।। पालघर लोकसभा पोटातली निवडणूक ।।
[आदिवासी बोली भाषा]
बारीक होतुं त वेग वेगले ठिकाणी पार्ट्यांची चिन्ह ना घोषणा गेरू खाल भीतीवर लिहेल रेहेत. माना भलता आवड वाचया. याचा जिंदाबाद त्याचा मुर्दाबाद, यो जय, तो जय, आले रे आले, गेले रे गेले. ना काय ना काय. मुरबाड/कासा/वानगाव/उधवा/तलासरी/डहाणू इत्यादी परिसरात हमखास नंगाया मिलत. तंव्हा भांडना हो फार होत, एक एक गाव पार्टी पार्टी चा दसां रेहे. एक गाव मिलून बीजे गांवासी कज्या करीत. मंगा हलूं हलूं एक कुटुंब एक पार्टी असा होत गेला, जसा काय धर्मच. आपली मानसा हो ओढी प्रामाणिक काय आजोबासनी जे चिनावर मत देत त्यावरूच त्याची पोरा ना त्याची पोराहो. पन आथा हलूं हलूं बदलाया लागलाहे, ओढा बदलाहे का एकेच घरात ३-४ पार्टी ची पदा. नेता हो जिकडं खाया मिलल तिकडं हिवरत, कव्हां यी पार्टी कव्हां ती पार्टी. लोखा बिचारी सगला सोडून यांचे नादाला लागून आपल्या आपल्यात कज्या करीत. ते खुस्याल मज्या करीत हिंडत. तय बेस मानसा निवडाल त बेस काम होल लेखांसाठी.
[साधारण मराठी]
पूर्वी एक गावाचा एक राजकीय पक्ष असायचा, नंतर एक कुटुंब एक पक्ष असायचे, नंतर एकाच घरात अनेक पक्षांची पदे बघायला मिळाली, निवडणुकी आधी उमेदवारांच्या या पक्षातून त्या पक्षातल्या उड्या पण सगळ्यांनी बघितल्या. असो पक्ष/उमेदवार निवड प्रत्येकाचा वयक्तिक निर्णय, ज्याला जो योग्य वाटतो तो घ्यावा. पण आदिवासी समाज हितासाठी पुढील विषय गांभीर्याने विचार करावा हि अपेक्षा.
आदिवासी समाजा समोर अगणित आव्हाने आहेत, रोज त्यात वाढ होतेच आहे. पालघर जिल्ह्याचे बोलायचे झाल्यास जल जंगल जमीन जीव या सोबत अस्तित्वाचाच प्रश्न समोर आहे. कदाचित याची जाणीव मोजक्यांनाच आहे. देशाच्या आर्थिक राजधानीला पाणी देण्यासाठी ज्या गावाच्या जमिनीवर धरणे बांधलीत त्या गावांना ४० वर्षानंतर पण प्यायला पाणी नाही. वरून अक्राळ विक्राळ वाढत असलेले वसई विरार भायंदर उरलेल्या पाण्यावर ताव मारायला तयार आहेतच. चांगले शिक्षण मिळवून करियर बनावता यावे यासाठी आश्रम शाळांत काय होते आहे आपल्या समोर आहे. स्थानिक पातळीवरचे रोजगार डोळ्यांसमोर कसे पळवले जातात हे पण बघितलेय. रस्त्या/नाक्यावर च्या जमिनी कश्या कब्जा करून बिगर आदिवासींच्या वसाहती आणि गावे वसली आहेत सोबत वाढणारे गुन्हे आपण सगळ्यांनी अनुभवलंय. विद्यार्थी/कर्मचारी आणि येथील काही लोप्रतिनिधी पण बोगस प्रमाणपत्र घेतलेल्या प्रकरणातले आहेत. आरोग्य वीज पाणी रस्ते प्रशासन यांची सद्यस्थिती दिसतेय डोळ्यांसमोर. हे कमी कि काय "देश हिताचे" १४ पेक्षा जास्त मेगा प्रकल्प या परिसरात नियोजित आहेत, आणि त्यासाठी भूमी अधिग्रहण सगळ्या माध्यमातून सुरु आहे. सगळे लिहायला जागा कमी पडेल एव्हड्या समस्या आहेत.
या सगळ्या परिस्थितीत येथील लोकप्रतिनिधी कसा असावा?
पूर्ण समाजाचा आवाज, अपेक्षा, प्रसाशनाला धारेवर धरून आदिवासी समाज हितासाठी संविधानिक अधिकार, ध्येय, धोरणे राबविण्यासाठी, आदिवासी समाज हिताचे कार्य पुढे रेटणारा, निस्वार्थ हेतूने समाज हित प्राथमिकतेने जपणारा.
पण आपल्याकडे खूप अगदी ठराविक पद्धतीने ठरवून प्रत्येक पक्षातून, त्यांना अपेक्षित काम/भाषा बोलणारे अनुकूल प्रतिनिधी बनवले जातात (तुरळक अपवाद वगळता). कधी अर्ध शिक्षित, कधी दूरवरून आयात केलेले, तर कधी सामाजिक कार्याशी नाळ नसलेले असतात.
वयक्तिक पातळीवर आपले पूर्वीचे खासदार चिंतामण दादा वनगा यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा व्हायची. खासकरून स्थानिक रोजगार निर्मिती, वारली चित्रकला चे बौद्धिक सपंदा हक्क, कलाकारांचा मोबदला, स्थानिक आदिवासी नेतृत्व, भविष्यातील आव्हाने, सध्याच्या समस्या, इत्यादी. समाज म्हणून आदिवासी समाजाचे नेतृत्व तयार व्हावे यासाठी ते आग्रही होते, या संदर्भात लवकरच काही कार्यक्रम सुरु करण्याचा त्यांचा मानस होता. ते ज्या परिस्थितून ज्या वातावरणात तयार झाले/घडले. त्यांनी समाजा/पक्षासाठी जो त्याग करून स्वतःची एक ओळख तयार केली, बऱ्यापैकी अनेक प्रामाणिक प्रयत्न केले. अगदी जेव्हा लागेल तेव्हा पक्षाच्या/सरकार च्या विरोधात जाऊन स्पष्ट भूमिका घेतली. पाणी परिषद, भूमिसंपादन, किंवा इत्तर असे त्यांचे विरोधक हि हे मान्य करतात. (वयक्तिक रित्या डहाणू नोटिफिकेशन संदर्भात त्यांची भूमिका न पटणारी होती. या विषयवार त्यांना कळवले पण होते सविस्तर चर्चा ठरली होती). त्यांचे अचानक जाणे धक्कादायक होते. असो...
या वेळेस पण दुर्दैवाने लोकसभेसाठी विश्वासाचे एक हि नाव चर्चेत नाही, कि ज्याकडून सामान्य लोकांच्या, आदिवासी समाजाच्या अपेक्षा पूर्ण होतील. जर आदिवासी नेतृत्वासाठी आपण चांगला पर्यायच तयार करू शकत नाही तर बाकीचे खूप लांब आहे, येथे फक्त पक्ष जिंकेल आदिवासी समाज हिताचा विचार नाही. कदाचित कुणी एक खासदार बनेल त्याचे कुटुंब पुढे जाईल, त्यांचे कार्यकर्त्यांचा फायदा होईल, त्यांच्या नातेवाईकांचा फायदा होईल, त्यांचे गाववाले (तालुका/जिल्हावाले) फायदा करून घेतील, त्यांची पार्टी पुढे जाईल. पण येथील स्थानिक आदिवासी समाजाचे काय? कोण वाली ?
मतदान करून, चांगला पर्याय निवडा, योग्य पर्याय नसेल तर पर्याय तयार करण्याचा कामाला लागा.
वयक्तिक/राजकीय लाभासाठी निवडणुक ऋतूला तयार होणारे नेतृत्व पेक्षा, सामाजिक चळवळीतला, समाजासाठी झोकून दिलेला, समाजाशी प्रामाणिक, अधिकार यांचा अभ्यास, कणखर आणि नेतृत्वगुण निपुण. त्याला पक्ष असेल नसेल तरी चालेल पण आदिवासी समाज हितासाठी सर्वस्वी पणाला लावणारा पर्याय तयार करूया.
उदाहरण, जसे डॉ सुनिल दादा पऱ्हाड जो आपले करियर सोडून निस्वार्थ पूर्ण वेळ आदिवासी समाजासाठी देतोय. जल जंगल जमिन आणि अस्तित्व हीच एक दिशा बनवून स्वतः प्रयत्न करतोय. आदिवासींच्या प्रत्येक प्रश्नासाठी धडपडतोय.
*आहेत का असे पर्याय आपल्याकडे? अशांना आपण मजबूत करू शकतो? अश्यांची आणखीन मोठी फळी तयार करू शकतो का?
असे नेतृत्व आपल्याना लोकप्रतिनिधी म्हणून समाजातून पुढे आणता येईल का?*
आपले मत कळवावे .... जोहार !