दुष्काळ पडलाय…. मला माहित आहे, मला मदतही करायची आहे… पण मी काय करू शकतो….?
फक्त होळी /रंगपंचमी विनापाण्याने खेळून प्रश्न सुटणार नाही. त्यांना आता या घडीला मदत मिळायला हवी… मदत म्हणजे तरी काय हो… पाणी(पाण्याचे टँकर ) अन जनावरांसाठी चारा…
पाण्यासाठी दाही दिशा… आतापर्यंत फक्त म्हण ऐकलेली, पण आता पूर्ण महाराष्ट्र ते अनुभवतोय…
१९७२ नंतरचा भीषण दुष्काळ… भ्रष्ट राजकारण्यांच्या/ अधिकाऱ्यांच्या मुळे झालेली वाताहत… त्यांना काही नाही हो, पैसे खाउन मस्त आरामात बसलेत, पण जनतेचे अतोनात हाल चालू आहेत. राज्यातल्या तब्बल १२२ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. १५-२० दिवसांनी पाण्याचा एक टँकर पुरवला जातोय. अन त्यामुळे पाण्यावरून समाजात भांडणे -वादविवाद होत आहेत.
पाण्यासाठी टँकरची तासान तास कामधंदे सोडून वाट पाहत बसने, अन एकदा का तो आला कि त्याचावर तुटून पडणे. कारण पर्यायच नाही न हो, जेवढ जमेल तेवढ पाणी साठवून ठेवायचं अन पुढच्या १५-२० दिवसांसाठी पुरवून वापरायचं. याच्या यातना काय असतात हे मी हि अनुभवलंय. ती जनावरांची छावणी, चाऱ्यासाठी रोजची लाइन.
खरच दुष्काळ तुमच्या पासून तुमचं जीवनच हिरावून घेतो हो. माणसातलं माणूसपण हरवून बसतं. भांडणे- मारामारी… कशासाठी …? पाण्यासाठी.
या भ्रष्ट सरकारला योग्य वेळेवर खाली खेचेलंच, पण आता या लोकांपर्यंत पाण्याचे टँकर पोहोचले पाहिजेत. जनावरांच्या छावणीत चार पोहोचला पाहिजे
मी स्वत: माझ्या कामातून वेळ काढून त्यांना मदत करायला नक्कीच जाऊ शकत नाही, पण… पण आर्थिक स्वरूपात थोडीफार मदत तर नक्कीच करू शकतो… खारीचा का होईना वाटा उचलूच शकतो. माफ करा मदत बोललो, मदत नव्हे माझ कर्तव्य आहे ते, माझी जवाबदारी आहे.
कदाचित तुमचीही हीच भावना असेल, आपापल्या परीने सर्व जन थोडी थोडी आर्थिक मदत करू आपण. अन कोणत्या तरी सामाजिक संस्थेमार्फत गरजूंपर्यंत पोहचवू.
मुख्यमत्री फंडाला केलेली मदत गरजूंपर्यंत पोचेल यावर माझा तिळमात्रही विश्वास नाही… म्हणून मी शोधतोय अशी एक सामाजिक संस्था जी ते दिलेले पैसे योग्य रुपात गरजू पर्यंत पोहोचवेल. एकदम पारदर्शक पद्धतीने. कि जेणे करून काय मदत केली ती सर्वांसोबत फोटो / अन माध्यमाने दाखवता येईल.नाही नाही, स्वतःचा उदो उदो करण्यासाठी नाही तर दिलेली रसद लाभार्थी पर्यंत पोहोचल्याची खात्री अन समाधान.
जर तुम्हाला अशी संस्था माहित असेल तर कृपा करून मला सांगा.
अन जर तुम्हीही काही मदत करू इच्छित असाल तर मला अवश्य कळवा.
खर सांगू, खूप दिवसान पासून मनात होत हा mail लिहायचं, पण लाज वाटत होती कि शेजारची राज्य इतकी प्रगत/सर्वभूसंपन्न होत असताना आपण मदतीसाठी पसरवतोय. (म्हणून गुपचूप एका वृत्त वाहिनीच्या आवाहनाला पैसे पाठवून गप्प बसलो…पण म्हणव अस समाधान नाही मिळालं हो. माहित नाही ते पैसे उपयोगी आले कि कोणाच्या घश्यात गेले. पण समाधान नाही मिळालं.)
नाही हो राहवत, १२ वी ची परीक्षा देऊन मुले भविष्यासाठी क्लास लावायच्या ऐवजी वडिलांसोबत माथाडी कामगार बनलेत.रोज वृत्त वाहिनीवर पाण्याच्या धावपळीत जीव गमावलेले/ स्थलांतरित होणारे चेहरे पहिले कि मन सुन्न होत.काही तरी करायचं पण काय? मर्यादा येतात.
म्हणून विचार केला कि आपल्या "Social Networking " ला आवाहन करू अन पाहू काही लक्षणीय मदत करू शकतो का ते. काही मार्ग मिळू शकतो का ते.