प्रश्न विचारा!

3 views
Skip to first unread message

Vijay Patil

unread,
Aug 20, 2014, 4:06:30 AM8/20/14
to pttfgen

सार्वजनिक वाहतूक हा आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे; पण पुण्यातील पीएमपी मरणासन्न अवस्थेत आहे. राज्य सरकारने कंपनी केली; पण ती चालविण्यासाठी ना योग्य अधिकारी दिले, ना निधी. इतकेच काय तर या कंपनीच्या संचालक मंडळावर तज्ज्ञ संचालक नेमण्यासाठीही सरकारला पाच वर्षांमध्ये वेळ झाला नाही. या सगळ्यामध्ये पुणेकर मात्र वेठीला धरले जात आहेत. या पीएमपी सेवेबद्दल या आमदारांची काय भूमिका आहे, हा प्रश्नही त्यांना विचारा; कारण या आमदारांनी राज्य सरकारवर दबाव आणल्याशिवाय पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूकीचा सक्षम पर्याय उभा राहणार नाही. मेट्रोचा पर्याय पुढे जाण्यासाठी आपले आमदार नक्की काय करणार हे ही त्यांना विचारा. मेट्रोची कंपनी स्थापन होण्यासाठी राज्य सरकारने तब्बल दोन वर्षे लावली त्या वेळेस हे कोठे होते, त्यासाठी त्यांनी काय केले हे ही त्यांना आवर्जून विचारा.

पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन होणे गरजेचे आहे. मुंबईमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून झालेले रस्ते, उड्डाणपूल, मोनोरेल, मेट्रो, सागरी वाहतूकीचे मार्ग याच्या जाहिराती निवडणुकीच्या निमित्ताने आपण सगळेच बघतो आहोत. पुण्यासाठीही असेच विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी घेण्यात आला आहे; पण तो प्रत्यक्षात आलेला नाही. त्यामुळे पुणे शहर आणि परिसराचे एकत्रित नियोजन केले जात नाही. त्याचा फटका महापालिका क्षेत्राच्या बाहेर टेकड्यांवर अतिक्रमण होण्यापासून ते ठिकठिकाणी झोपडपट्ट्या वसण्यापर्यंत बसतो. बाहेरच्या क्षेत्रातील रस्त्यांच्या रुंदीपासून ते सार्वजनिक वाहतूकीचे पर्याय उपलब्ध करून देण्यापर्यंत सगळेच प्रश्न हे प्राधिकरण सक्षमतेने सोडवू शकते. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या शहरासाठी हे प्राधिकरण स्थापन करण्यात राज्य सरकारला काय अडचणी आहेत, हे आजपर्यंत कोणत्याही आमदाराने किंवा पालकमंत्र्यांनी पुणेकरांना सांगितलेले नाही. या पाच वर्षांमध्येही पीएमआरडीएसाठी कोणतेही ठोस पाऊल टाकले गेले नाही. त्यामुळे आताच्या आमदारांनी यासाठी काय केले, हे ही या आमदारांना विचारा. विधानभवनाच्या बाहेर कोणी तरी सांगितले म्हणून धरणे धरून बसण्यासाठी आपण त्यांना निवडून दिलेले नाही; तर त्यांना असलेले अधिकार वापरून विधिमंडळामध्ये सरकारवर दबाव आणण्यासाठी त्यांना निवडून दिले आहे, याची आठवणही त्यांना करून देणे आवश्यक आहे.

Reply all
Reply to author
Forward
0 new messages