वयक्तिक अनुभव : बोचका बांधीतु, भारतात इया
आज शेवटचा दिस कोरियाचा, उंद्या परत इयाचू ...
[ *स्थानिक आदिवासी बोली भाषा* ]
कव्हां भारतात येव ना घरा जावं असा झालाहें. गायचेन भलता आठव येय, घरचा धान खाया वाटलाहें. सामान गोलाटून बोचका बांधाया सुरवात केलीहे. हलूं हलू एक एक सामान नांगत होतुं, काही काही आठव येत होता डोक्यात. पका सामान झालाहे, दादूला बारका बारका पका सामान घिदेल आहे. त्याला हो खेलनी नीही पायजत, घरात ज्या सामान दिसल त्यासी खेलतो. इकडं दुकानात भलत्या बारक्या बारक्या क्रिएटिव्ह वस्तू दिसल्या, भलत्या भरून घितल्याहात.
सामान त भरून नेवल, वस्तू नेवतील, आठवणी नेवतील, इकडचे फोटो नेवतील, वेग वेगल्या आयडिया नेवतील त्याचे आधारे भारताला सूचना करवतील. पण ये लोखांच्या चांगल्या सवई कस्याक आणू , का जेणेकरून भारतात हो लोखा बेस बेस रेहतीला.
[ *साधारण मराठी भाषा* ]
आज शेवटचा दिवस, उद्या भारताच्या प्रवासाला लागणार. काल संध्याकाळी ह्युंदाई कमर्शियल रिसर्च अँड डेव्हलोपमेंट चे डायरेक्टर सोबत डिनर झाला. आताच पॅकिंग पूर्ण झाली, दादू साठी खूप साऱ्या क्रिएटिव्ह वस्तू घेतल्या आहेत कारण त्याला खेळण्यांपेक्षा घरातल्या वस्तू आवडतात.
कोरियात daiso नावाची दुकानांची चेन आहे, हि जपानी कंपनी आहे. या दुकानात घरात लागणारे सगळे लहान सहान वस्तू आणि सामान मिळते. डिझाईन, क्वालिटी खूप चांगल्या प्रतीची आणि किंमत पण परवडणारी. त्यामुळे या दुकानात नेहमी खूप गर्दी असते. आणि एकदा गेल्यावर, राहवतच नाही काही ना काही घेण्याची खूप इच्छा होते. कारण सगळ्या गोष्टी रोजच्या कामात येणाऱ्या आहेत. मनावर खूप ताबा ठेवला तरी मोठाली बॅग सामानानी भरली, तीनही वेळेस. असो येथे क्रिएटीव्हीटी वाढवणे आणि सामान्य जीवन सोप्प्या करणे याला खूप महत्व आहे. त्यानुसार सगळे डिझाईन केले जाते.
कोरियाचे औद्योगिकरण, विकास, शहरीकरण, पर्यावरण, प्रसाशन, शिक्षण, जीवनशैली, परंपरा, जीवनमूल्य, इत्यादी अनेक गोष्टी जवळून बघतोय आणि अनुभवतोय गेल्या ११ वर्षांपासून. कोरियन विकासाला रॅपिड ग्रोथ सांगतात, त्याचे त्या प्रमाणे फायदे आहेत आणि तोटे पण आहेत. पण येथील इन्फ्रा विकासा सोबत पूरक मूल्य व्यवस्था आणि नागरिकांचे आचरण तसेच प्रसाशनाची भूमिका पण महत्वाची आहे. येथील प्रशासक, नेतृत्व, उद्योजग, नोकरदार, व्यावसायिक, सामान्य नागरीक प्रत्येक जन त्यांचे काम नियमा नुसार प्रामाणिक करतो. त्यामुळे सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने मेंटेन आहेत. सार्वजनिक आणि वयक्तिक पण प्रत्येक जण जाबदारीने वापरतात. असो प्रत्येक गोष्टीच्या २ साईड असतात, इथल्या पण काही वाईट (न पटणाऱ्या) गोष्टी आहेत. असो यांना हवे तशे त्यांच्या प्राथमिकतेने ते करत आहेत.
आणि भारत म्हणून आपण? प्रत्येक जन वेग वेगळ्या दिशेने ओढायचा प्रयन्त करतोय, कुणीच समाधानी नाही.
आपल्याना सर्वात आधी आपल्या *प्राथमिकता ठरावाव्या लागतील. एक बेस लाईन ठरवावी लागेल आणि त्यानुसार सुनियोजित पणे उपक्रम राबवावे लागतील. नाही तर खूप मोठा वर्ग विकासापासून दूर राहील आणि आर्थिक विषमता, असमानता, गुन्हेगारी वाढत राहील. पर्यावरण खराब होत राहील आणि नैसर्गिक आपत्ती, आजार, आरोग्याचे प्रश्न वाढत राहतील*.
आपल्याना भौतिक गोष्टींवर जितके भर देतोय तितकाच भर आपल्या व्यवस्था प्रभावी करण्यात आणि लोकात संवेदना जागवणे महत्वाचे वाटते. कारण जरी सुपर फास्ट हायवे, प्रशस्त परिसर, यंत्र आले आणि ते *वापरण्यात शिस्त नसेल संवेदना नसेल तर अपघात आणि त्रासच जास्त होईल*. (सध्याचे अपघातांचे आकडे, प्रदूषणाचे, भ्रष्टाचाराचे, गुन्ह्यांचे, अत्याचाराचे आकडे बघावे)
[ *दोन शब्द सामाजिक* ]
विज्ञान वापरासाठी विवेक हवा. त्यासाठी आपल्यात मूल्य असायला हवीत, संस्कार असायला हवेत. काही चांगल्या गोष्टी पण होत आहेत पण दुर्दैवाने काही घडामोडी बघितल्यावर मन सुन्न होते.
कुपोषित बालकांचा मृत्यू, आश्रम शाळेत विषबाधा/अत्याचार, वसतिगृहात भ्रष्ट्राचार, शिक्षणाची सुमार गुणवत्ता, महाविद्यालयात शिष्यवृत्ती नाही, अपुरी आरोग्य सेवा, योजना मधला अपहार, वाढती गुन्हेगारी आणि असुरक्षितता, बोगसांचा भरणा, जमिनींचे हस्तांतरण, वाढती बेरोजगारी, वाढणारे बाहेरचे लोंढे, वाढणारी झोपडपट्टी, प्रदूषण, रोगराई, जमिनीची गुणवत्ता, अन्न पदार्थातील भेसळ, अमली पदार्थ आणि वाढते व्यसन, वाढती आर्थिक विषमता, भेदभाव, शेतकरी आणि कामगारांशी दुजाभाव, बुडते पारंपरिक उद्योग, इत्यादी *यादी वाढते आहे*.
नक्की काय करतोय आपण? कोणत्या दिशेला जातो आहोत?
भले प्राथमिकतेने बुलेट ट्रेन आणाल, ऑटोमॅटिक गाड्या आणाल, मोठे मोठे प्लांट लावाल, कारखाने काढाल, करोडो अब्ज मध्ये संपत्ती गोळा कराल. पण *जर सर्व सामान्यांचे जीवन अधिक सुखकर होणार नसेल तर नक्कीच हा विकास परवडणारा आहे असे वाटत नाही*. तुम्हाला काय वाटते ?
(या कोरियन लोकांची शिस्त आणि मूल्य बॅग मध्ये भरून आणता अली असती तर नक्कीच आणली असती)... असो खूप झाले, भेटूया भारतात आल्यावर.