मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी[१] व भारतातील चौथी भाषा आहे.[२] मराठी बोलणार्यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे.[३] मराठी भाषेची निर्मिती संस्कृत पासून महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे.


मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. या नंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तिपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इ.स. १९३० पासून मराठी साहित्य संमेलन सुरू झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला.
सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे:

ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥
देवा तूंचि गणेशू । सकलार्थमतिप्रकाशु । म्हणे निवॄत्तिदासु । अवधारिजो जी ॥२॥
हें शब्दब्रम्ह अशेष । तेचि मूर्ती सुवेष । जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥३॥
सर्वांत जुना मराठी लेखनाचा पुरावा सातारा येथे विजयादित्य काळातील ताम्रपट्टीवर आहे:

विवेकसिंधु (मराठी लेखनभेद: विवेकसिंधू) हा मराठी भाषेतील आद्य काव्यग्रंथ, मुकुंदराज या कवीने लिहिला. या ग्रंथाची निर्मिती शा.श. १११० सालातील असावी. : -
वेदशास्त्रांचा मथितार्थु | मर्हाटिया जोडे फलितार्थु |
तरि चतुरीं परिमार्थु | कां नेघावा ||१||