वयक्तिक अनुभव : आईस स्केटिंग
बर्फावर उभे राहून तोल सांभाळणे, चालणे आणि धावणे...
बर्फाचे एक वेगळेच आकर्षण असते, लहान असताना बर्फाचे गोळे खूप खायचो टॉन्सिल होई पर्यंत. काल ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा आईस स्केटिंग साठी सुवोन आईस रिंक ला गेलो. कडक बर्फाच्या फ्लोर वाले ग्राऊंड वर स्टील ची पट्टी असलेले बूट घालून घसरत फिरणे हे आईस स्केटिंग.
थंड गार बर्फ, त्यावर ब्लेड सारखी पाती असलेले बूट घालून स्थिर उभे राहणे एक खूप मोठी गोष्ट. अशात तोल सांभाळून चालणे आणि वेगाने पळणे यासाठी खूप कसरत आणि सराव करणे गरजेचे आहे. मी अगदी लहान मुलासारखा हळू हळू एक एक पाऊल टाकत सुरवात केली. अगदी लहान लहान मुलं खूप सफाईशीर स्केटिंग करताना बघून मला पण ऊर्जा मिळाली प्रयत्न केला ५-६ राऊंड मारले मैदानाला.
काही ट्रेनर प्रशिक्षण देत होते, तोल सांभाळणे, पाऊल टाकणे, गती घेणे, दिशा बदलणे, गती थांबवणे, त्या दरम्यान तोल सांभाळण्यासाठी शरीराच्या हालचाली इत्यादी. एक एक करून पायरी पायरीने शिकलेली लहान मुलं पण खूप छान पद्धतीने स्केटिंग करत होती. मी मुर्खासारखे डायरेक्ट धावायचा प्रयत्न करत होतो. कारण जास्त प्रतीक्षा करण्याचा धीर नव्हता. त्या मुळे बऱ्याच वेळेस तोल जात होता तसेच हळू हळू फिरलो. पण एक गोष्ट लक्षात आली जर आपण नियोजनपूर्वक एक एक पायरी पूर्व तयारी करून मजबूत केली तर पुढील किती मोठे दिसणारे शिखर सहज पार होऊ शकतो.
कोरिया ट्रिप चे फोटो बघायचे असल्यास भेट द्या -
[स्थानिक बोली भाषा] : *बर्फावर उभ्यान सरकगुंडी*
बारीक तंव्हा भलता बर्फाचा गोलं टॉन्सील होत ताव खादेल. काल बर्फाच्या लाद्यांवर हिंडाया गेलुतु. गायचेन बर्फ योच एक वेगळा आयटम त्यावर उभा रेहायचा, चालायचा, धावायचा त्या त जादू सरखा वाटत होता. जेमतेम बुटां घातलीं ना चालून पाहलां धावून पाहलां. कसाक होल मी हो धावायूच पाहें, तं एकसरखां तोल जावं ना पडव दसां. हलूं हलूं ४-५ फेऱ्या मारल्या ओग्यानूच नांगत नांगत. बराकी बारकाली पोरां हो भलती उडया मारीत हिंडत.
[दोन शब्द सामाजिक] : *संचित आणि सात्यत्य किती?*
आदिवासी समाजासाठी कार्य करणाऱ्या अनेक संघटना/संस्था आहेत, अनेकजण खूप चांगले कार्य करत आहेत. पण कधी कधी वाटते आपण *पूर्वनियोजन करून एक एक पायरी मजबूत करणारी यंत्रणा आणि त्यासाठी पूरक उपक्रम* तयार करण्या पेक्षा वेग वेगळ्या दिशेने एकटे एकटे मोठी उडी मारण्यासाठी खूप सारी ऊर्जा खर्च करतोय. यात होते असे कि काही वर्षांनी पुन्हा पुन्हा तेच तेच कार्य करावे लागते, आणि एकंदरीत खूप मेहनत करून पुन्हा गाडी आहे तिथेच.
उदाहरणासाठी ६०-७० च्या दशकातली सामाजिक चळवळ, ७०-८० तली आदिवासी विद्यार्थ्यांची चळवळ, व ८०-९० च्या आणि पुढील इत्तर चळवळी. ही सगळी मेहनत व्यक्ती/संघटना/पक्ष पुरती मर्यादित ठेवण्यापेक्षा जर आपण *एकत्रित समाज म्हणून संचयित करून पूरक आणि प्रभावी करत गेलो असतो तर सध्या आपल्याना खूप वेगळे चित्र दिसले असते*, तर २०१७ मध्ये परत विद्यार्थ्यांना त्यांचे प्राथमिक प्रश्नांसाठी उपोषण/आंदोलन करावे लागले नसते. कारण आता पर्यंत प्रत्येक स्थरावर आदिवासी समाजाविषयी संवेदना आणि जाण असलेले अधिकारी, नेते, प्रतिनिधी आणि प्रभावी सामाजिक संघटन चे जाळे असले असते वैचारिक दिशे विषयी जागरूकता असली असती. या काळात अनेक पक्ष/संघटना मोठ्या झाल्या काही नेते पण मोठे झाले दुर्दैवाने समाज आहे तिथेच आहे (साक्षरतेचे थोडे प्रमाण वाढले आहे, नोकरी करणाऱ्यांचा काही टक्का वाढला आहे), पण समाजाचे बहुतेक प्रश्न आहेत तसेच आहेत (काही तर बिकट होत जात आहेत).. यावर गांभीर्याने विचार करायला हवा त्या साठी *समाजोउपयोगी उपक्रम व्यक्ती/संघटना यांच्या वर अवलंबून बनविण्यापेक्षा व्यवस्था अवलंबून करूया. तात्पुरता उपाय, प्रतीकात्मक कार्यापेक्षा स्वावलंबन आणि सशक्तीकरण यावर काम करूया जे टिकावू स्वरूपात पुढच्या पिढीला पण कामी येईल*.
सहज मनात आले म्हणून लिहतोय (काहींना राग येईल, पण उद्देश समजून घ्या), काल विश्व हिंदू परिषदेच्या जनजाती कल्याण आश्रम तलासरी ला ५० वर्ष पूर्ण झाली त्या निमित्ताने विराट हिंदू संमेलन आयोजित केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मार्गदर्शनासाठी डहाणू (असावे) येथे आले होते. खूप मोठ्या प्रमाणात सहभागी आदिवासी होते, त्याची झलक दिसत होती, दर्शनी भागात आदिवासी क्रांतिकारकांचे फोटो, कार्यक्रमात आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी. या संदर्भात व्हाट्सअँप वर विरोधाचे टीकेचे/आक्रोशाची/एग्रेसिव्ह मेसेज वाचनात आले. असो, वैचारिक विरोध असू शकतो. टोकाचे मतभेद असू शकतात. पण पद्धतीकडे दुर्ल्क्ष होता कामा नये
आपण सोयीस्करपणे त्यांचे ~५० वर्षांचे ध्येय आधारित अविरत कार्य, त्यासाठी प्रामाणिक पणे तन मन धन देणाऱ्या पिढ्या, व्यवस्था, समाज संपर्क, व्याप्ती, त्यांना *वाढत असलेला विविध माध्यमातून सप्पोर्ट इत्यादींकडे दुर्लक्ष करतोय*. असेच ठाणे/पालघर जिल्ह्यात कम्युनिस्टांचे ~७३ वर्षांपासून पासून, मिशनऱ्यांच्या ~१२० वर्षांपासून पासून विविध कार्य सुरु आहे, आणखीन अनके बिगर आदिवासी चळवळी आहेत त्यांचे प्रभाव कमी जास्त होत आहेत पण त्यांनी त्यांची व्यवस्था खूप मजबूत केली आहे. या प्रत्येक व्यवस्थेत एक पूर्ण आदिवासी केडर तयार झाले आहेत आणि ते त्यांच्या ठरलेल्या दिशेने काम करत आहेत. *एक एक पायरी मजबूत करत पुढे जात आहेत*. *आपण मात्र या सगळ्यांना मनसोक्त शिव्या देण्यात टीका करण्यात आपली ऊर्जा घालवून धन्यता मानतो. जसे कि त्यांना शिव्या दिल्याने त्या पटीने आपला विकास होणार आहे*. मला वाटते,
आपण समाजासाठी त्यांच्या पेक्षा अधिक प्रभावी काम करू शकतो? आपल्याकडे त्यासाठी व्यवस्था आहे? तन मन धन देणारी फळी आहे? प्रामाणिक, निस्वार्थी आणि ध्येय वेडे नेतृत्व गट आहेत? विचार सरणींनी पेटलेल्या पिढ्या आहे? प्रत्येकाला दिशा/संस्कार देणारी यंत्रणा आहे? स्वावलंबी अर्थव्यवस्था आहे? प्रत्येक हाताला काम देणारी रोजगाराची सोय आहे? उच्चशिक्षित, सुशिक्षित, अशिक्षित यांच्याशी जवळचा संवाद आहे? ..... *नसेल तर ते तयार करूया, असेल तर अधिक मजबूत करूया*.
असो खूप उशीर होतो आहे, आपले अस्तित्व अस्मिता दिवसेंदिवस पणाला लागत आहे. दुर्दैवाने आपण सगळे मात्र नकारात्मक विचारात अडकून आणि एकमेकांचे पाय खेचण्याच्या उपक्रमात मग्न आहोत. आदिवासी समाज हितासाठी काही करायचे असल्यास जल जंग जमीन जीव या सगळ्यांसोबत आदिवासी समाज स्वावंलम्बी (आर्थिक/सामाजिक/अध्यात्मिक/सांस्कृतिक...) करण्यासाठी प्रयत्न करूया. तुम्हाला काय वाटते आपले मत कळवावे.