पुण्यात 'स्मार्ट सिटी'साठी 'स्मार्ट बक्षिसे'
‘स्मार्ट सिटी‘ प्रकल्पामध्ये लोकसहभाग घेण्यासाठी महापालिकेने खुली स्पर्धा जाहीर केली असून, यातील पहिल्या तीन "स्मार्ट सूचना‘ करणाऱ्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. नागरिकांना आपल्या "स्मार्ट सूचना‘ पत्राने अथवा ई-मेलद्वारे 20 जुलैपर्यंत महापालिकेला पाठविता येणार आहेत. महापौर दत्तात्रेय धनकवडे आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
केंद्र सरकार देशातील शंभर शहरे "स्मार्ट सिटी‘ म्हणून विकसित करणार आहे. या शहरांची निवड राज्य व केंद्र अशा दोन पातळ्यांवर होणार आहे. त्यासाठी संबंधित शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वतःचे 50 कोटी रुपये दरवर्षी खर्च करावे लागणार आहेत. तसेच, दरवर्षी 200 कोटी रुपये खर्च करण्याची यंत्रणाही असली पाहिजे. याशिवाय लोकसहभागही आवश्यक असून त्यालाही गुण देण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने शिक्षण, ऊर्जा, पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, ई-गव्हर्नन्स, आरोग्य, आयटी कनेक्टीव्हिटी, सुरक्षा, झोपडपट्टी निर्मूलन, वाहतूक आणि पाणीपुरवठा, परवडणारी घरे हे घटक निश्चित केले आहेत. या घटकांना 1 ते 3 असा प्राधान्यक्रम द्यायचा आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये कोणत्या घटकाला अधिक महत्त्व द्यायचे हे यावरून निश्चित करता येणार आहे. तसेच, वरील घटकांसह अन्य घटकांवरही नागरिकांना सूचना करता येणार आहेत. एक किंवा एकापेक्षा जास्त सूचना करता येणार आहेत.
यातील पहिल्या तीन सूचनांना अनुक्रमे 25 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. महापौर आणि महापालिका आयुक्त यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच, या सूचनांचा स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये समावेश करण्यात येणार आहे. अशा प्रकारे खुली स्पर्धा आयोजित करणारी पुणे महापालिका ही राज्यातील एकमेव असल्याचा दावा या वेळी आयुक्त कुणाल कुमार यांनी केला. "स्मार्ट सिटी‘ प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्व विभागप्रमुखांकडूनही माहिती मागविण्यात आली होती, तीही तयार असून, राज्य सरकारने मागणी केल्यास ती लगेचच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कुणाल कुमार यांनी सांगितले. आमदार, खासदार आणि नगरसेवक यांच्याही सूचना मागविण्यात आल्या आहेत.
कुठे द्याल सूचना :