ई. 6वी च्या नवीन पाठ्यपुस्तकात वारली चित्र कलेवर आधारित पाठ समाविष्ट केला खरा पण त्यांत चुकीची माहिती दिली गेली आहे. उदाहरणार्थ चौक "धवलेरी" काढते. आणि हे चित्र सात-आठ स्त्रिया मिळून पुर्ण करतात इ. वारली कलेला पाठ्यपुस्तकात स्थान मिळणे हे समाजासाठी गौरवास्पद असले तरी खरी माहिती जगासमोर येणे गरजेचे आहे. चौक "सवासनी" काढतात आणि त्या एका नव-या किंवा नवरी साठी दोघी दोघी जणी असतात आणि गरजेनुसार मदतीला स्त्रीया घेतात. "धवलेरी" ही लग्न लावणारी लग्न पुरोहित असते. स्त्रीच्या हातून लग्न लावणारा, स्त्रियांना लग्न लावण्याचा मान देणारा आदिवासी वारली हा कदाचित एकमेव समाज पृथ्वीच्या पाठीवर असेल. या चुकीच्या माहितीमुळे एकीकडे मुलगी नको म्हणून भारतात स्त्री - भ्रूणहत्या करुन स्त्रीचे जगणे नाकारले जात असताना आदिवासी समाज स्त्रीला फक्त समान मानणाराच नव्हे तर तिला लग्न पुरोहिताचा उच्च व पवित्र मान आदिवासी समाज देतो,ही संपूर्ण समाजाला आणि देशाला अभिमानास्पद गोष्ट लपवली जात आहे. तरी सर्व सुजाण बंधु-भगिनींना विनंती की हा पाठ दुरुस्त करून योग्य माहितीसह पाठ्यपुस्तकात समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करावेत. :-विनोद दूमाडा - आदिवासी एकता परिषद. कृपया फारवर्ड करा. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळापर्यंत पोहचला पाहिजे.
जोहार मित्रहो, [विनोद दूमाडा (आएप)] :- धवलेरी(आदिवासी स्त्री विवाह पुरोहित ) ही बहुतांशी विधवा असते. धवलेरी सवाष्ण असावी किंवा विधवा असावी असे बंधन नसते. बहुतांश भारतीय समाज विधवेला पांढऱ्या कपाळाची, अपशकुनी मानताना दिसतो, विवाहासारख्या पवित्र कार्यात अपशकुन नको म्हणून तिला जवळपास सुद्धा फिरकू दिले जात नाही, तिला बंदिस्त जीवन जगण्यास भाग पाडले जाते..... पुर्वी तर तिला पतीच्या चितेवर जिवंत जाळले जाई. म्हणजेच एक माणूस म्हणून तिचा प्रत्येक हक्क, अगदी जिवंत राहण्याचा नैसर्गिक हक्क सुद्धा हिरावून घेतला गेला होता. तीने न केलेल्या चूकिची(पती निधनाची) शिक्षा तिला दिली जात असे किंबहुना आजही दिली जाते. तथाकथित "प्रगत" व "सुसंस्कृत" समाज विधवेला ही अमानुष-अमानवीय वागणूक देत असताना समाजाने रानटी - असंस्कृत व मागास मानलेला आदिवासी समाज मात्र स्त्री ला एक माणूस म्हणून पुर्ण अधिकार व मानाची वागणूक देताना दिसतो. एखाद्या स्त्रीच्या पती निधनानंतर तिला पुनर्विवाहाचा हक्क तर देतोच देतो पण विवाह नाही केला तरी तिला शुभ कार्यापासून वंचित ठेवले जात नाही. दोन विधवा एकत्र बसून लग्नातील हळद,बाशिंग ह्या कार्यक्रमात नियमित सहभागी होताना दिसतात. बहुतेक समाजात लग्न पुरोहित पदावर पुरुषांचा एकाधिकार व मक्तेदारी असताना आदिवासी समाज मात्र एका विधवेकडून लग्न लावून घेतो. संपूर्ण मानवजातीला आदर्श घेण्यासारखी ही परंपरा आदिवासी समाजाने आजही टिकवली आहे. अशा एक ना अनेक सुंदर परंपरा आदिवासी समाजाने जिवंत ठेवल्या आहेत..... कधी कधी वाटते की मानवता जिवंत ठेवायची असेल, हे जग जीवघेण्या स्पर्धेच्या विनाशातून वाचवायचे असेल तर आदिवासींना सुसंस्कृतपणा शिकवणे बंद करून जगाने आदिवासींकडून मानवतावादी जीवन पद्धती शिकावी. मद्यपी, रानटी, घाणेरडे, क्रुर ही विविध माध्यमांनी निर्माण केलेली प्रतिमा भेदून पाहावी.... एक नितांत सुंदर जीवन दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही.
--