वसंतराव देशमुख नावाचे, 61 वर्षांचे एक मध्यमवर्गीय निवृत्त गृहस्थ माझ्या भेटीला आले होते. दोन मुले, पैकी थोरल्याचे लग्न झालेले, मुलगा व सून दोघेही नोकरी करणारे. आता वसंतराव धाकट्या चिरंजीवांसाठी(केतन) लग्नाची तयारी सुरु करत होते. धाकटा मुलगाही सुशिक्षित इंजिनिअर, एका कंपनीमध्ये उत्तम पगारावर नोकरीला होता. वसंतरावांची अडचण अशी होती की, स्थळ-शोध मोहीम थेट त्यांच्याच खांद्यावर येऊन पडली होती आणि त्यांचे वय, उपलब्ध पर्यायांची मर्यादित माहिती आणि सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी अपुरे ज्ञान ह्यामुळे लग्न ठरण्याला विलंब होत होता. मोठा मुलगा-सून ह्यांना नोकरी/संसार ह्यामुळे वेळ मिळायचा नाही आणि केतनच्या अपेक्षा/जोडीदाराविषयी विचार ह्याविषयी पूर्ण कल्पना नव्हती.
आता, ही सर्व परिस्थिती बघितल्यावर माझ्यापुढे प्रश्न पडला असे अनेक मध्यमवर्गीय वसंतराव देशमुख, जाधव, देशपांडे, पाटील, गोरे, कुलकर्णी, नगरकर, काळे इ. असतील कि ज्याच्याकडे थोड्याफार प्रमाणात अगदी सेम परिस्थिती असेल. त्यांनी काय करावं? इथे काही टोकदार प्रश्न माझ्यापुढे उभे राहिले...
· स्थळं शोधण्याची नक्की जबाबदारी कुणाची? लग्न करणा-याची कि त्याच्या नातेवाईकांची?
· पुढे अनेक वर्षे संसार जोडीदारासोबत कुणाला करायचा आहे?
· आपल्याला हवा तसा, आपले विचार, आवडी-निवडी, कौटुंबिक वातावरण इ. गोष्टींशी जुळणारा सुयोग्य जोडीदार शोधण्यासाठी खरे प्रयत्न कुणी करायला हवे?
· लहानपणी आपल्यासाठी योग्य शाळा शोधून शाळेत घालण्याची जबाबदारी आपल्या आई-वडिलांची आणि आपल्या आयुष्यभराच्या संसाराचा जोडीदार शोधण्याची जबाबदारीपण ह्या वयात त्यांचीच?
· अभिमानाने “सुशिक्षित” म्हणवून घेणा-या शहरी कुटुंबातील, जबाबदारीने नोकरी-व्यवसाय करणारे सज्ञान आपण ही जबाबदारी सोयीस्करपणे टाळतो आहोत का?
· पालकांनी शोधलेल्या स्थळांपैकी “मला कुठलं ठीक वाटतं?” एवढंच सांगून आपली निर्णय-प्रक्रियेतील जबाबदारी संपते?
· आज किती तथाकथित “सुशिक्षित” मराठी तरुण-तरुणी स्वतःचा जोडीदार स्वतः शोधण्यासाठी विशेष प्रयत्न करतात? (प्रेमविवाह सोडून)
· किती विवाहेच्छुक “होकार वा नकार” कळवण्यापुर्वी संभाव्य जोडीदाराशी स्वतंत्रपणे किमान दोन वेळा चर्चा करतात?
· किती जण “बघण्याचा” कार्यक्रम (मध्यमवर्गात) करण्यापूर्वी किमान एकदा त्या संभाव्य जोडीदाराशी फोनवर बोलून पुढे जावे कि नाही हे ठरवतात? (आणि आपल्यासोबत इतरांचा वेळ, श्रम इ. वाचवतात?)
आज २०१५मध्ये वेळ आली आहे ह्या सर्वांचा “गांभीर्याने” विचार करण्याची. आपला संसार कुणासोबत, कसा करावा ह्याचा सिरीयसली विचार करण्याची. अन्यथा उद्या तुम्ही कुणाकडेही बोट दाखवू शकणार नाही, मुळी आपल्याला तो अधिकारच राहणार नाही. तेंव्हा आपल्या लग्नाची एक “विचारपूर्ण” गोष्ट घडवा. हवे असल्यास मागदर्शनासाठी आम्ही आहोतच.
अमेय दीक्षित – 97 6611 4411 [ www.apalmanus.com ]