http://maharashtratimes.indiatimes.com/career/Physics/articleshow/43430838.cms
>>प्रा. भालचंद्र भोमे
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र अर्थात फिजीक्स म्हणजे
अनेकांना कठीण जाणारा विषय. या विषयाची तयारी कशी करावी याबद्दल काही
सोप्या टिप्स.
दहावीला चांगले मार्क मिळाल्यावर अनेकजणं अकरावी
सायन्सला प्रवेश घेतात. बहुसंख्यांना इंजिनिअरींग अथवा मेडिकलला जायचं
असतं. इयत्ता ११ वी, १२ वी साठी शास्र शाखेत मंडळाच्या नियमानुसार
भौतिकशास्र विषय जरी अनिवार्य नसला तरी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश
घेताना भौतिकशास्र विषय अनिवार्य आहे. गेल्या अनेक वर्षांच्या निकालावरून
असं दिसतं की या विषयात विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात. त्याचं मुख्य कारण
म्हणजे संकल्पना समजावून न घेता पाठांतरावर जोर देणं. त्यासाठी विषयाची
तयारी कशी करावी, कोणकोणत्या गोष्टी माहित असणं आवश्यक आहे.
भौतिकशास्र विषयाची प्रश्नपत्रिका ७० गुणांची व ३ तासांची असून
प्रात्यक्षिकांसाठी (परीक्षेसाठी ) ३० गुण असतात. गुणनिहाय विभाजनानुसार
प्रश्नपत्रिकेत एकूण ८ प्रश्न विचारलेले असतात. प्रश्नपत्रिकेतील ७०
गुणांची विभागणी ज्ञान, आकलन, उपयोजन व कौशल्य यावर आधारित असून त्यामध्ये
वस्तुनिष्ठ, लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्न विचारलेले असतात. प्रश्नपत्रिका
विकल्पासह एकूण ९८ गुणांची असते. पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकावर
गुणविभागणीनुसार प्रश्न विचारलेले असतात. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना
घटकांसाठी ठेवलेल्या गुणांचा विचार न करता प्रत्येक घटकातील, प्रत्येक
उपघटकांवर आधारित संकल्पनेचा बारकाईने अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यामुळे
प्रश्नपत्रिकेतील सर्व विचारलेल्या प्रश्नांची (विकल्पासह) उत्तरे योग्य
पद्धतीने लिहिता येतील आणि स्पर्धात्मक परीक्षेसाठी फायदा होईल.
इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश घेण्यासाठी इ. १२ वीचं भौतिकशास्र, रसायनशास्र व
गणित या विषयांचे गुण विचारात घेतलं जात असल्याने मंडळाच्या परीक्षेचं
महत्त्व वाढलेलं आहे. भौतिकशास्र हा विषय पाठांतर करण्याचा नसून संकल्पना
समजावून घेऊन त्यावर विचार करण्याचा आहे. विद्यार्थी संकल्पना समजावून न
घेता परीक्षा देतात आणि मग त्यांना हा विषय अवघड वाटतो. प्रत्येक
विद्यार्थ्यांची संकल्पना समजावून घेण्याची क्षमता सारखी नसते. त्यामुळे
प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासासाठी वेगवेगळा वेळ लागतो.
भौतिकशास्र विषयाची तयारी करताना प्रत्येक घटकातील नियम, तत्त्वं,
व्याख्या, संकल्पनांच्या आधारे तयार झालेली सूत्रं, आकृत्या यांची यादी
तयार करावी. प्रत्येक घटक वर्गात शिकविण्यापूर्वी पाठ्यपुस्तकातून (समजला
नाही तरीसुद्धा) वाचून जावा. पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पानाचं सखोल वाचन
किमान एकदा तरी होणं अपेक्षित आहे. सखोल वाचन झाले असेल तरच,
प्रश्नपत्रिकेतील वस्तुनिष्ठ प्रश्नांची कमी वेळात योग्य उत्तरं देता
येतात. वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी प्रत्येकी साधारण एक मिनिट पुरेसा असतो.
प्रत्येक घटकातील संकल्पना समजावून घेतल्यानंतर त्यावर उपयोजनाच्या बाबतीत
विचार करावा. प्रत्येक सूत्र सिद्ध करण्याची पद्धती (पुस्तकातून न पाहता)
लिहून पहावी व त्यासाठी लागणारा वेळ प्रश्नांसाठी ठेवलेल्या गुणांच्या
आधारे असावा (साधारणपणे १ गुणासाठी ३ मिनिटे). अशा पद्धतीने सराव करीत
असताना ज्या पायऱ्या लिहिता येणं शक्य नाही तेवढ्या पुस्तकात पाहण्यास हरकत
नाही. प्रत्येक घटकातील सर्व आकृत्या योग्य प्रकारे, योग्य वेळेत काढता
येतात की नाही याचा सराव करावा. आकृत्या काढून झाल्यानंतर पाठ्यपुस्तकात
पाहून स्वतः तपासाव्यात व योग्य ती दुरुस्ती (असल्यास) करावी. संकल्पना
समजल्यानंतर गणितं सोडवणं अतिशय सोपं असतं. गणित सोडवण्याचा सराव
करण्यापूर्वी पुस्तकात सोडवून दाखवलेली सर्व गणितं समजावून घेऊन वाचावीत.
दिलेल्या व विचारलेल्या राशींचा संबंध असलेल्या सुत्राचा विचार करावा.
दिलेल्या सर्व राशींची एककं एकाच पद्धतीत आहेत याची खात्री करावी अन्यथा
एकाच पद्धतीत प्रतीयोजन करण्यापूर्वी रुपांतरीत करावीत. सुत्र जुळत असल्यास
किंमती घालून लॉग - टेबलच्या (आवश्यक असल्यास) सहाय्याने उत्तर काढावं व
योग्य ते एकक लिहावं. एकक नसल्यास लिहू नये. सुत्रांआधारे सामग्री बरोबर
जुळत नसल्यास संबधित सुत्रं एकत्र करून नवीन सुत्र तयार करावं जेणेकरून
दिलेली व विचारलेली आधारसामग्री जुळेल. सुत्रे एकत्र करताना असं पहावं की न
दिलेली व न विचारलेली राशी नवीन सुत्रात नसेल.
ज्या संकल्पना
बारावीत समजायला कठीण जातील त्या अकरावीतच जास्त जोर देऊन समजून घ्या. अशा
पद्धतीचा अभ्यास प्रत्येक घटकाच्या बाबतीत करणं अपेक्षित आहे. दिवसाच्या
वेळापत्रकात सर्व विषयांना वेळ देणं आवश्यक आहे तरी सुद्धा भौतिक शास्राची
तयारी कमी पडत असेल तर अभ्यासाचा जास्त वेळ याच विषयाला द्यावा.
पाठ्यपुस्तकातील प्रत्येक उपघटकांची तयारी करीत असताना पूर्वी तयार केलेले
घटक / उपघटक यांची आवश्यकतेप्रमाणे उजळणी करावी.
इ. १२ वीच्या
परीक्षेची काठीण्यपातळी स्पर्धात्मक परीक्षेएवढी नसल्याने जास्तीत जास्त
गुण मिळवणं सहज शक्य असतं. इ. १२ वीच्या परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी
असते तर स्पर्धात्मक परीक्षा सर्वांना अनिवार्य नसते. पाठ्यपुस्तकात
दिलेल्या वेबसाईटस रून थोडी जास्त प्रमाणात माहिती करून घेण्यास हरकत नाही.
१५ सप्टेंबर २०१४ पर्यंत काही घटकांची तयारी पूर्ण झालेली असेल तरी ३१
डिसेंबर १०१४ पर्यंत सर्व घटकांची तयारी झालीच पाहिजे अशा पद्धतीने अभ्यास
करावा. सर्व तयारी झाल्यानंतर प्रश्नपत्रिका वेळेत सोडविण्याचा सराव
अत्यावश्यक आहे. वरील प्रमाणे तयारी केल्यास इ. १२वी भौतिकशास्त्र विषयात
पूर्ण गुण मिळतील याची खात्री बाळगण्यास हरकत नाही.