मनोगत वरील कविता

922 views
Skip to first unread message

राज धर्माधिकारी

unread,
Jul 9, 2007, 1:57:58 AM7/9/07
to manogat_...@googlegroups.com

मला मनोगत वर काही काही खूपच उत्कृष्ट आणि दर्जेदार कविता वाचायला मिळाल्या. त्या शब्द सौंदर्याने मी आवक झालो.

पण बऱ्याच कविता अगदीच टुकार त्यांना 'र ला ट' जोडून केलेल्या म्हणणे म्हणजे र आणि ट चा अपमान होय.

अशी साहित्यिक बांडगुळे जी बहुमूल्य वेळेचे शोषण करतात, त्यांची वेळेच तिरडी बांधून सगळ्यांचा वेळ वाचवणे महत्त्वाचे आहे. किंवा त्यांच्या वर संस्कार करणे आवश्यक आहे.

काही लोक मलाच उलटा सल्ला देतील 'वाचता कशाला' अहो, भारता बाहेर राहून, प्रकाशीत मराठी वाचणे कसे टाळणार?

माझी तक्रार फक्त कविते बाबतीत आहे, गद्य साहित्य खूपच छान आहे....

- राज

मराठी लेखन वाचनाच्या आनंदासाठी
मनोगत : आस्वाद विवाद संवाद

अज्जुका

unread,
Jul 9, 2007, 11:15:13 AM7/9/07
to manogat_...@googlegroups.com

खरंय!

सहमत आहे. विशेषतः गेल्या काही दिवसात बायकांवर किंवा मुलींच्या केस कापण्यावर काही गद्यरूपात लिहिलेल्या मूर्ख ओळी वाचायला मिळाल्या त्या नंतर तर नक्कीच सहमत. तरी काही मुद्दे

१. जोवर असल्या भिकार आणि रटाळ कवितांना लोक वा छान म्हणत प्रोत्साहन देतील तोवर हे असले दळण पडतच रहाणार. तुम्ही आम्ही काय करणार त्याला? दुर्लक्षाशिवाय?

२. तुम्हाला जे भिकार आणि रटाळ वाटते ते काहींना दर्जेदार तर तुमच्या मते दर्जेदार काहींना भिकार वाटते. याचे काय करणार?

कुशाग्र

unread,
Jul 10, 2007, 5:04:40 AM7/10/07
to manogat_...@googlegroups.com

वाढती संख्या

आपल्या पत्रामुळे कवितांची संख्या रोडावण्याऐवजी वाढतेच आहे.तेव्हा त्यांचकडे दुर्लक्ष करणेच इष्ट !

संत सौरभ

unread,
Jul 10, 2007, 6:50:58 AM7/10/07
to manogat_...@googlegroups.com

सहमत!

रोज मुखपृष्ठावर या भारंभार कवितांमधून साहित्य आणि चर्चेचे प्रस्ताव शोधण्याचा वैताग आलाय बुवा!

सध्या तर अशी स्थिती आहे की विडंबनकारांना पण सगळ्या कवितांना न्याय देता देता मारामार होतेय!

अनमिक

unread,
Jul 10, 2007, 10:34:06 AM7/10/07
to manogat_...@googlegroups.com

मी पण सहमत

बरेचदा या अशा कवितांच्या घोळक्यात एखादी चांगली कविताही हरवून जाते आणि ती लिहिणाऱ्याचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते. कित्येकदा मी कविता मनोगतवर प्रसिद्ध केल्या आहेत, पण प्रत्येकवेळी प्रश्न पडतो की इतक्या मोठ्या कवितांच्या यादीत वाचण्यासाठी आपल्या कवितेचा नंबर लागणार का?

-अनामिका.

भार्गवराम

unread,
Jul 10, 2007, 2:21:42 PM7/10/07
to manogat_...@googlegroups.com

तारांकन

अशी साहित्यिक बांडगुळे जी बहुमूल्य वेळेचे शोषण करतात, त्यांची वेळेच तिरडी बांधून सगळ्यांचा वेळ वाचवणे महत्त्वाचे आहे.

कोणास कविता प्रसिद्ध करण्यापासून असे अडविता येणे शक्य होईल असे वाटत नाही. मनोगत वर लेख, कविता तारांकीत करण्याची व्यवस्था केल्यास कवितेची लोकप्रियता कळू शकेल. पण एख्याद्यास एखादी कविता दर्जेदार वाटत नसेल आणि बहुसंख्य इतरांस वाटत असेल तर नाईलाज आहे. काहींना चारोळ्या आवडतं नाहीत, काही डोक्यावर घेतात. सुरेश भटांनी चं.गों. वर केलेली टीका आठवते आहे, त्याबरोबरच त्याकाळी शाळा-कॉलेजात चारोळ्यांची लोकप्रियताही आठवते आहे. कालपरत्वेही आवडीनिवडी बदलू शकतात. शालेय जीवनात 'सलाम' बद्दल असं वाटत होतं की असले घाणेरडे शब्द वापरून असं कसं कोणी दर्जाहीन साहीत्य लिहू/प्रसिद्ध करू शकतं? नंतर वाटू लागलं की सत्तरच्या दशकातलं रडगाणं आहे, आता वाटतं की समाजाची सद्य परिस्थिती काही फार वेगळी नाहीये.

किंवा त्यांच्या वर संस्कार करणे आवश्यक आहे.

हे कसे करणार? कोण ठरवणार चांगले वाईट काय ते? पुन्हा नवविद्रोही वैगेरे तयार होणार, पुन्हा तेच ते परत परत.

अज्जुका

unread,
Jul 11, 2007, 12:05:24 AM7/11/07
to manogat_...@googlegroups.com

दर्जा

>>मनोगत वर लेख, कविता तारांकीत करण्याची व्यवस्था केल्यास कवितेची लोकप्रियता कळू शकेल.<<

लोकप्रियता हा काही दर्जाचा निकष असू शकत नाही. ज्याचे उदाहरण तुम्हीच दिले आहेत.

निदान सुरेश भटांसारख्या मोठ्या कवीच्या तोंडून आल्यामुळे का होईना चंगो प्रकरण ही नुसती शब्दांची कसरत किंवा गिरणी आहे ह्याचे भान काही लोकांना तरी आले असेलच ना.

व्यक्तिसापेक्षता कितीही मानायची ठरवली तरी दर्जा अशी एक काही वस्तू उरतेच, असतेच. त्याचे मूळ निकष असे ठरवता येणं अवघड असलं तरी अशक्य नसावं. आपण आपल्या परीने प्रयत्न करू या का?

माझे दोन पैसे म्हणजे... काव्य खरं/ प्रामाणिक असलं पाहिजे. आता मी अमुक अमुक विषयावर कविता करून दाखवतो हं असं नाही. एखादा चांगला वा वाईट अनुभव, एखादी भावना, बोच व्यक्त व्हायला भाग पाडते कधी ते कवितेतून तर कधी चित्रातून, कधी कथेतून, लेखातून इत्यादी इत्यादी... हे भाग पाडणं महत्त्वाचं ते घडतं तेव्हाच कविता खरी असते नाहीतर बाकीचा शब्दखेळ. अनुभव म्हणजे फक्त प्रत्येक प्रकारच्या प्रसंगातून जायलाच हवे असं नाही. परत हा प्रांत खूप धूसर आहे. आणि त्याबद्दल आत्ता बोलू शकेन असं वाटत नाहीये. नंतर.

ज्यांना इथल्या कवितेच्या दर्जाबद्दल खरंच आस्था आहे त्यांनी सगळ्यांनीच आपापल्या परीने दर्जाचे निकष शोधायचा प्रयत्न करूया!!

चित्त

unread,
Jul 12, 2007, 9:10:39 AM7/12/07
to manogat_...@googlegroups.com

मनोगतावरील कविता आणि पुढे

मनोगतावर एकंदर महाविद्यालयीन दर्जाच्या 'टुकार' कवितांचा पाऊस पडतो आहे, हे खरे. मनोगत हे मुक्तांगण आहे त्यामुळे अशा कवितांना पायबंद घालणे योग्य ठरेल काय, हा वेगळा मुद्दा आहे. कालांतराने हा पाऊस थांबतो असा अनुभव आहे. असो. आधी काही जणांनी काही मते मांडली आहेत त्यावर माझी मते पुढे देतो आहे.

'टुकार' कविता लिहिणारा किंवा अगदी 'उत्तमोत्तम' कविता लिहिणार कवी त्या भावनेशी प्रामाणिक असतोच असे खात्रीलायकरीत्या सांगता येईल काय?  शिवाय को अहम ह्यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक वाचकाच्या अपेक्षा सारख्याच असतील असे नाही. प्रत्येक वाचकाच्या अपेक्षा, मूल्ये, आकलन, अनुभव आणि कविता वाचतानाचा त्याचा मूड ह्या प्रत्येक गोष्टीत तफावत असू शकते. पण कविता वाचताना वाचकाने एकदातरी तिच्यापासून स्वतःला शक्य तेवढे वेगळे ठेवून वाचायला हवे असे माझे मत आहे. 

माझ्या मते, 'टुकार' कवितांना हाणावे  त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे. पण चांगल्या किंवा बऱ्या कवितांना प्रतिसादांतून प्रोत्साहनही द्यावे. त्यातूनच चांगली कविता वर येऊ शकण्याची शक्यता आहे. दुसरे म्हणजे जे लगेच कळते, काळजात घुसते ते चांगले काव्य नाही काय? तोही शब्दखेळ काय? काहींना असे वाटते. ही मंडळी म्हणजे 'अमेरिकन' मराठी कवी आणि त्यांचे 'अमेरिकन' मराठी वाचक.  निबंधासारख्या लांबलचक 'हुशार', 'ग्लोबल', अगम्य आणि कंटाळवाण्या  कविता आणि कवी  हे 'अमेरिकन' मराठी वाचकच डोक्यावर घेतात. पुढील काव्यांश वाचून परिस्थितीचा अंदाज येईल--

भयानक दाट पोकळीत हरवल्यावर गरगरत्या आवर्तात असल्या भयानक कविता का आठवाव्यात?
कुठलंही नातं चक्रव्यूहासारखं का भासावं?
की प्रत्येक नातं भयानक मोहक असतं - ज्याचे धडे गर्भातच मिळतात - आणि बाहेर आल्यावर नुस्ती एका नात्यातुन दुसरीकडे ओढाताण, फरफट?
अर्धसत्यापासून स्वत:ला दूर ठेवण्याच्या प्रयत्नात सत्य-असत्याच्या भेदाने एवढं कन्फ्यूजन का व्हावं?
जगातल्या - आणि स्वत:तल्याही - पीटर कीटिंग्जचा कुठल्याही हॉवर्ड रॉर्कवर एवढा खार का असावा?...

ह्या कवितेचा अर्थ कळला लोकांना कळला तरी टिकणार आहे काय? हा शब्दखेळ नाही काय?

अशी अनेक उदाहरणे देता येईल. जाऊ द्या. पण गमतीचा भाग म्हणजे ह्या हवेतल्या कवींना तुकारामासारखा इथल्या मातीत घट्ट रुजलेला कवी जवळचा वाटतो. ते त्याच्यावर ग्रंथबिंथही लिहू शकतात. पण दुसरीकडे ह्या 'लिटिल' कवींना छंदबद्ध कविता म्हणजे कविताच नाही असे ह्यांना मनापासून वाटते. ह्यांना छंदात चांगले लिहिणे जमतही नाही म्हणा म्हणूनही असावे. म्हणूनच छंदातल्या कवितांचा हे जवळपास दुस्वासच करतात.

जे अनाकलनीय, स्टंटबाज तेच काव्य. छंदातल्या कविता प्रामाणिक कविता नाहीतच मुळी अशी ह्या लोकांची भूमिका असावी असे वाटते. आपण काहीतरी  'ग्रेट', 'जबरा' लिहितो आहोत आणि वाचतो आहोत असे ह्या लोकांना वाटत असते. 

"May your poems... ...invite the critics for dinner and leave before the main course...  once written, seldom regain consciousness.." असे रॉबर्ट मॅकगॉफ़ ह्या ब्रिटिश कवीने उगाच म्हटलेले नाही. (रॉबर्ट मॅकगॉफचा पूर्ण माल इथे. वाचा, ऐका, आनंद घ्या.)

आपली कविता जन्मतःच मृत आहे, 'स्टिलबोर्न' आहे हे फक्त ह्यांनाच कसे कळत नाही.

चित्तरंजन

को अहम

unread,
Jul 11, 2007, 8:23:11 PM7/11/07
to manogat_...@googlegroups.com

भाग पडणं

>>>हे भाग पाडणं महत्त्वाचं ते घडतं तेव्हाच कविता खरी असते नाहीतर बाकीचा शब्दखेळ..

आपलं म्हणणं पटलं. पण भाग पडणं हाच दर्जेदार कवितेचा निकष होवू शकत नाही. जर असं असतं तर व्यवसायिक कवींना कविता करणं अशक्यच झालं असतं. परंतु दर्जा राखला जावा हे खरं. माझ्या मते कवितेचा दर्जा व्यक्तिसापेक्षच राहील. तरीदेखील माझ्या अपेक्षेत बसणाऱ्या दर्जेदार कविता खूप कमी बघावयास मिळतात मनोगतावर. मनोगतावर जे प्रथितयश कवी आहेत त्यांच्या कविता वेगळ्या प्रभागात छापल्या तर कदाचित त्यांना जास्त वाचक लाभतील. पण प्रथितय्श कोण हे ठरवणार कोण?

अनु

unread,
Jul 13, 2007, 3:26:57 AM7/13/07
to manogat_...@googlegroups.com

उदा.

http://www.manogat.com/node/10773
ही कविता वाचा. मलातरी वाचून काहीच कळले नाही. छंद बिंद पण तडजोड करु हो, पण अर्थ तरी किमान कळायला हवा की नको?की एकापुढे एक चिठ्ठी टाकून निवडून मांडलेल्या शब्दांना कविता म्हणायचं?
अवांतर : मनोगताबाहेर तशीच आणखी चीड आणणारी बाब म्हणजे 'ती मराठी मुलगी असते' ही विरोपांतून फिरणारी कविता, 'तू पेढा मी बर्फी, तू ओनिडा मी मर्फी' अशा भयंकर कविता. एखाद्या मुलाला त्याच्या हपिसातली जीन्सवर पैंजण घालणारी मराठी मुलगी आवडून तिच्यावर कविता करावीशी वाटत असेल, त्याने करावी, तिला दाखवावी, पण या अशा कविता विरोपातून गावोगाव 'गुड१, मस्ट रीड' म्हणून फॉरवर्ड का होतात?
अवांतर २: लहानपणी मी भयंकर असंबद्ध कविता करायचे (आताही कधीकधी करते!) आणि इतक्या लहान वयात त्या करत असल्याने ऐकणारे (नाईलाजाने) वा वा म्हणायचे. 
त्यावेळच्या दोन कविता(?):
१. एक ढग आला,
दुसरा ढग आला,
सगळेच ढग आले,
पाऊस पाडून गेले

२. आकाशात चमकतो एक तारा
तो आहे _____(इथे मी त्या काळी वारलेल्या एका नेता मायलेकांची नावं टाकली होती)

दस नंबरी

unread,
Jul 13, 2007, 4:15:45 AM7/13/07
to manogat_...@googlegroups.com

तिरडी की तळी

काही सन्मान्य अपवाद वगळता नवकविता (किंवा ज्याला प्रायोगिक काव्य म्हणता येईल) अशा बऱ्याच कविता दर्जाहीन आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यामुळे एकूणच अशा पद्धतीची कविता (चांगली असली तरी) दिसली की ती टाळायची अशी मनोगत वाचकांची मनोवृत्ती झाली आहे.

येथील कविता आणि त्यांना वाचकांचा प्रतिसाद पाहता - वाचकांच्या मनाला त्रास होईल, समजायला अवघड जाईल अशा कवितांकडे दुर्लक्ष कऱण्याकडे कल दिसून येतो. पण कोणताही कलाप्रकार समजावून घेणे हेही वाचकांचे कर्तव्यच आहे. तो तुम्हाला आवडला नाही तरी त्या प्रकाराचे इतरही भोक्ते असू शकतात.

प्रस्तुत चर्चा बांडगुळे आणि तिरडी असे शब्द न वापरताही करण्यासारखी होती.तसेच अमेरिकन आणि भारतीय वाचक अशी वाचकांची भौगोलीकदृष्ट्या नसून मानसिक असावी.  

वरील चर्चेस आमचा प्रतिसाद म्हणून मुद्दामच एक कविता लिहिली आहे. आवडली किंवा नाही तरी सकारण प्रतिसाद द्यावा. अकारण "आवडली नाही" / "आवडली" अशी अधांतरी विधाने करू नयेत. कविता समजली नाही तर तसे सांगावे म्हणजे अर्थ देता येईल. या चर्चेचे प्रस्तावक आणि आतापर्यंत प्रतिसाद देणारे वाचक यांचे मत जाणून घेऊ म्हणतो.
आमच्या मते तरी ती कविता दर्जाहीन नाही. तेंव्हा आम्ही आमची तिरडी उचलली जाते की तळी याची वाट पहात आहोत.

आपला,
दस नंबरी

ता.क.

अनुजी, http://www.manogat.com/node/10773 या कवितेचा उल्लेख आपल्या प्रतिसादात करून आपण आमच्यावर अनंत उपकार केले आहेत. निदान आपण ही कविता वाचून तिचा अर्थ काय असावा? किंवा काहीच अर्थ नसावा काय? इतका तरी विचार केलात. धन्यवाद! 

आपणाला हवा असलेला अर्थ मी सांगेनच!

मिलिंद फणसे

unread,
Jul 13, 2007, 5:57:51 AM7/13/07
to manogat_...@googlegroups.com

उदाहरणाबद्दल

स्थलांतरित.

विनम्र

unread,
Jul 13, 2007, 9:11:03 AM7/13/07
to manogat_...@googlegroups.com

टुकार कवितांना उत्तर

टुकार कविता या येणारच. त्यावर अजिबात प्रतीक्रिया न देणे व दर्जेदार कवीतांना मनमुराद व भरघोस प्रतीसाद देणे हे करु शकतो.

ज्या वाचकांनी पुर्वी चांगल्या कवीता वाचल्यास नसतील त्यांना कदाचित तथाकथित मुक्त काव्य रुचणे शक्य आहे. त्यावर जाणकार वाचकांनी वेळ घालवणे व्यर्थ आहे हेच खरे.

चित्त

unread,
Jul 13, 2007, 8:10:50 AM7/13/07
to manogat_...@googlegroups.com

मानसिकरीत्याच म्हणायचे आहे

तसेच अमेरिकन आणि भारतीय वाचक अशी वाचकांची भौगोलीकदृष्ट्या नसून मानसिक असावी. 
अगदी मानिसकरीत्या 'अमेरिकन' वाचकांबद्दलच बोलत होतो.

दस नंबरी

unread,
Jul 13, 2007, 10:39:51 AM7/13/07
to manogat_...@googlegroups.com

अर्थ दिला आहे -

कवितेच्या प्रतिसादात अर्थ दिला आहे. पहावा.

अज्जुका

unread,
Jul 13, 2007, 2:20:05 PM7/13/07
to manogat_...@googlegroups.com

विषय काय लिहायचा बरं!

एकीकडे दर्जा सापेक्ष आहे असं म्हणायचं आणि दुसरीकडे छंदोबद्ध तेच चांगले आणि मुक्तछंद ते वाईट असा सरळ सरळ वैश्विक सत्य सांगितल्यासारखा सूर लावायचा... हे कसं काय?

अहो कोहम व्यावसायिक कवींच्याही काही रचना वाईट असतातच की... आतून लिहायला भाग पडत नाही आणि बाहेरून भाग पडणे असते अश्या कात्रीत अडकलेल्या. किंवा मग चंगो... नुसत्या शब्दांच्या कसरती. मीटर मधे लिहिल्याचा आव आणत केलेल्या.

बाकी त्या उदाहरणातल्या कवितेबद्दल (?) अनु यांच्याशी सहमत.

को अहम

unread,
Jul 13, 2007, 9:09:36 PM7/13/07
to manogat_...@googlegroups.com

अहो

व्यावसायीक कवींच्या वाईट रचना असतात पण चांगल्याही असतातच की. मग तुम्ही फक्त वाईट कविता वेगळ्या कशा काढणार? आणि आधी म्हटल्याप्रमाणे मला न आवडलेली कविता तुम्हाला आवडून जाईल आणि तुम्हाला न आवडलेली कविता मला आवडून जाईल. जसे "एकलम खाजा". कवीने स्पष्टीकरण दिल्यावर ती कविता मला आवडली. तुम्हाला नाही आवडली. आता बरोबर कोण आणि चूक कोण? मुळात रसग्रहण हे बरोबर किंवा चूक असतच नाही वैश्विकरित्या. ते व्यक्तिगत चांगले किंवा वाईट असू शकेल मात्र. ह्यावर उपाय मला तरी सुचत नाही.

मिलिंद फणसे

unread,
Jul 13, 2007, 10:28:28 PM7/13/07
to manogat_...@googlegroups.com

छंद, दर्जा

कविता (खरे तर कोणत्याही प्रकारचे लेखन) दोनच प्रकारच्या - चांगल्या किंवा वाईट. कविता केवळ छंदात लिहिल्याने चांगली होत नाही व मुक्तछंदात लिहिल्याने वाईट ठरत नाही. तसेच फक्त मुक्तछंदातील ते काव्य व छंदबद्ध ती निव्वळ शाब्दिक कसरत ही भूमिकाही पटण्यासारखी नाही. दोन्ही गटात दर्जेदार, ताकदीच्या कविता आढळतात तशाच तद्दन टुकार रचनाही. मला वाटते, दर्जा सापेक्ष नसतो, व्यक्तिगत आवड-निवड सापेक्ष असते. मनोगत ओपन फोरम आहे, सर्व सदस्यांना आपले लेखन सादर करण्याची मुभा आहे. यावर आक्षेप घेतल्यास elitismचा (माफ करा, पटकन मराठी शब्द सुचला नाही) आरोप होईल.
जालावर काही काव्यफोरा असे आहेत जिथे गट पाडलेले असतात. उदा. इथे पाहा. गटांत टीका चढत्या भाजणीने अधिकाधिक निर्दय होत जाते. आपली कविता कोणत्या गटात टाकायची हे कवीने ठरवायचे मात्र पुढे होणाऱ्या चिरफाडीची मानसिक तयारी ठेवून! अगदी प्राथमिक गटातही निव्वळ "वा", "छान","आवडली" छाप प्रतिसाद नसतात. मनोगतावर अशी व्यवस्था केली तरी ती कितपत पसंत पडेल, स्वीकारली जाईल याबद्दल शंकाच आहे. तेव्हा येथील "जो जे वांछील तो ते लाहो" धोरण मान्य करून आपल्याला हवे ते वाचावे व इतर सोडून द्यावे. हजारो वर्षे जगातील सर्व भाषांमध्ये कविता केल्या जात असूनही आजतागायत 'कविता म्हणजे काय? कविता कशाला म्हणावे' या प्रश्नांना सर्वमान्य उत्तरे मिळू शकली नाहीत तर'चांगली कविता कोणती' ह्याचे निर्विवाद उत्तर कसे मिळणार?

नक्षत्र क्र. २८

unread,
Jul 15, 2007, 4:09:28 AM7/15/07
to manogat_...@googlegroups.com

साधे स्पष्टीकरण आहे.....

चांगले काय  नि वाईट काय कसे ओळखावे ? प्रत्येक गोष्टीला दोन बाजु असतात एक आपली आणि दुसरी चुकीची !!! आले का लक्षात ? आता सुटला ना प्रश्न ?

नक्र-२८

दस नंबरी

unread,
Jul 14, 2007, 12:23:18 AM7/14/07
to manogat_...@googlegroups.com

या चर्चेतील माझा प्रतिसाद वाचावा.

बाकी त्या उदाहरणातल्या कवितेबद्दल (?) अनु यांच्याशी सहमत

कृपया कोणतीही सहमती प्रदर्शित करण्यापूर्वी कशाशी सहमत होत आहात याची नोंद घ्यावी. त्यांना ती कविता(!) समजली नाही. तुम्ही ती वाचली असावी असे वाटते. आपल्यालाही समजली नसेल तर अर्थ वाचावा.
समजूनही आवडली नसली तर का आवडली नाही - ते कवितेच्या प्रतिसादात लिहावे. ही चर्चा ते सांगण्याचे ठिकाण नाही.

आपला छंदोबद्ध कवितेला असणारा विरोध उघड आहे. पण तो विरोध छंदोबद्ध कवितेच्या समर्थकांना टोचू नये म्हणून एका मुक्तछंद कवितेचा बळी देणे आपल्याला शोभत नाही. कृपया 'दस नंबरी' हा सलील वाघ असू शकतो याचा विचार करावा.
आपल्या कवितेवरील (तिथल्याच) प्रतिसादाची वाट पहात आहे.

अज्जुका

unread,
Jul 15, 2007, 12:54:24 AM7/15/07
to manogat_...@googlegroups.com

हे कसं काय ठरवलं?

>>तसेच फक्त मुक्तछंदातील ते काव्य व छंदबद्ध ती निव्वळ शाब्दिक कसरत ही भूमिकाही पटण्यासारखी नाही. <<

माझी भूमिका अशीच आहे हे तुम्ही कुठल्या आधारावर ठरवलंत? असं मी तरी कधीही कुठेही म्हणाले नाहीये.

कविता किंवा कुठलाही कलाप्रकार हा व्याख्येत बसवता येत नाही. ती व्याख्या सतत वाढत वा बदलत असते.

दर्जा सापेक्ष असतो असे मी तरी म्हणाले नाहीये. दर्जाचे निकष ठरवायचा मी माझ्या परीने प्रयत्न सुरू केला होता. अनेक निकषांपैकी एक मांडला होता आणि सर्वांनी त्यात भर घालत जावी असंही म्हणाले होते पण नंतरचे २-३ प्रतिसाद मुक्तछंद म्हणजे वाईट आणि छंदोबद्ध तेच काय ते उत्तम असेच दिसले. बाकी काही नाही.

अज्जुका

unread,
Jul 15, 2007, 12:21:37 AM7/15/07
to manogat_...@googlegroups.com

काहीही!

कविता लिहिल्यानंतरही कवीने अर्थ समजावून द्यायला लागत असेल तर मला त्या कवितेबद्दल 'आवडली नाही' असेच म्हणावे लागेल. त्याबद्दल तुम्ही मला जाब विचारू शकत नाही. विषयाच्या अनुषंगाने इथे मी एखाद्या गोष्टीला सहमती दाखवली असेल तर त्यावर उगाच इथे बोलू नका तिथे बोलू नका असे सांगण्याचा आपणाला अधिकार नाही.

माझा छंदोबद्ध कवितेला विरोध बिरोध मुळीच नाही पण वरती १-२ जणांच्या प्रतिसादामधे मुक्तछंद तो वाईट आणि छंदोबद्ध ते चांगले हा सूर दिसला तो संपूर्ण अयोग्य आहे असे मला वाटते.

तुमच्या कवितेचा बळी? सलील वाघ? कोण? काय संबंध? इथे तुम्ही माझ्यावर स्पष्टपणे अनेक आरोप केले आहेत. १. कुणाच्या तरी गुडबुक मधे रहाण्यासाठी मी खोटं बोलते आहे की तुमची कविता आवडली नाही. २. तुमची कविता मला आवडली आहे. ३. लिहिणारा कोण आहे हे बघून मी प्रतिसाद देते (वस्तुतः मला सलील वाघ माहीतही नाही).

केवळ तुमची कविता आवडली नाही असे म्हणल्याने चिडून तुम्ही हे फालतू खोटे आरोप करत आहात.

मिलिंद फणसे

unread,
Jul 15, 2007, 10:09:34 AM7/15/07
to manogat_...@googlegroups.com

गैरसमज

माझी भूमिका अशीच आहे हे तुम्ही कुठल्या आधारावर ठरवलंत? असं मी तरी कधीही कुठेही म्हणाले नाहीये.
दर्जा सापेक्ष असतो असे मी तरी म्हणाले नाहीये.

हे तुम्ही म्हटले असे मला मुळीच म्हणायचे नव्हते. तुमच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊन या विषयी माझे दोन पैशाचे मत दिले आहे. तुम्ही असे म्हटले असे मी म्हणत आहे असा तुमचा व इतर वाचकांचा गैरसमज झाला असल्यास मी त्याबद्दल दिलगीर आहे. कदाचित माझी उप-प्रतिसाद देण्याची जागा चुकली असावी. तो थेट प्रतिसाद म्हणून द्यायला हवा होता.

दस नंबरी

unread,
Jul 17, 2007, 8:59:03 AM7/17/07
to manogat_...@googlegroups.com

फालतू? खोटे?

ही चर्चा केवळ दिलेल्या विषयावर असून आपण आमच्या कवितेवर येथे टिप्पणी करून अनावश्यक वादंग माजवत आहात. आम्ही तुमच्यावर कोणतेही आरोप केलेले नसून जे सत्य आहे तेच समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही चिडलो नसून व्यक्त होणाऱ्या मतांनी गांगरल्यामुळे आपल्याला तसे वाटत आहे.
आपल्याला ती कविता आवडली नसेल तर ते कवितेच्या प्रतिसादात सकारण लिहा इतकेच म्हणायचे आहे.
अपण नि:स्पृह आहात याबद्दल विश्वास वाटतो. पण आमचा पूर्वीचा प्रतिसाद वाचूनही तुम्ही आपले कवितेबद्दलचे मत येथेच व्यक्त केलेत याबद्दल आमचा आक्षेप आहे.

फालतू खोटे आरोप असे असांसदीय शब्द कृपया वापरू नयेत.

Reply all
Reply to author
Forward
0 new messages