्या ह्या कथेत शरीरसंबंधालाच 'प्रेम' मानलेले दिसून येते आहे हे पुढील वाक्यांमधूनही जाणवते.....त्यात, भावनांची तीव्रता दिसून न येता शारीरिक अतृप्त तहान प्रकर्षाने जाणवते आहे.
अं.....शरीर हे मनाचं 'मिडियम ऑफ एक्सप्रेशन' असं काहीसं मला वाटतं. शारीर कृती ही एकटी, 'आयसोलेटेड' नसते, तिच्याकडे मनाच्या संदर्भांशिवाय पाहूही नये. म्हणूनच मला वीर्यपात शारीरिक अतृप्त तहान नाही, तर त्याच्या भावनांची तीव्रता दाखवणारा वाटतो. म्हणूनच माझी सायली 'निर्णय' घेते, ते तिला आपल्या नवऱ्यात आणि त्याच्या मैत्रिणीत जे घडलंय ते कळल्यावर. नवऱ्याचं मन कुणीकडे चाललंय ते तिला कळलेलं असतं, पण जेव्हा नवरा स्वतःहून ती शारीर कृती करतो, तेव्हा त्यानं सीमारेषा ओलांडल्या आहेत अशी सायलीची धारणा होते. ह्या दोन्ही गोष्टींमागचे, आणि सायलीच्या ''जर तुझ्या मनात तीच होती, तर माझ्यासोबत जगलेल्या रात्रींचं काय? ....दिवसा ऑफिसमध्ये नेहा, आणि रात्री सायली...' ह्या वाक्यांमागचेही माझे विचार वर दिल्याप्रमाणे आहेत. मनात तर लाख काही काही असतं, पण जेव्हा माणूस 'कृती' करतो, तेव्हा तो त्याच्याच मनातल्या अमूर्त कशालातली प्रत्यक्षात आणत असतो.
मन आणि शरीराच्या परस्परसंबंधांकडे असं पाहताना मला ह्या कथेत भावनिक कोरडेपणा आणि शरीराला उगाच महत्त्व दिलेलं दिसत नाही.
असे असताना 'तसा' शेवट न देता अर्धवट अवस्थेत (शेवट) सोडून देऊन लेखकाने काय साधले आहे कळत नाही.
अद्वैत उथळ वाटतो,
त्याची बाजू नक्कीच कमकूवत
आहे. पण म्हणून तो एकदम बदलून
जाईल असं दाखवणं मला चुकीचं
वाटलं. तो फक्त विचार करीन असं
म्हणतो, म्हणून सायली निघून
जाते.
(जे काही सायली तिथं
बोलली आहे, ते तिनं आचरणातही
आणलं आहे.)
असो. कथा मी वर एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणं माझे लग्नविषयक फंडे द्यायला लिहिली होती. आता असं वाटतंय की मी कथेकडे माझं 'माध्यम' म्हणून न बघता कथेचा 'कथा' म्हणून अजून जास्त विचार करायला हवा होता. पुढच्या वेळी लिहिताना हे नक्की ध्यानात ठेवीन.
धन्यवाद!!
आपला अधिकार आहे...
प्रियाली ह्यांच्या प्रतिसादातील खालील परिच्छेद मला पटला :
'प्रेमभंग किंवा डिवोर्स झालेली व्यक्ती इंस्टंट आधार शोधण्यासाठी खूप चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता असते. समोरच्याचा सारासार विचार सोडाच परंतु अशी व्यक्ती स्वतःचेही चांगले वाईट या काळात जोखू शकत नाही.'
शक्यता आहे. नेहाच्या बाबतीतही हेच घडले असेल असे समजून चालू.
पण,
'आज सर्व सामान्य जनांनाही एवढे मानसशास्त्र माहिती असते!' हे तुमचे वाक्य माझ्यासारख्या सामान्य कुवतही नसलेल्या व्यक्तीस पटले नाही. असो. पण आपण सुरुवातीलाच आपल्या मानसशास्त्रीय अभ्यासाचा उल्लेख केला आहे तेंव्हा तो तुमचा अधिकारच आहे. असो.
पुन्हा
पुन्हा एकदा गोष्ट वाचली व नंतरचे प्रतिसाद.
सहाच महिन्यांच्या समाधानी संसारातून एकाएकी 'मन' उडून जुन्या पण नव्याने भेटलेल्या मैत्रिणीकडे धावावे हे अनाकलनीय वाटते.
सहाच महिने झाले असल्याने भावनिक बंध अजून तितके घट्ट, सशक्त झाले नसावेत असे समजायला वाव आहे. रोजच्या आयुष्यात सुखी असला तरी 'प्रेमात पडण्याचा', आणि त्या प्रेमाला प्रतिसाद मिळण्याचा अनुभव अद्वैतला हवाहवासा आहे. 'नेहा' या स्वप्नातल्या सुंदरीने त्याचा आधार मागावा, त्याच्यावर विश्वासावे, त्याच्या प्रेमात पडावे, या नशेतून तो बाहेर येऊ शकत नाही. त्याच्या आईला तो सांगतो तसे तो इतका आनंदी आहे की तो आणखी कुणाचा विचारच करू शकत नाही.
आणि समजा त्याने सायलीचा विचार करून नेहापासून लांब रहायचे ठरवले तर दुःखी कोण होणार? तो स्वतः! सरासरी माणसे स्वतःच्या सुखाला पहिले प्राधान्य देतात. त्यामुळे अद्वैतचे वागणे अजिबात 'वेगळे' वाटत नाही.
नेहाची परिस्थिती
'नेहा' स्वतः दु:खी आहे. तिला विस्कटलेल्या संसाराचे 'दु:ख' हे किती व कसे जाळते ह्याचा अनुभव आहे (असे वाटते). तरीपण ती 'सायली'च्या आयुष्यात दु:खाची जाळपोळ करण्यास आणि त्यांचा संसार उध्वस्त करण्यास उद्युक्त होते, ह्यावरून तिच्या व्यक्तिमत्त्वातही उथळपणा कसा भरभरून वाहतो आहे, हेच जाणवते.
एक कथा म्हणून मला त्यात गैर वाटले नाही. अमेरिकेत प्रेमात/ लग्नात 'रिबाउंड' अशी एक संज्ञा वापरली जाते. (अमेरिकन इंग्रजीत, 'एक्सवायझी इज ऑन रिबाउंड' असे म्हटले जाते.) यात प्रेमभंग किंवा डिवोर्स झालेली व्यक्ती इंस्टंट आधार शोधण्यासाठी खूप चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता असते. समोरच्याचा सारासार विचार सोडाच परंतु अशी व्यक्ती स्वतःचेही चांगले वाईट या काळात जोखू शकत नाही.
एक उदाहरण म्हणून द्यायचे झाले तर 'अर्थ' आणि 'आखिर क्यों' यासारख्या मोडलेल्या घरे, फसवणूक, दुसरे लग्न इ. विषयांवरील चित्रपटात काम करणारी अतिशय गुणी अभिनेत्री स्मिता पाटील हीचे व्यक्तीमत्व पाहा. ते कोणत्याही प्रकारे उथळ दिसत नाही तरीही ती राज बब्बरसारख्या दोन मुलांच्या विवाहीत बापाशी लग्न करून मोकळी होते. तिने कोणताच सारासार विचार केला नसेल का? बरीच माणसे आपल्या जीवनातील ताण मोकळा करण्यासाठी असे टोकाचे निर्णय घेतात त्यात कोणतेही नाविन्य नाही.
अं.... एक खुलासा...
पेठकर साहेब,
पहिल्यांदा, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, i'm sorry. तुमच्या प्रतिसादावरून असे स्पष्ट दिसते की तुम्हाला राग आला आहे आणि खरं सांगू, यायलाच हवा. नेट कॅफ़ेतून घरी जाताना मी ही हाच विचार करत होतो की माझी भाषा जरा जास्तच स्ट्राँग झाली आहे आणि ते सुद्धा गरज नसताना...
पण मुद्दा हा, की, ही कथा मला प्रचंड आवडली, आणि मला आवडलेली कथा तुम्हला न पटणारी वगैरे वाटली हयाचे मला वाईट वाटले...... त्यामुळेच..
मी अजुन लहान आहे हेच खरे. ती कथा पठडीतली नाही, आणि अशा कथा आवडल्या की खुपच आवडतात हे तुम्हीही मान्य कराल...
प्रेम आणि शारीरिक गरज...
अं.....शरीर हे
मनाचं 'मिडियम ऑफ एक्सप्रेशन'
असं काहीसं मला वाटतं. शारीर
कृती ही एकटी, 'आयसोलेटेड' नसते,
तिच्याकडे मनाच्या
संदर्भांशिवाय पाहूही नये.
मनाच्या संदर्भाशिवाय मी पाहतही नाहीए. पण मनाचा हा संदर्भ 'प्रेम भावनेचा' नसून 'वासनेचा' आहे. तासाभरापूर्वी पत्नी सोबत रत झाल्यावरही जर स्वप्नात दुसऱ्या स्त्री सोबत शरीर स्पर्शातून विर्यपात होत असेल तर ते अनैसर्गिकही आहे.
म्हणूनच
माझी सायली 'निर्णय' घेते, ते
तिला आपल्या नवऱ्यात आणि
त्याच्या मैत्रिणीत जे घडलंय
ते कळल्यावर. नवऱ्याचं मन
कुणीकडे चाललंय ते तिला
कळलेलं असतं, पण जेव्हा नवरा
स्वतःहून ती शारीर कृती करतो,
तेव्हा त्यानं सीमारेषा
ओलांडल्या आहेत अशी सायलीची
धारणा होते.
सायलीने आधीच सावध व्हायला हवे होते. प्रत्यक्ष कृती घडेपर्यंत वाट का पाहावी? पहिल्याच दिवशी आपल्या घरी आलेली नवऱ्याची मैत्रीण रात्रभर गप्पा मारत बसते आणि सायली बेडरूम मध्ये जाऊन निजते? कथा भराभर पुढे नेण्याच्या प्रयत्नात स्त्रीच्या (किंवा पुरुषाच्याही) स्वाभाविक प्रतिक्रियांचा विचारही केला नाही. त्यामुळे सायलीचे कृत्य (बेडरूम मध्ये जाऊन निजणे) आत्मघाती वाटते. तसेच नेहाही, मित्राची पत्नी संभाषणात भाग न घेता बेडरूम मध्ये जाऊन निजली, ह्याला विशेष महत्त्व देत नाही. तिचे ते वागणेही स्वाभाविक प्रतिक्रियांच्या विपरित आहे.
ह्या दोन्ही गोष्टींमागचे, आणि सायलीच्या ''जर तुझ्या मनात तीच होती, तर माझ्यासोबत जगलेल्या रात्रींचं काय? ....दिवसा ऑफिसमध्ये नेहा, आणि रात्री सायली...' ह्या वाक्यांमागचेही माझे विचार वर दिल्याप्रमाणे आहेत.
सायलीने असे म्हणायला हवे होते 'तुझ्या मनात तीच होती तर माझ्या आयुष्यात का आलास? (रात्रीचा संदर्भ नको). ऑफिसमध्ये नेहा आणि घरी सायली...(रात्रीचा संदर्भ नको).'
असो. तुम्ही एका वेगळ्या पातळीवर लेखन केले आहे, मी एका वेगळ्या पातळीवरून ते वाचले. जसे कथानकातून तुम्ही तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे तसा प्रतिसादातून मी माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
राग नसावा.
पेठकरांशी सहमत
कथा आवडली, मात्र तृटींच्या बाबतीत पेठकरांशी पूर्णपणे सहमत. सायलीने आत जाऊन झोपणे, आयुष्याऐवजी केवळ रात्रींचा विचार करणे, स्वाभाविक प्रतिक्रियांचा अभाव, वगैरे त्यांचे सर्व मुद्दे पटले. मात्र कथेचा प्रयत्न नक्कीच चांगला आहे.नैतिक - अनैतिक
या कथेस प्रभाकर पेठकरांनी दिलेल्या प्रतिसाद-उपप्रतिसादांवरून असे वाटते की ते कळत-नकळत आपल्या नैतिकतेच्या कल्पना कथेतील पात्रांवर लादू पाहत आहेत, आपल्या नैतिक-सामाजिक चौकटीत त्यांना बसवू पाहत आहेत व ती त्यात बसत नाहीत असे दिसल्यावर नाराज होत आहेत. कथेचा आस्वाद घेण्याची वा समीक्षेची ही पद्धत मला तरी पटत नाही. आपण वाचत असलेल्या साहित्यातील साऱ्या पात्रांनी आपल्याला योग्य वाटेल तसेच वागणे अपेक्षित नसते. माणसा-माणसात फरक असायचाच. पेठकर ज्या नैतिकतेचा आग्रह धरतात ती समाजमान्य असली तरी सगळ्यांकडून सदा-सर्वदा खरोखरीच पाळली जाते का? माणसे (स्त्रिया व पुरुष दोन्ही) स्खलनशील असतात व यावच्चंद्रदिवाकरौ तशीच राहणार. जो शारीर मोह देवादिकांना व ऋषी-मुनींना चुकला नाही, आवरता आला नाही तो सामान्य माणसांना कधीही होणर नाही, त्यास ती कधीही बळी पडणार नाहीत हे अशक्य आहे.इतक्या पराकोटीचा बेजबाबदारपणा 'अद्वैतच्या' व्यक्तिमत्त्वाला फारच उथळपणा आणतो आहे. 'अद्वैत' नांव धारण करणाऱ्या व्यक्तीच्या मनात स्वतःच्या पत्नीबाबत इतके 'द्वैत' असावे हा दैवदुर्विलास आहे असे म्हणून सोडून द्यावे काय?
'नेहा' स्वतः दु:खी आहे. तिला विस्कटलेल्या संसाराचे 'दु:ख' हे किती व कसे जाळते ह्याचा अनुभव आहे (असे वाटते). तरीपण ती 'सायली'च्या आयुष्यात दु:खाची जाळपोळ करण्यास आणि त्यांचा संसार उध्वस्त करण्यास उद्युक्त होते, ह्यावरून तिच्या व्यक्तिमत्त्वातही उथळपणा कसा भरभरून वाहतो आहे, हेच जाणवते. भावनिक कोरडेपणाच्या ह्या कथेत शरीरसंबंधालाच 'प्रेम' मानलेले दिसून येते आहे हे पुढील वाक्यांमधूनही जाणवते.
'त्या' तपशिलातील वर्णन, 'शारीरिक आणि अनैसर्गिक' आहे.
सायलीने असे म्हणायला हवे होते 'तुझ्या मनात तीच होती तर माझ्या आयुष्यात का आलास? (रात्रीचा संदर्भ नको). ऑफिसमध्ये नेहा आणि घरी सायली...(रात्रीचा संदर्भ नको).'
रात्रीचा संदर्भ का नको? एक अपमानित, चिडलेली पत्नी आपल्या पतीशी त्याच्या व्यभिचाराविषयी एकांतात बोलते आहे हे लक्षात घ्या. तसेच या वाक्यात लेखकाने अश्लीलता आणलेली नाही वा पातळी सोडली नाही.
नाहीतर सलमान खान, विवेक ऑबेरॉय इत्यादींनी हाताळल्यावर अभिषेकने ऐश्वर्याशी लग्न का केले असते?
कथेच्या
पात्राच्या तोंडी "...माझ्यासोबत जगलेल्या
रात्रींचं काय? ....दिवसा
ऑफिसमध्ये नेहा, आणि रात्री
सायली...' हे वाक्य ज्यांना
रुचत नाही ते
पेठकर खऱ्याखुऱ्या ऐश्वर्याबद्दल "हाताळल्यावर" हा शब्द
किती सहजपणे वापरून जातात. इथे ऐश्वर्याचा
बचाव करण्याचा माझा उद्देश
नाही (तिची ती समर्थ आहे!)
कथेचा शेवटी प्रश्न
अनुत्तरित ठेवणे मला योग्य
वाटले. ही काही लहान मुलांसाठी
बोधकथा नाही. दरवेळी वाचकांना
चमच्याने भरवण्याची काय गरज?
जो तो विचार करून आपल्याला हवा
तसा शेवट कल्पू शकतो. तसेच
साऱ्याच प्रश्नांना सोपी
उत्तरे नसतात.
माझे मत
आता अद्वैत आणि नेहा यांच्यातील संबंधाला कारणीभूत 'वासना' आहे की 'प्रेम' हे बघण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. अशा 'आयटी' कथा आसपास घडतात हे खरे. एकंदरच पुरुषांसाठी स्त्रियांची उपलब्धता वाढली आहे. आणि स्त्रियांसाठीही. त्यामुळे आता प्रमाणही वाढले आहे.धन्यवाद..
धन्यवाद श्री. प्लुटो,
i'm sorry.
ह्याला धाडस लागते.
पण मुद्दा हा, की, ही कथा मला प्रचंड आवडली, आणि मला आवडलेली कथा तुम्हला न पटणारी वगैरे वाटली हयाचे मला वाईट वाटले...... त्यामुळेच..
हं...! कथा चांगली आहे ह्यात वाद नाही. पण ती निर्दोषही नाही. म्हणून त्यातील काही तांत्रिक आणि भावनिक दोष चर्चिण्याचा माझा प्रयत्न होता. लेखकानेही ते सौम्यतेनेच घेतले आहे. हा त्यांचाही मोठेपणाच. असो.
काहीसे पटले...
प्रेमभंग किंवा डिवोर्स झालेली व्यक्ती इंस्टंट आधार शोधण्यासाठी खूप चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता असते. समोरच्याचा सारासार विचार सोडाच परंतु अशी व्यक्ती स्वतःचेही चांगले वाईट या काळात जोखू शकत नाही.
हं! मुद्दा पटला आहे.
एक उदाहरण म्हणून
द्यायचे झाले तर 'अर्थ' आणि
'आखिर क्यों' यासारख्या
मोडलेल्या घरे, फसवणूक, दुसरे
लग्न इ.
विषयांवरील चित्रपटात काम
करणारी अतिशय गुणी अभिनेत्री
स्मिता पाटील हीचे
व्यक्तीमत्व पाहा. ते
कोणत्याही प्रकारे उथळ दिसत
नाही तरीही ती राज
बब्बरसारख्या दोन मुलांच्या
विवाहीत बापाशी लग्न करून
मोकळी होते.
अभिनेते आणि
अभिनेत्र्या ह्यांच्या बद्दल
जे जे 'छापून' येते ते
पाहिल्यावर प्रेम आणि लग्न
ह्या विषयात त्यांना विशेष
अधिकार बहाल केले आहेत असे
जाणवते. सर्वसामान्यांचे
नियम त्यांना लागू होत नाहीत.
नाहीतर सलमान खान, विवेक
ऑबेरॉय इत्यादींनी
हाताळल्यावर अभिषेकने
ऐश्वर्याशी लग्न का केले असते?
गहिऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या
अमिताभचे रेखा बरोबरीच्या
संबंधांचे किस्से का कानी
यावे? असो.
एखाद्या स्त्रीने
आपल्या नवऱ्याशी विभक्त होऊन
दुसऱ्या पुरुषाशी लग्न
केल्याची उदाहरणे कमी नाहीत.
पण अद्वैतचे लग्न सहाच
महिन्यांपूर्वी झाले आहे
ह्या पार्श्वभूमीवर नेहाचे
अद्वैतवर खरे मनापासून प्रेम
असेल तर ती त्याला असे वागू
देणार नाही. त्याला असे
वागण्यापासून परावृत्त करेल.
पण शारीरिक ओढ (प्रेम नव्हे)
माणसाला 'डेस्परेट' बनविते.
'कामातुराणांम न भयम् न
लज्जा'.
राज बब्बरशी
होण्यापूर्वी स्मिता पाटीलचे
दुसऱ्या कोणाशी लग्न
झाल्याचे मला माहीत नाही. पण
राज बब्बरचे लग्न होऊन बराच
काळ उलटला आहे. त्याच्या
वागण्याचे मी समर्थन करीत
नाही पण आपल्या लग्नातील,
पती-पत्नी संबंधातील फोलपणा
त्याच्या लक्षात येण्याजोगा
काळ उलटला आहे. आपल्या
जीवनसाथीला (पटत नसल्यास)
समजविण्याचा/समजण्याचा काळही
उलटून गेला आहे. लग्नापासून ६
महिन्यात घडलेल्या ह्या घटना
नाहीत.
आपल्या व्यक्तिगत
आयुष्यातील दुःखांचा पाढा
वाचून एखादा पुरूष एखाद्या
स्त्रीच्या संवेदनाशीलतेचा
फायदा उठवू शकतो. त्याच्या
दुःखावर फुंकर घालणारी
स्त्री, कधी-कधी तिच्याही नकळत
जाळ्यात अडकली जाते. त्याला
सर्व सुख देण्याच्या नादात
सर्वस्व (स्वखुशीने)
हरवून बसते. पण, अद्वैत-नेहा
मध्ये असे घडलेले दिसले नाही.
अद्वैतचे नेहाकडे आकर्षित
होणे ह्याला भावनिक आधार नाही
(अद्वैत-सायलीतील मतभेद
कथानकात कुठे आलेले नाहीत),असे
मला वाटते.
कितीतरी
पुरुषांच्या लग्ना आधीच्या
मैत्रिणी असतात तसेच
स्त्रियांचे मित्र असतात.
त्या सर्वांनी विचार करावा.
आपल्या संसारात कुठल्याही
गंभीर समस्या नसताना
आपल्याला लग्नाआधीच्या
मित्रांचे/मैत्रिणींचे
आकर्षण (स्वतःचा संसार
मोडण्याइतके..) वाटते का? मला
नाही वाटत कोणाचे उत्तर
'हो, वाटते' असे असेल. ह्याला
कारण पतीशी/पत्नीशी कितीही
भांडणं झाली/वादविवाद
झाले/अबोले झाले
तरी संसारातील भावनिक
गुंतणूक दोघांनाही एकत्र
बांधून ठेवते.
हे सर्व
अद्वैत बद्दल झाले. नेहा बाबत
आपला मुद्दा मी स्वीकारला
आहेच.
असो.
फंडे
गोष्ट मस्तच लिहिली आहे. अधेमधे भाषा थोडी बोलीकडून लेखीकडे झुकते आहे पण चालेल. पण प्रतिक्रियेत म्हटलेल लग्नविषयक फंडे स्पष्ट झालेच नाहीत! काय म्हणायचे आहे की नवऱ्याची जुनी मैत्रीण उद्भवली तर काय करावे? की लग्न झाल्यावर प्रेमात पडू नये? (हे शक्य कसे होईल?)शेवटी हेच खरे!
तुम्ही एका वेगळ्या पातळीवर लेखन केले आहे, मी एका वेगळ्या पातळीवरून ते वाचले.
शेवटी हेच खरे!
मनाचा हा संदर्भ 'प्रेम भावनेचा' नसून 'वासनेचा' आहे.
परत एकदा, आपल्या पातळ्या वेगळ्या आहेत असेच मी म्हणेन. 'प्रेम' आणि 'वासना' हा फरक मी केला नाही. मी 'भावना, तिची तीव्रता आणि त्या तीव्रतेची शारीर प्रतिक्रिया' असा विचार केला.
सायलीने असे म्हणायला हवे होते 'तुझ्या मनात तीच होती तर माझ्या आयुष्यात का आलास? (रात्रीचा संदर्भ नको). ऑफिसमध्ये नेहा आणि घरी सायली...(रात्रीचा संदर्भ नको).'
हे मला पूर्णपणे मान्य.
आणि,
त्या
रात्री सायली तशी वागते कारण
काहीही निर्णायक तिथे घडत
नाहीये. तिची त्या वेळेची उलझन
वेगळीच आहे. मनात काही शंका
आहेत, पण त्यांना आधार नाहीये.
ती जाऊन बोलणं, किंवा तिची
तिथं असण्याची काहीच गरज
नसताना त्याच्यांमध्ये जाऊन
बसणं किती आऊट-ऑफ-प्लेस वाटेल
हे बघा नं. ती स्वत:ला सांगतीये
की, 'जेलसी वगैरे बाष्कळपणा
माझ्याकडून व्हायला नको.' ती
(तिच्या मते) योग्य, संयत असं
वागत आहे, मनात पाली चुकचुकत
असतानाही. तिची ही उलझन
शब्दांत पकडण्याचा प्रयत्न
मी नक्कीच केला आहे. ती
जेव्हा मेधाशी बोलते तेव्हा
तिचं पहिलं वाक्यही हेच
दाखवतं - 'काहीतरी दुखतयं पण ते
कोठे हे कळत नाहीये'. मेधा
अद्वैतशी बोलल्यावर जेव्हा
परत सायलीशी बोलते, तेव्हा
तिला स्पष्ट होतं की पाणी खरंच
गहिरं आहे, आणि तिच्या शंका
निराधार नाहीयेत.
कथा भरभर पुढे नेली जाते ती तिथं नाही, तर
आणि ह्या प्रवासात त्यांना नंतर लागत गेलेले थांबेही नेहमीचेच होते.....सारं काही तेच. नेहमीचंच. दुसऱ्या कोणाही दोघांमध्ये घडू शकणारं, घडणारं. आणि, परिणामकतेत कुठंही उणं नसणारं.
ह्या परिच्छेदाद्वारे. आणि हे ही सगळं एका महिन्यात घडत जातं, जेव्हा परिस्थिती हळूहळू बिघडत जाते.
असो.
माझ्या कथेचे 'समर्थन' मला
करायचे नाही, कारण ते करण्यात
काहीच अर्थ नाही. आपल्याला रस
असल्यास माझ्या लिखाणातील
कमकुवतपणा बद्दल अजुन चर्चा
करता येईल, येथेच किंवा व्य. नि.
द्वारे.
राग नसावा.
राग?? तुम्ही इतका विचार केलात याचा आनंद आहे!
चर्चा...
श्री. मिलिंद फणसे,
या
कथेस प्रभाकर पेठकरांनी
दिलेल्या
प्रतिसाद-उपप्रतिसादांवरून
असे वाटते की ते कळत-नकळत आपल्या नैतिकतेच्या
कल्पना कथेतील पात्रांवर
लादू पाहत आहेत, आपल्या
नैतिक-सामाजिक चौकटीत
त्यांना बसवू पाहत आहेत व ती
त्यात बसत नाहीत असे
दिसल्यावर नाराज होत आहेत.
'आपल्या' म्हणजे माझ्या स्वतःच्या का? ह्या माझ्या स्वतःच्या कल्पना नसून, मला शिकविली गेलेली, समाजमान्य नीतिमूल्ये आहेत. ती मी कथेतील पात्रांवर लादू पाहत नसून लेखकाचे, अशा प्रसंगात, स्त्री किंवा पुरुषाच्या स्वाभाविक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष झाले असून काही प्रसंग मनाला न पटणारे रंगविले गेले आहेत असे मत व्यक्त केले आहे. स्त्री-पुरुषांमध्ये अनैतिक संबंध कधी नसतातच असे मी कुठे म्हंटल्याचे मला स्मरत नाही. मी नाराज कशाला होऊ? रोजच्या वर्तमानपत्रांत अनैतिकतेच्या हजारो घटना वाचण्यात येतात त्यावर आपण घरात/मित्रपरिवारात चर्चा करीत नाही का? तसाच हा प्रयत्न आहे. 'मनोगता'वरील कथा वाचून तशाच दुर्लक्षाव्या असे तर आपले म्हणणे नाही नं?
कथेचा आस्वाद घेण्याची
वा समीक्षेची ही पद्धत मला तरी
पटत नाही.
मला वाटतं मी कथा मनापासून वाचतो आहे. त्यावर माझ्या बुद्धीला झेपेल असा 'विचार' करतो आहे. माझी भली-बुरी मतं मांडतो आहे. मला पटणाऱ्या दुसऱ्यांच्या विचारांना (प्रियाली ह्यांचा प्रतिसाद) स्वीकारतो आहे. कथेच्या चुकीच्या (मला वाटलेल्या) बाजूंवर आक्षेप घेताना चांगल्या (मला वाटलेल्या) बाजूंबद्दल लेखकाचे अभिनंदनही करतो आहे. कथेचा आस्वाद घेण्याची तसेच समीक्षेची माझी ही पद्धत मला योग्य आणि मनोगताच्या ध्येय-धोरणांमध्ये बसणारी वाटते.
जो शारीर मोह देवादिकांना व ऋषी-मुनींना चुकला नाही, आवरता आला नाही तो सामान्य माणसांना कधीही होणर नाही, त्यास ती कधीही बळी पडणार नाहीत हे अशक्य आहे
तसा माझा आग्रहही नाही. मोह सर्वांनाच होतात. त्यातून, समाजाने अनैतिक मानलेल्या घटनाही घडत असतात. त्यावर साधक-बाधक चर्चा झाल्याच पाहिजेत. वादे वादे जायते तत्त्वबोध: असे संस्कृत वचन आहे. (शब्द चुकले असल्यास, क्षमस्व)
ते
अनैतिक असेल पण अनैसर्गिक
कसे?
उलट अनैतिक नाही पण अनैसर्गिक जरूर वाटले. ज्या प्रसंगावर मी 'अनैसर्गिक' असे भाष्य केले आहे तो प्रसंग, अद्वैतला लग्नापूर्वीची मैत्रीण 'स्वप्नात' भेटते त्या प्रसंगाशी निगडित आहे. भेटीत अनैसर्गिक काहीच नाही. मला त्यात अनैतिकही काही वाटले नाही. त्या मैत्रिणीचा हात चुंबिल्यावर अद्वैतचा विर्यपात होतो. एक तासापूर्वी पत्नीशी 'रत' होवून निजलेल्या अद्वैतचा स्वप्नातील ह्या दृश्यावर विर्यपात व्हावा हे मला 'अनैसर्गिक' वाटते. अशा व्यक्ती प्रत्यक्षात अस्तित्वात असतीलही परंतु सर्वसामान्यपणे असे घडल्याचे माझ्या ऐकीवात नाही. एखाद्या 'असामान्य' पुरुषाच्या बाबतीत तसे घडूही शकेल.
कथेच्या पात्राच्या
तोंडी "...माझ्यासोबत जगलेल्या
रात्रींचं काय? ....दिवसा
ऑफिसमध्ये नेहा, आणि रात्री
सायली...' हे वाक्य
ज्यांना रुचत नाही ते
पेठकर खऱ्याखुऱ्या ऐश्वर्याबद्दल "हाताळल्यावर" हा शब्द
किती सहजपणे वापरून जातात.
'हाताळलेल्या',
'वापरलेल्या', 'नासवलेल्या''मजा
मारलेल्या' 'उपभोगिलेल्या'
अशा, स्त्रीला अपमानित
करणाऱ्या, अनेक शब्दांमधून
मला 'हाताळलेल्या' हा शब्द
जास्त सौम्य वाटला. कथेतील
चुंबन दृश्याला आणि त्या
नंतरच्या 'घटनेलाही' मी आक्षेप
घेतलेला नाही. फक्त 'ती' घटना
अनैसर्गिक वाटते असे म्हंटले
आहे.
सायली जेंव्हा 'माझ्या
सोबत जगलेल्या रात्रींचे काय?
किंवा .........रात्री सायली' असे
म्हणते (जे मला रुचले नाही)
तिथे तिने फक्त 'रात्रीचा'
विचार न करता 'आयुष्याचा'
विचार करावा, ऑफिसमध्ये एक आणि
घरी एक असा दोन सहचारिणींशी
संसार करण्याला आक्षेप
घ्यावा असे म्हणायचे
आहे.लग्नाच्या बायकोवर
जेव्हा असा पराकोटीचा प्रसंग
येतो तेंव्हा ती आपल्या
विस्कटलेल्या आयुष्याचा
विचार करते. दुखावलेल्या
प्रेमभावनांनी अपमानित होते.
'फुकट' गेलेल्या रात्रींचा
हिशोब करीत नाही, असे मला
वाटते.
कथेचा
शेवटी प्रश्न अनुत्तरित
ठेवणे मला योग्य वाटले.
कथेच्या शेवटी प्रश्न अनुत्तरित ठेवण्याला माझाही आक्षेप नाही. परंतु, लेखनाच्या तंत्राच्या दृष्टिकोनातून, समस्येशी निगडित दोन्ही (किंवा तिन्ही) व्यक्तींची बाजू समतोलपणे मांडून वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हे अपेक्षित असते. पण एका पात्राची बाजू सशक्तपणे मांडायची आणि दुसऱ्याची बाजू कमकुवत मांडून वाचकांचा कल आपल्याला हव्या त्या निर्णयाप्रत आणून सोडायचा ह्याने काही विशेष साधले आहे असे मला वाटत नाही. तरी पण आपल्या कथेचा शेवट कसा करावा ह्याचे स्वातंत्र्य लेखकाला आहे हेही मी माझ्या प्रतिसादात दिलेले आहे.
ही काही लहान मुलांसाठी
बोधकथा नाही.
खरंच की.... लक्षातच नाही आलं.
खूप चुकीचा निर्णय
हेच खरे
एकंदरच पुरुषांसाठी स्त्रियांची उपलब्धता वाढली आहे. आणि स्त्रियांसाठीही. त्यामुळे आता प्रमाणही वाढले आहे.
अगदी खरे. मलाही येथे प्रेम आहे की वासना हे गोष्ट वाचताना लक्षातही घ्यावेसे वाटले नाही कारण अशी उदाहरणे पाहण्यात आहेत, कॉमन झाली आहेत.
अप्रतिम
अप्रतिम आहे (आणि कदाचीत अपुर्ण देखिल)अस्वाभाविक...
त्या रात्री सायली तशी वागते कारण काहीही निर्णायक तिथे घडत नाहीये.
निर्णायक म्हणजे काय? निर्णायक म्हणजे त्या दोघांचा 'प्रत्यक्ष शरीर संबंध', असे असेल तर मला सायलीच्या विचार प्रक्रियेचे नवल वाटते. कोणी स्त्री किंवा पुरुष त्या थराला गोष्टी जाईपर्यंत जाणूनबुजून वाट पाहत बसत नाही. अजाणता आजूबाजूच्या घटनांकडे दुर्लक्ष झाले तर मी समजू शकतो.
ती जाऊन बोलणं, किंवा तिची तिथं असण्याची काहीच गरज नसताना त्याच्यांमध्ये जाऊन बसणं किती आऊट-ऑफ-प्लेस वाटेल हे बघा नं.
घरी आलेल्या पाहुण्यांशी आपण फक्त गरज असेल तरच बोलतो का? विषय कळत नसला तरी घरी आलेल्या पाहुण्यांची यजमानीणबाई ह्या नात्याने तिचे तिथे असणे आवश्यक आहे. घरात पाहुणे असताना बेडरूममध्ये जाऊन झोपणे पाहुण्यांना अपमानकारक आहे.
ती स्वत:ला सांगतीये की, 'जेलसी वगैरे बाष्कळपणा माझ्याकडून व्हायला नको.'
घरी आलेल्या पाहुणीशी बोलत बसणे अथवा तिच्या आणि नवऱ्याच्या संभाषणात (विषय कळत नसल्यास, गप्प राहून) रस दाखविणे म्हणजे 'जेलसी' दर्शविणे होते? मला नाही तसे वाटत.
उत्तर
प्रभाकरपंत,उ: फंडे
मला जे सांगायचं
आहे, ते कथेतून सांगितलं आहे.
तुम्ही उपस्थित केलेल्या
प्रश्नांची उत्तरं आहेत कथेत.
पण तो विचार ज्याचा त्यानं
करावा, आणि स्वत:ची उत्तरं
शोधावीत हे अपेक्षित
आहे.
'माझी' उत्तरं अशी
आहेतः
श्रेयस आणि प्रेयस
यांमध्ये प्रेयस निवडणे
नेहमीच शक्य नसते. तो निर्णय
शेवटी प्रत्येकाने स्व:तकरता
घ्यायचा असतो. प्रेमात न पडणे
शक्य नाही, पण वाहवत जायचं की
प्रेमाला निखळ मैत्रीचे
स्वरूप द्यायचं, सगळं
मोडायचं की बायकोची काही चूक
नाही हे जाणून तिला आपल्या
प्रेमाची झळ लागू द्यायची
नाही, आणि जर भावना इतक्या
तीव्र असतील तर बायकोला 'फेस'
करण्याची हिंमत करायची का, की
आजचं उद्यावर ढकलत
रहायचं...आपली सोय पहायची.... हे
आणि अजून कितीतरी पर्याय
अस्तित्वात असतात.
आणि अनेक पर्याय 'सायली'लाही उपलब्ध असतात. माझा अद्वैत काय निवडतो आणि सायली त्याला काय सांगते, ती स्वत: काय निवडते हे सगळे पाहिलेत तर मला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट होईल, असे मला वाटते.
वेगळी पातळी! :)
पेठकर साहेब,
मला सरळ दिसतंय की मला अभिप्रेत असलेले अर्थ तुम्हाला सापडत नाहीयेत. कथेचं 'समर्थन' मला करायचं नाही, पण मी लिहिलेलं प्रत्येक वाक्य मी 'का' लिहिलंय ह्यावर मी नक्कीच बोलू शकेन.
आपल्याशी दूरध्वनीवरून चर्चा करता येईल का? माझा क्रमांक +९१ ९९००१७२८१५ हा आहे. आपण एक एस.एम.एस. केलात तर आपल्याला मी नक्की कॉल करीन.
कळावे,
लोभ
असावा.
छोटीशी गोष्ट
मोह आवरत नाहीये, माझी बाजू मांडण्याचा!
सायली जेंव्हा 'माझ्या सोबत जगलेल्या रात्रींचे काय? किंवा .........रात्री सायली' असे म्हणते (जे मला रुचले नाही) तिथे तिने फक्त 'रात्रीचा' विचार न करता 'आयुष्याचा' विचार करावा, ऑफिसमध्ये एक आणि घरी एक असा दोन सहचारिणींशी संसार करण्याला आक्षेप घ्यावा असे म्हणायचे आहे.लग्नाच्या बायकोवर जेव्हा असा पराकोटीचा प्रसंग येतो तेंव्हा ती आपल्या विस्कटलेल्या आयुष्याचा विचार करते. दुखावलेल्या प्रेमभावनांनी अपमानित होते. 'फुकट' गेलेल्या रात्रींचा हिशोब करीत नाही, असे मला वाटते.
ते वाक्य 'जर तुझ्या मनात तीच होती, तर माझ्यासोबत जगलेल्या रात्रींचं काय? दिवसांचं काय, आयुष्याचं काय?' असं आहे! आणि 'रात्री सायली' वाल्या वाक्याबद्दलचं आपलं म्हणणं मला थोडं पटलं, मला अभिप्रेत नसताना वाचकाला तिथे 'रात्री'ची छटा दिसायला नको, असं काही वाटलं. तेथे 'बाहेर ती, घरात मी' असा अर्थ अभिप्रेत होता.
पेठकर साहेब, चर्चा व्हायलाच हवी, कृपया मला नक्की फोन करा.
चर्चा (२)....
मला
वाटते आपणास माझा मूलभूत
मुद्दा एकतर कळला नसावा किंवा
कळला असल्यास आपण त्यास बगल
देत आहात.
मलाही वरील प्रमाणे म्हणता येते. पण वादाला वाद वाढवायचा नाही म्हणून तसे म्हणत नाही.
"समाजमान्य नीतिमूल्ये"
हयातभर जपणाऱ्यांचेच चित्रण
साहित्यात करावे काय? हे
गृहीतक मान्य केल्यास सारे
साहित्य हे साने गुरुजींच्या
"गोड गोड गोष्टी" आणि " श्यामची
आई " छाप होईल. (या दोन
कलाकृतींना कमी लेखण्याचा
उद्देश नाही पण जगात या
पलीकडेही बरेच काही आहे हे
विसरून चालत नाही).
सारे साहित्य राहू दे बाजूला. ते सर्व वाचण्याइतके आयुष्य माझ्याजवळ तरी नाही. फक्त 'मनोगता'वरील साहित्य वाचले तरी श्री.साने गुरुजी आणि श्री. लेखकु ह्यांच्या मध्ये, मागे, पुढे अनेक लेखक आणि त्यांची लेखनशैली आहे हे सहज जाणवेल.
"स्वाभाविक
प्रतिक्रियां" चे म्हणत असाल
तर ज्यांना आपण वर्षानुवर्षे
ओळखतो तेही वेळप्रसंगी कधी
कधी असे वागतात की आपण अचंबित
होतो. मानवी मनांची गुंतवळ
समाजमान्य नीतिमूल्ये आणि
स्वाभाविक प्रतिक्रिया
यांच्या ढोबळ फणीने दर वेळी
विंचरता येत नाही.
वाक्य चांगले आहे.
माणसे चांगली असतात, वाईट असतात, भली असतात, विकृत असतात, मनाने खंबीर असतात, कमकुवत असतात. आयुष्यात हरघडी समोर येणाऱ्या प्रश्नांना , समस्यांना सगळेच आपणास अपेक्षित असलेली "स्वाभाविक प्रतिक्रिया" देत नाहीत. त्या माणसांच्या/पात्रांच्या प्रतिक्रिया, त्यांचे वागणे आपणास आपल्या conditioning मुळे, आपल्यावर झालेल्या उत्तम संस्कारांमुळे न रुचणे समजता येते पण जेव्हा त्यास आपण"न पटणारे" म्हणता तेव्हा (मी पहिल्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे) आपण आपले विचार त्या पात्रांवर लादत आहात हेच जाणवते.
त्या पेक्षा कथेतील पात्रांचे वागणे 'तसे का आहे' ह्याच्या स्पष्टीकरणाची अपेक्षा वाचक लेखकाकडून करतो आहे असे आपल्याला का वाटत नाही? पुन्हा सांगतो. प्रियालींनी दिलेले स्पष्टीकरण मला पटले, ते मी स्वीकारले, ही वस्तुस्थिती आपण दृष्टीआड का करता आहात? ज्या प्रमाणे लेखक त्याच्या अनुभवविश्वावर विसंबून एखादे लेखन करतो त्याच प्रमाणे वाचक त्याच्या अनुभवविश्वावर विसंबून कथेतल्या भल्या-बुऱ्या मुद्द्यांचा विचार करतो. दोघांचाही तो हक्कच आहे. 'तुम्ही असे का लिहिले' असा जाब मी लेखकाला विचारलेला नाही,माझे मत व्यक्त केले आहे. जर मला पटले नसेल तर तसे प्रामाणिकपणे लिहिणे गैर आहे का? खुद्द लेखकानेही तसे सुचविलेले नाही.
या
कथेतील अद्वैत हा विवाहित
असूनही लग्नानंतर सहा
महिन्यात दुसऱ्या स्त्रीच्या
प्रेमात पडतो, तिच्याशी
विवाहबाह्य संबंध प्रस्थापित
करतो. तो आपल्या सुखापुढे बाकी
साऱ्या गोष्टी क:पदार्थ समजतो,
तो नि:संशय स्वार्थी आहे,
आत्मकेंद्रित आहे. पण तो असा
आहे म्हणून ही कथा आहे!
आणि म्हणूनच ही चर्चा आहे. बरोबर आहे नं. चर्चा तेव्हाच होते जेंव्हा दोघांजवळ भिन्न मुद्दे असतात नाहीतर काय नुसते अभिनंदन करून मोकळा झालो असतो.
तो तसा नसता, तो एक
प्रेमळ व निष्ठावान पती असता
तर लेखकुंने काय गोष्ट लिहिली
असती?
मनुष्य
स्वभावात स्वार्थी,
आत्मकेंद्रित किंवा प्रेमळ
आणि निष्ठावान हिच दोन
वैशिष्ट्ये असती तर ..हो
लेखकुने हेच लिहिले
असते..."अद्वैत व
सायली यांचा विवाह झाला व ते
सुखाने नांदले" "And they lived happily ever after"!
राहता राहिला प्रश्न
"रात्री" व "हाताळणे" याचा तर
भावनातिरेकात प्रक्षुब्ध
झालेली माणसे शब्द
तोलून-मापून वापरण्याच्या
मनस्थितीत नसतात. जितक्या
सहजतेने आपण "हाताळणे" हा शब्द
वापरला आहे तितक्याच सहजतेने
कथालेखकाचे ते वाक्य आले
आहे. मला तरी लेखकुंचे संवाद
नैसर्गिक वाटतात.
माझ्या प्रमाणेच आपल्यालाही मताधिकार जरूर आहे.
माझ्याकडून हा विषय संपलेला आहे. ह्या पुढील चर्चा आपणास आवश्यक भासत असल्यास आपण व्य. नि. द्वारे चालू ठेवू. उगीच इतर मनोगतींच्या वेळेचा अपव्यय नको.
धन्यवाद....
सध्या मी मस्कतमध्ये आहे. २-३ दिवसांत भारतात परतेन. आपण जरूर चर्चा करू. मी जरूर तुम्हाला फोन करेन.